युरोपचा उन्हाळा आम्ही अनुभवला, अगदी गेल्या आठवड्यात! ज्या बातम्या येत होत्या – सिग्नल वितळले, रस्ते वितळले, छतं तापली, तापलेल्या छतांवर लोकांनी ’क्रेप’ आणि ’ऑमलेट्स’ केली, पर्यटनस्थळं बंद केली, लोकांवर प्रशासनाने पाण्याचे फवारे मारले… हे सगळं सत्य आहे, आम्ही अनुभवलं आहे. आमचा बदललेला रंगही त्याची साक्ष देईल!
या उष्ण झळाचं मुख्य कारण आहे तिथली भौगोलिक स्थिती. उन्हाळ्याचे महिने मुख्यत्वे जून, जुलै, ऑगस्ट. तेव्हा दिवस मोठा. मोठा म्हणजे जवळपास अठरा तासांचा. सूर्य सकाळी ५-६ पासून उगवतो, तो रात्री ९ नंतरच मावळतो. या दीर्घ दिवसात सूर्य २०-२५ डिग्री तापमानात असेल तर तो फारच अल्हाददायक ’समर’ असतो युरोपियनांसाठी. लोक दिवसचे दिवस त्या हव्याहव्याशा उन्हात हिंडतात. कारण, बाकी महिने ऊन दुर्मीळ असतं, असलं तरी त्यात जीव नसतो.
या वर्षी मात्र ’सुपर एल-निनो’मुळे सूर्य युरोपात तापला. विशीत असलेलं तापमान तापमानमापकात ’तिशी’त पोचलं आणि शरीराला त्याच्या ’चाळिशी’च्या झळा बसायला लागल्या. ’समर’चा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडलेल्या पर्यटकांसह स्थानिकही या झळांचे शिकार झाले. तिकडचा सूर्य पेटला, की तो नुसताच तळपत नाही, तर तो शरीराचं निर्जलीकरण करतो. तोंडावर पाणी मारा, बाटलीभरून पाणी प्या, आईसक्रीम खा… शरीरावर त्याच परिणामच होत नाही. सूर्य सारं काही शोषून घेतो. उघड्या जगेवर असूनही श्वास घ्यायला त्रास होतो, घुसमटायला होतं.
बर, बाहेर गरम होतंय, म्हणून घरात बसावं, तर तिथली घरं एरवीच्या हिवाळ्यापासून सुरक्षित रहावी, म्हणून आतूनही बंदिस्त असतात! त्यामुळे, बाहेर गरम, घरात गरम… होरपळायला होतं. भारतात लोकांना वाटलंच, की आम्ही काय ४५ डिग्रीत कित्येक वर्ष जगतोय की! पण आपल्याकडे उशीरात उशीरा सूर्यास्त संध्याकाळी ७ ला होतो, त्यामुळे रात्रीत तापमान कमी व्हायलाही वेळ मिळतो. शिवाय रात्री आपण खिडक्या, दारं उघडी टाकतो, रात्रीचा बाहेरचा थंडावा आपण घरात घेतो. तिथल्या घरात काचांचा वापर खूप असतो. काचा एकदा गरम झाल्या, की त्यांची उष्णता घरात पसरते, ती कमी व्हायला स्कोपच नसतो. आपल्याकडे घरोघरी पंखे आणि आता अनेक ठिकाणी एसीही असतात. तिकडे, आठ-दहा महिने गारच हवा असल्याने, पंखेसुद्धा लोकांकडे क्वचितच असतात. त्यामुळे गरमी कमी होणार कशी? असं ते सगळं आहे.
असो. ती लाट गेली आता. आता युरोप नेहेमीसारखं अल्हाददायक झालं आहे. पण परत जेव्हा लाट येईल, (आणि जागतिक तापमानवाढ होत असल्याने, ती येईलच) तेव्हा तिच्याशी दोन हात करायला प्रशासन आणि लोक सज्ज असतील. या हवेतून बोध घेऊन ते काहीतरी उपाययोजना करतील, अशी खात्री नक्की वाटते.
दरम्यान, आपल्याकडे पावसाळा सुरू झालाय. दरवर्षीपेक्षा पाऊस यंदा कमीच आहे, तरी दर वर्षीसारखा पूर येईलच, खड्डे पडतीलच, रस्ते वाहून जातीलच, गटारं तुंबतीलच, वीज जाईलच. पावसाळा दुर्मीळ नाही, तरी त्यावर काहीही उपाययोजना शक्य नाही, हेही दुर्दैवाने खात्रीने सांगू शकतो.
जसा भारतीय उन्हाळा आणि युरोपीय उन्हाळ्यात फरक आहे, तसाच फरक प्रशासनातही आहे, विचारसरणीत आहे आणि म्हणून प्रगतीतही आहे. हे या निमित्ताने सांगावसं वाटलं.



