July 18, 2024

मौन/ Silence

#PCWrites एका मासिकाने #मौन #Silence या विषयावर लेखन मागवले होते. तेव्हा मी हे लिहिले होते. प्रत्येक मुलीला, तरुणीला, स्त्रीला बोलायला निसर्गत:च आवडते, पण पुढे ती बोलेनाशी होते, अबोल होते, गप्प होते, ते का? हे मांडायचा हा माझा प्रयत्न, मराठी आणि इंग्रजीतही.

माझा आवडता #शतशब्द #100words format या साठी मुद्दामच निवडला, कारण “मौना”वर लिहिताना तरी शब्दबंबाळ होऊ नये!  

****

 

चूप

“आता हिचे प्रश्न होतील सुरू!” कोणीतरी कुत्सितपणे म्हणायचं.

“किती प्रश्न विचारतेस गं? गप जरा.” कोणीतरी वैतागून म्हणायचं.

“शूऽऽऽ, गप्प बस”, कोणीतरी दटावायचं.

“ए बाई, तुझे प्रश्न नकोत हं”, कोणीतरी तिचं तोंड बंद करायचं.

“आली चालती-बोलती ’प्रश्नावली’”, कोणीतरी हिणवायचं.

प्रश्न विचारलेले आवडत नाहीत लोकांना हे हळूहळू तिच्या लक्षात आलं. मनातली शंका विचारलेली, चुकीच्या प्रश्नाला प्रतिप्रश्न केलेला, आरोप ऐकून न घेतलेला, प्रतिवाद केलेला लोकांना पचत नाही, कारण त्यांच्याकडे उत्तरं नसतात. निरुत्तर झाले, की लोक टोमणे मारतात, विषयाला फाटे फोडतात, गैरसमज करून घेतात, क्वचित हिंसाही करतात हे तिला कळलं.

हळूहळू ती गप्प झाली.

मग ते विचारायला लागले, “हल्ली तू बोलत नाहीस?!”

 

*******

 

Quiet

“Yes, let the questions begin.” Someone would make a snide comment.

“Oh! You and your questions!” Someone would admonish her.

“Shut up.” Someone would say.

“No questions.” Someone would stop her mid-way.

“Here comes ‘Miss Questionnaire’”. Someone would taunt her.

People don’t like questions; she realized over time. Clearing doubts, clarifying the wrong questions, dismissing wrongful accusations, cross questioning, etc. is not acceptable to people, because they don’t have answers. And hence they taunt, change the subject, mislead and sometimes resort to violence too.

She understood.

She became quiet.

And then they started asking, “Nowadays, you don’t say much?!”

*******

July 5, 2024

सुहास्य…


इतक्यातच काही कारणाने दंतवैद्याकडे जावं लागलं तिच्या खुर्चीवर बसून, तिला शरण गेल्यावर आपल्याला करण्यासारखं फारसं काही उरतच नाही. त्यामुळे, डोळे मिटून दंतवैद्यांकडचे जुने प्रसंग आठवायला लागले. माझी associative memory प्रचंड strong आहे. त्यामुळे एका प्रसंगाशी निगडित कोणतेही, एरवी विस्मरणात गेलेले प्रसंग मला आठवायला लागतात. तसंच आत्ताही झालं.
मी लहान असताना माझे पुढचे दात पुढे आलेले होते. त्यामुळे, दुधाचे दात पडून पक्के दात आल्यावर दातांना ’तारा’ बसवायचा निर्णय घेतला गेला.
मी लहान होते, तो काळ बराच जुना आहे. तेव्हा दातांना bracesच लावत असले, तरी त्यांना ’तारा’च म्हणायची पद्धत होती! 😛तेव्हा orthodontist, अर्थात ’तारा लावणारे’ डॉक्टरही मोजकेच होते. त्यापैकी एक डॉ. सावनूर माझ्या घराच्या अगदीच जवळ होते, ते पक्के झाले. त्यांनी दात तपासले आणि दातांना तारा बसवायच्या ठरल्यावर मागे जाणाऱ्या दातांना जागा हवी, म्हणून सुळ्याशेजारचे दोन दात काढून या, असं सांगितलं.
या डॉक्टरांमध्येही कशी व्यवस्था आहे बघा! हे स्पेशालिस्ट डॉक्टर होते, दातांचंच काम करत होते, पण दात काढण्याचं बेसिक काम मात्र त्यांचं नव्हतं. ते काम मात्र साध्या डेंटिस्टचं 😐 अडला हरी. गेलो, मी आणि माझे वडिल. दात काढताना ते इंजेक्शन देणार, खूप दुखणार, रक्त येणार, काहीही खाता येणार नाही वगैरे भीती आधीपासूनच वाटत होती. मी त्यांच्या खुर्चीत बसले आणि त्यांनी काही कळायच्या आतच मला गालात भुलीचं इंजेक्शन दिलं. आता लोक सहसा इंजेक्शन देण्याआधी घाबरतात की नाही? माझं भलतच! त्यांनी इंजेक्शन दिलं, तेव्हा मला बारिकसं दुखलं, तेव्हा मी रडले नाही. पण भूल चढल्यावर गाल प्रचंड सुजला आहे असं वाटायला लागलं आणि त्यानंतर मी भोकाड पसरलं! 😭😭
भोकाड म्हणजे भो का ड! मी तशी रडकी नव्हते. धडपडले, रुसले तर रडायचे, पण मुळूमुळू. आत्ता मात्र मी व्यवस्थित भोकाड पसरलं, “खूप दुखतंय”, “मला भीती वाटते”, “मी नाही दात काढणार”, “आपण घरी जाऊ” टाईप proper tantrum मी तिथे सुरू केला!😱😱 माझे वडील लागले हसायला आणि डॉक्टर तर perplex झाले. उलट, बाळा आता दात काढलेला कळणारही नाही, म्हणूनच इंजेक्शन दिलंय हे ते मला परोपरीने समजावायला लागले, पण माझं रडं थांबेचना 🥹
मी खुर्चीवरून उठले आणि वडिलांचा हात धरून ओढायला लागले. शेवटी वडिलांनी कशीबशी समजूत घातली, आणि दोन्ही दात काढले एकदाचे! तेव्हा अर्थातच नाही दुखलं. नंतर दुखलं असेल, तर आठवत नाही. आठवतं ते माझं भोकाड!😆
असो. त्या जखमा भरल्यावर स्वारी गेली डॉ. सावनूरांकडे. एव्हाना मला ’तिकडे’ out of character जाऊन रडल्याची भयंकर लाज वगैरे वाटलेली होती. त्यामुळे, “तारा लावल्यावरही खूप दुखतं”, “दोन दिवस काहीही खाता येणार नाही” वगैरे सांगितलेलं असलं, तरी ’इकडे’ आपण अजिबात रडायचं नाही, असा मी निर्धार वगैरे केलेला होता. आणि तो मी पाळलाही. (तिथली एकच आठवण वाईट आहे, ती म्हणजे जबड्याचा साचा बनवण्यासाठी तोंडात रबरी काहीतरी भरलेला साचा घालतात. त्यात दात रुतवायचे असतात. अत्यंत घाण वास असतो त्याला. अक्षरश: उलटी होते त्याने!) डॉ. सावनूरांनी अगदी निवांतपणे दोन-चार सिटिंगमध्ये मला तारा बसवल्या.
पहिल्यांदा वडिल बरोबर आले होते. पुढच्या सगळ्या टप्प्यांसाठी आणि त्यानंतर मागे येणारी तार कापण्यासाठीही एकटीच गेले मी. तारांमुळे गाल, ओठ सोलवटायचे, पण कधीच रडले नाही. ते डॉक्टर अगदी गोड होते, soft spoken आणि mild mannered. मी नीट ब्रश केलेलं नसलं, तारेत काही अडकलेलं असलं की त्यांना लगेच कळायचं, ते रागवायचेही, पण अगदी सौम्य. (मला आईच्या दणदणीत ओरडण्याची सवय. मी काय त्यांचं ऐकतेय! ते रागावले की मला हसायलाच यायचं 😁😁) मला अजूनही त्यांचा चेहरा नीट आठवतो. May God bless him 🙏
त्यानंतर खूप खूप वर्षांनी माझं लग्न ठरलं. बोलताना कधीतरी, लहानपणी दात पुढे होते, तारा लावून मागे घेतले आहेत वगैरे सांगितलं. तर, गंमत म्हणजे माझ्या नवऱ्याचेही दात त्याच्या लहानपणी तारा लावून मागे घेतले होते आणि त्याचे डॉक्टर कोण होते माहितेय? येस. डॉ. सावनूरच! 😊😊 मला या योगायोगाचं प्रचंड आश्चर्य आणि गंमतही वाटली होती! आत्ता लिहितानाही वाटतेय 😄😄
माझा आणि नवऱ्याचा स्वभाव, मतं, आवडी जुळतात का हा वेगळा मुद्दा आहे. आमचं हास्य मात्र १०० टक्के जुळतं, thanks to Dr. Savnur!

June 6, 2024

उघड स्वगत

 

लहानपणी एक कथा वाचली होती. एका अट्टल गुन्हेगाराला फाशी देण्याआधी त्याची शेवटची इच्छा विचारतात, तेव्हा तो आईला भेटायची इच्छा दर्शवतो आणि ती भेटायला आल्यावर तिचा कान चावून म्हणतो, “मी चोऱ्या करायला लागलो तेव्हाच तू मला थांबवलं असतंस, तर आज मला फासावर जाण्याची वेळ आली नसती.” हे असे चोर फक्त गोष्टीतच असतात का? हे पोर्शे प्रकरण माझ्या सगळ्याच भाबड्या कल्पनांना सुरुंग लावतंय

😓

“आजोबा” म्हणलं की डोळ्यासमोर करारी, सचोटीनं आयुष्य जगलेली, टक्केटोणपे सहन करूनही प्रेमळ वागणारी व्यक्ती उभी राहते. या प्रकरणातले तथाकथित आजोबांचे तर अंडरवर्ल्डशीच संबंध होते! त्यांनी ड्रायव्हरला धमकावलं. बापाने नेते म्हणू नका, पोलिस म्हणू नका, सरकारी डॉक्टर म्हणू नका… सगळ्यांना धमकावून कामाला लावलं आणि आता आईनेच रक्त बदललं! अरे त्या मुलाला इतकं पाठीशी घालण्याऐवजी त्याच्या हातात दारूचा ग्लास, पैशाच्या थप्प्या, “तू कर रे काहीपण”वाला माज दिला नसता तर? दोन तरुणांचा जीव घेतलाय त्याने! याबद्दल यांच्यापैकी कोणाला काही वाटतंय का? व्यवस्थेला वाटतंय का? रावणाच्या घराण्यातही एक बिभीषण होता. राक्षसाघरीही नैतिकता असते, बोच असते, अपराधीपणाची हलकीशी जाणीव असते. या सगळ्या खरोखर फक्त गोष्टीतल्या गोष्टी उरल्या आहेत ☹️
 
आणि हे झालं एक उदाहरण फक्त, हे काही एकमेव उदाहरण नाहीये. त्या वयाच्या मुलामुलींचं हेच चालू आहे की. त्यांनी कोणाचा जीव घेतला नसेल, पण बापाचे पैसे उडवणं, अपरात्रीपर्यंत बाहेर राहणं, सर्रास कोणत्या ना कोणत्या प्रकारची नशा करणं यात कोण कमी आहे? उच्चभ्रू, उच्च मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय… पैसे उडवण्याची ऐपत कमी-जास्त होते. सवयी त्याच.
 
जबाबदारीचं सुटलेलं किंवा नसलेलं भान याचा फार मोठा फटका या मुलांना आणि पर्यायानं पूर्ण समाजाला लवकरच बसणार आहे, किंवा या अशा प्रकरणांमुळे ऑलरेडी बसायला लागलेला आहे 😢 हे आता शेजारच्या घरात नाही, आपल्याच घरातही चालू झालेलं आहे, कारण नैतिकता शिकवणारी आणि आचरणात आणणारी, आदर्श म्हणता येईल अशी माणसं घरात तरी कुठे आहेत? सगळेच पालक ’माझ्या मुलांना काहीही कमी पडू देणार नाही’, म्हणत मुलांना लाडावून ठेवतात, स्वत: दारू पीतात, पार्ट्या करतात, व्यसनं ग्लोरिफाय करतात, लाचखोरीसारखे गुन्हे ’नॉर्मलाइज’ करतात, समानता अशी, की घरातल्या स्त्रियाही यात मागे नाहीत. आया मुलग्यांना आणि बाप मुलींना बेसुमार लाडावून ठेवतात. साधं वेळेचं बंधन कोणी पाळत नाही, सिग्नल पाळत नाही, सहज खोटं बोलतात, परीक्षेत कॉपी करतात, सामाजिक संकेत पाळत नाही, शिष्टाचार नाही. उलट "असं करू नका" म्हणणाऱ्यालाच वेड्यात काढलं जातं, तोच अतार्किक आहे असं लेबल त्याच्या माथ्यावर मारलं जातं 😐
 
या गुन्ह्यातला आरोपी स्वभावाने कसा आहे माहित नाही, आपल्या अविचारामुळे आपण दोन जीव घेतले याचे गांभीर्य त्याला कळतं का, माहित नाही. त्याला काय दिसतंय? त्याला वाचवण्यासाठी सगळी व्यवस्था मॅनेज केली जातेय, आख्खं घर आपल्याला वाचवायला धावतंय. त्यामुळे त्याला खरोखर आपल्या वर्तनाचा पश्चाताप होईल, तो स्वत:लाच शिक्षा करून घेईल, सुधारेल याचे चान्सेस किती आहेत? खरं सांगायचं, तर नाहीतच. पण चुकून झाला, आणि त्याने आजोबा, बाप आणि आईचे कान चावले, तर त्याची त्यात काय चूक असेल? त्यांनी त्याच काय संगोपन केलं, काय संस्कार केले?
 
मुद्दा असा आहे, की तरुण मुलं असलेल्या किती आई-वडिलांनी यातून धडा घेतला आहे? मुला/मुलीला दोन शब्द सुनावता येतील इतका त्यांचा नैतिक पाया मजबूत आहे का? मुलांना शिस्त लावणे, पैसा जपून वापरायला शिकवणे, वेळेचे बंधन घालणे, “नाही” म्हणणे, जबाबदारीचे भान राखणे हे पालक शिकवताना कचरतात का? का कचरतात? कारण ते स्वतः यातलं काहीही पाळत नाहीत, म्हणून? ही पालकांची जबाबदारी नसते? पालकत्व म्हणजे केवळ जन्म देणे नाहीच, तर पाल्याला एक उत्तम, सुसंस्कारी, जबाबदार नागरिक बनवणे म्हणजे पालकत्व. स्वतः उत्तम पालक आहोत का याचा धांडोळा प्रत्येक आईबापाने घेणं अनिवार्य झालं आहे, असं नाही वाटत? (जे पालक, जी मुलं जबाबदार आहेत, अर्थातच त्यांना हे काहीच लागू नाही.)
 
असो. व्यर्थ आशावाद आहे हा असंही वाटतं. गोष्टी कधीच हाताबाहेर गेलेल्या आहेत 😭 नैतिकता लोप पावलेली आहे. ऱ्हास सुरू झाला आहे. त्याच्या वेगानं तो आपल्याला गिळेलच. त्या आधी शक्य तितकं बोलत, सांगत आणि अखेर सहनशक्ती असेतो सहन करत रहायचं, बस्स.
******