November 6, 2025

अमोल मुजुमदार- श्रद्धा आणि सबूरीची कहाणी

 

#PCWrites महिला क्रिकेट वर्ल्ड कप जिंकल्या, त्याला चार दिवस झाले, तरी तो पूर्ण संघ आणि अमोल मुजुमदार अजूनही ट्रेंडिंग आहेत! मस्त वाटत आहे. जिंकल्याबरोबर हरमनप्रीतने अमोलचे पाय धरले आणि अमोल एकदम प्रकाशझोतात आला! त्याचा पूर्ण बायो-डेटा, रणजीतली खेळी, सचिन-कांबळी-गांगुली-द्रविड-लक्ष्मण इत्यादींमुळे हुकलेल्या त्याच्या संधी… सारं काही लोकांना कळलं. अमोलची लाटच आली जणू… त्याच्या अनेक मुलाखती झाल्या. अमोल मुजुमदार कसा बोलतो, तो किती ग्राउंडेड आहे, तो किती साधा आहे, भगवान के घर देर है, finally he got what he deserved… त्याच्याबद्दल खूप बोललं गेलं, अजूनही बोललं/ लिहिलं जातंय आणि तरीही त्याचा कंटाळा येत नाहीये. का माहित आहे? कारण, निमूटपणे आणि सातत्याने काम करत राहणाऱ्या, कोणतेही छक्के-पंजे न कळणाऱ्या, कार्यालयीन राजकारणात सामील न होणाऱ्या, कुशल असलेल्या, पोटेन्शियल असलेल्या तरीही मागे पडलेल्या त्याच्यासारख्याच करोडो लोकांचा तो प्रतिनिधी आहे! 

 


 

नीट पाहिलं, तर आपल्या आसपास असे अनेक अमोल दिसतील. कदाचित तुम्हीही एक असाल. यांची गुणवत्ता, मेहनतीपणा, नम्रपणा कशातही खोट काढता येत नाही. तरीही नशीब त्यांच्यावर इतकं मेहेरबान होत नाही. त्यांच्याबरोबरचे आणि त्यांच्या पुढे जाणारे त्यांचे सहकारी काही वाईट, माजुरडे, वाट्टेल ते करून पुढे जाणारे नसतात.. अमोल मागे पडला, असं म्हणताना सचिन-गांगुली-द्रविड-लक्ष्मण वाईट होते का? ते कमी डिझर्व्हिंग होते का? नाही ना? पण लेडी लक नावाची एक चीज असते. कोणी कितीही नाकारो, कष्ट आणि गुणांना नशीबाची साथ लागतेच. असंच, या असंख्य अमोलांच्या बाबतीत होतं. तेही निराश होतात, पण चिकाटी सोडत नाहीत. झगमगाटाची अभिलाषा असते, म्हणून नाही, तर त्यांचा स्वभावच काम करत राहण्याचा असतो, म्हणून!

आता तर काळ असा आहे, की पुढे-पुढे करता आलं नाही, तर करियरच होऊ शकत नाही! एकवेळ गुणवत्ता नसली तरी चालेल, पण एकाचे हजार करून सांगता आले पाहिजेत. या रेट्यापुढे आपला कसा निभाव लागेल? आपल्या प्रामाणिक प्रयत्नांचं कौतुक कधीतरी योग्य लोकांकडून होईल का, असा विचार त्यांच्याही मनात कुठेतरी येऊन जातोच. पण या कुशंकांच्या आहारी न जाता, ते परत कामात बुडून जातात. आणि आयुष्यभर रुसलेलं नशीब दरवाजे उघडतं आणि अमोल मुजुमदारला कवेत घेतं, तेव्हा या कोट्यवधी अमोलांना मनापासून आनंद होतो. त्यांना नाही, तर त्यांच्यासारख्या एकाच्या मेहनतेची तरी दखल घेतली गेली ना! चला, नियती इतकीही निष्ठूर नाही, असं वाटतं. चला, एक दिवस आपल्याही बाबतीत असं काही होईल, अशी आशा वाटते.

या साध्या, प्रामाणिक, कष्टाळू पण नशीबाचं माप थोडं कमी पडलेल्या कोट्यवधींचे आशीर्वाद आणि शुभेच्छा अमोलच्या पाठीशी आहेत, म्हणून महिला वर्ल्ड कप जिंकून चार दिवस झाले, तरी अमोल मुजुमदार आजही ट्रेंडिंग आहे.

#womensworldcup #amolmujumdar

October 30, 2025

या वर्षी दिवाळी अंकांतले माझे लेखन 😊

 या वर्षी पाच दिवाळी अंकांमध्ये लिहिण्याची संधी मिळाली😊

 "इलॉन मस्क" या बहुचर्चित अमेरिकन उद्योगपतीचा परिचय "अक्षरमुद्रा"मध्ये आहे. 
 
सध्याच्या ट्रेडिंग Q Commerce म्हणजेच Quick Commerce ची माहिती, फायदे आणि तोटे यांच्याबद्दल मी "अनुराधा"मध्ये लिहिले आहे.  
 
 
या वर्षी हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते जीन हॅकमन आणि त्यांची पत्नी बेट्सी अराकावा यांचा त्यांच्या राहत्या घरीच अतिशय दुःखद मृत्यू झाला. मृत्यूचे कारण आणि घटनाक्रम सगळ्यांना बुचकळ्यात टाकेल असा होता. त्याबद्दल आणि एकूणच एकटेपणा, खासगीपणा यावर मी या वर्षीच्या "नवल"मध्ये लिहिले आहे. लेखाचं नाव आहे, "विचित्र नेमानेम". जरूर वाचा. अर्थातच, नवलच्या लौकिकाप्रमाणे एकूण अंकही जबरदस्त झाला आहे.
 
 
तुमचा योगायोगांवर विश्वास आहे? 😊 एका अनोख्या योगायोगाची "भेटीत तुष्टता मोठी" ही कथा या वर्षीच्या "मानिनी" दिवाळी अंकात मी लिहिली आहे 😊 बाकी अंकही दर वर्षीप्रमाणे उत्तम आहे. "मानिनी"मध्ये प्रकाशित झालेली माझी ही तिसरी कथा आहे. हा योग दर वर्षी येवो, अशी आशा😊
 
"निर्मळ रानवारा" हा एक सुंदर दिवाळी अंक आहे, खास लहान मुलांसाठी. त्यात मी अनेक वर्षांनी एक बालकथा लिहिली आहे 😊 बालकथा लिहिताना नेहेमीच धाकधूक होते, पण ही बरी जमली आहे, असं वाटत आहे 😊 आपल्या तिरंग्यात हेच तीन रंग का, ते सांगणारी ही गोष्ट नक्की वाचा आणि छोटू कंपनीलाही वाचायला द्या. अंकात भरपूर गोष्टी, चित्र, कोडी असा मुलांना आवडेल असा content ही आहे. दर वर्षी मुलांसाठी काहीतरी लिहिण्याचा मी नक्की प्रयत्न करणार आहे. "निर्मळ रानवारा" या अंकायोग्य काहीतरी लिहून व्हावे, हीच इच्छा
🙏
 
 
"हंस", "नवल" आणि "मोहिनी" हे उत्कृष्ट साहित्यमूल्य असलेले दिवाळी अंक म्हणून सुप्रसिद्ध आहेत. या अंकामध्ये आपलंही साहित्य प्रसिद्ध व्हावं अशी मनापासून इच्छा होती. चार वर्षांपूर्वी "हंस" साठी कथा पाठवली होती, पण काही अपरिहार्य कारणांमुळे ती स्वीकृत होऊनही प्रसिद्ध होऊ शकली नव्हती 🙁 या वर्षी त्यांपैकी नवल मध्ये प्रथमच माझा लेख आला, म्हणून फार मस्त वाटत आहे 😊 😇
 
तुम्हीही हे आणि भरपूर दिवाळी अंक नक्की वाचा आणि मी लिहिलेले काही वाचले, तर जरूर प्रतिक्रिया कळवा. 
 
 

October 10, 2025

#टपालदिन

 

९ ऑक्टोबर #टपालदिन आहे असं वाचलं. हे दोन शब्द वाचून, बापरे, कितीतरी आठवणी जाग्या झाल्या 😇😇आता पत्रलेखन हे thing of the past झालं असलं, तरी चिठ्ठ्या, पत्र, इमेल या सगळ्याला मी पत्रलेखनच मानते, कारण हे सगळं मी भरपूर लिहिलेलं आहे, अजूनही लिहिते 😊😊
शाळेत, वर्ग चालू असताना मी आणि माझी पुढे बसणारी एक मैत्रीण एकमेकींना अनेकदा छोट्या चिठ्ठ्या लिहायचो आणि मध्ये बसलेल्या मुलीही त्या इमानेइतबारे ’पास’ करायच्या. ’बोअर होतंय’, ’कंटाळा आलाय’, ’डब्यात गवार आहे’ असं काहीतरी फुटकळ असायचं त्यात, पण टीचरचं लक्ष चुकवत चिठ्ठ्या लिहायचं थ्रिल भारी होतं 😆😂
 
माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं, ती दुसऱ्या गावी रहायला गेली, आमच्याकडे फोन नव्हता आणि तिच्याकडेही. ती आईला पत्र लिहायची आणि मी तिला! तिला खरंतर आईच्या शब्दांमध्ये जास्त इंटरेस्ट असायचा, पण एका इनलॅंडमधली बहुतांश जागा मी शाळा, कॉलेज, तुझी आठवण येते टाईप्स लिहून भरून काढायचे 🫣😄 मग आई उरलेल्या जागेत लिहायची. माझा एक भाऊ तेव्हा मुंबईला रहायचा. तो मात्र मला एकटीला पत्र लिहायचा आणि अर्थातच, मीही त्याला उत्तर द्यायचे. ही पत्र पोस्टकार्डवर असायची 🙂
 
तेव्हा ’पेनफ्रेंड’ म्हणून प्रकाराची प्रचंड क्रेझ होती, संपूर्ण अनोळखी व्यक्तीशी पत्रातून मैत्री करायची. माझ्या काही मैत्रिणींचे असे परदेशातले पेन फ्रेंड होते आणि त्या फार कौतुकाने ती पत्र दाखवायच्या. पण का कोण जाणे, पत्र लिहायला आवड्त असूनही, मी ते धाडस कधीच करू शकले नाही.
 
कॉलेजमध्ये मात्र माझ्या पत्र प्रेमाला प्रतिसाद देणारी मैत्रीण मला भेटली. आम्ही रोज भेटायचो, तरी एकमेकींना भलीमोठी पत्र लिहायचो आणि प्रत्यक्ष भेटल्यावर ती एकमेकींना द्यायचो 😃😃 तेव्हा खास लेटर पॅड घेणं, वेगवेगळ्या रंगांची पेनं वापरून पत्र लिहिणं, स्टिकर्स लावणं असे खूप लाडही करायचो पत्रांचे. आमचं हे पत्रप्रेम खूप वर्ष चाललं. यात मोस्टली गॉसिप, तुझं ते आवडलं नाही, हे आवडलं, सुट्टीतले प्लॅन्स वगैरे असायचे. खूप वर्ष ही पत्रही मी जपून ठेवली होती 💝 आमची ही पत्र बघून आणखी एका कॉलेजचा मित्रही मला पत्र लिहायला लागला, पण तो रोज भेटत असूनही इनलॅंड पत्र लिहायचा. प्रत्यक्ष भेटीचा मजकूर आणि पत्रांतला मजकूर वेगवेगळा असायचा, हे विशेष. समोर आम्ही खूप गप्पा मारायचो, टीपी करायचो. पण पत्रांमध्ये स्वप्न, ऍंबिशन्स, लहानपण याबद्दल लिहायचो, जे समोरासमोर बोलणं ’एम्बॅरसिंग’ होतं, ते 😊 विशेष म्हणजे, कॉलेजमध्ये असूनही ना कोणी मला प्रेमपत्र लिहिलं, ना मी कोणाला 😁😁
 
ती फेज आली थेट लग्न ठरल्यावर 😜 पण एव्हाना कागदी पत्रांचा जमाना संपला होता. माझं लग्न ठरलं तेव्हा मी आणि नवरा वेगवेगळ्या गावी रहायचो. त्यामुळे आम्ही एकमेकांना इमेल्स लिहायचो. भरपूर!! याहू आणि हॉटमेलच्या सेवेचा पुरेपूर लाभ आम्ही करून घेतला 😜😂
 
मी अनेक सेलिब्रिटींनाही पत्र / इमेल्स लिहिल्या आहेत. मोस्टली पुस्तकं वाचून त्यावरचा अभिप्राय आणि त्यांच्या कामाचं कौतुक अशा स्वरूपाचं पत्र. पण मला कोणी उत्तर दिलं नाही ☹️ पत्र ठीक आहे. त्यांना फॅनमेल्स कितीतरी येत असतील. पण ईमेलचं उत्तरही कोणी दिलं नाही. तेव्हा वाईट वाटलं होतं 🙁🙁 या उलट, मला माझ्या कथा वाचून कोणी ईमेल केली, तर मी आवर्जून त्यांना उत्तर देते, आणखीही विचारपूस करते 😊 उत्तर द्यायचंच असेल, तर केवळ ’धन्यवाद’ असं मला देताच येत नाही. आणखी चार ओळी उमटतातच. मॅन्युफॅकचरिंग इश्यू आहे 😆
 
इतकंच काय, अनुवाद पूर्ण करून झाला, की मी सगळ्या फाईल्स जेव्हा प्रकाशकांना पाठवते, तेव्हाही मोठी कव्हरिंग ईमेल लिहिते- अनुवाद कसा केला आहे, कोणते शब्द/ वाक्प्रचार योजले आहेत/ ले आऊट कसा केला आहे/ मुद्दाम काही मजकूर योजला आहे का… मोठी ईमेल असते 😂😂 तिथेही खरंतर PFA लिहून भागतं. कोणीच इतका विचार करत नाही. पण माझी हौस आणि ऊर्मी काही संपत नाही! 😅
 
मी अगदी कमी काळ परदेशात होते. तेव्हा घरून पत्र यायची, त्याचं अप्रूप अजूनही लक्षात आहे. सध्या मी घरातल्या घरातच माझ्या मुलालाही चिठ्ठ्या लिहिते. विशेषत: मी बाहेर असताना तो घरी आला, तर ’सूचना’ वाली मोठी पॉइंटवाइज चिठ्ठी असते. तीच मी व्हॉट्सॅपवर लिहू शकते किंवा व्हॉइस नोटही पाठवू शकते. पण माझे हात आपोआप कागदाकडेच वळतात. मध्येच मी स्मायली देते, शब्दखेळ करते. मलाच मजा येते 🥰 तो मला उत्तर लिहित नाही. सूचनेप्रमाणे फक्त सगळी कामं नीट करतो 😆😂
 
टपाल विभागावर मी पर्सनली खूश आहे, कारण माझी सगळी पत्र टपाल खात्याने इच्छित स्थळी पोचवली. सगळ्यात मोठं काम म्हणजे, टपाल खात्याने माझे #कथापौर्णिमा सर्वत्र विनाविघ्न पोचवले. यासाठी मी टपालाच्या स्पीड पोस्ट सेवेची कायमची कृतज्ञ आहे 🙏💓 स्पीड पोस्टमध्ये पुस्तक गेलं, की ते पोचणारच इतकी खात्री मला या सेवेची आहे! 👍 (हां. स्पीड पोस्ट होईल का, ही शंका कायम असते. हा एक वेगळा विषय आहे. इन जनरलच, पोस्ट सेवा हा एक धन्य विषय आहे, पण आज कृतज्ञता व्यक्त करायची आहे, त्यामुळे जास्त काही बोलत नाही 😆😂)
 
माझ्याच प्रमाणे, माझ्या पिढीच्या आणि तिच्या मागच्या पिढीच्या लाखो लोकांनी एकमेकांना पत्र लिहिली आहेत. खुशालीची पत्र, भाऊबीजेच्या मनी ऑर्डर्स, क्वचित पाठवली गेलेली पार्सलं हा तर अगदी सामान्य घरांतला ’नॉर्म’ होता 😊 पोस्टमन हमखास दुपारी दोनला येणार, त्याला पाणी देऊन पत्र घेण्याची मजा अनेकांनी अनुभवली असेल. पण मग फोन, ईमेल आणि मोबाईल क्रांती झाल्यावर ज्येष्ठ नागरिकही व्हॉट्सॅपवर सक्रीय झाले आणि खुशालीची पत्र लिहिणारे लोकच संपले 😑
 
मला आजही पत्र लिहायला आवडेल. मध्यंतरी एका स्नेह्यांबरोबर अशीच ईमेलद्वारे खूप पत्रापत्री झाली आणि फार मस्त वाटलं. पण आमचंही संभाषण पुढे फोन आणि व्हॉट्सॅपवर सरकलं, पत्र बंद झाली. असंच होतं 🙂‍↕️ पत्र म्हणजे लिहिणाऱ्याच्या हृदयाचा एक तुकडा असतो. आपुलकी असलेल्या व्यक्तीशी केलेलं एक हृद्य संभाषण. पण सोशल मीडियामुळे दिखावा वाढला, फोटो वाढले, इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनची सवय लागली, तिथे हळूहळू लिहिलं जाणारं, त्याहून हळू पोचणारं पत्र कसं तग धरणार? 😭
 
असो. टपाल खातं सक्रीय राहो, अशी आजच्या दिवशीची मनापासूनची इच्छा. पत्र बाजूला पडली, पण स्पीड पोस्ट, पार्सल सेवा, पोस्टातल्या ठेवी यांना कायम मागणी राहो. न जाणो, कालचक्र फिरतं, जुन्याला मागणी येते, जुनी फॅशन रिव्हाइव होते, तसं पत्र लेखनही परत ट्रेंडिंग होईल! 😜 होप फॉर द बेस्ट 👍😊