९ ऑक्टोबर #टपालदिन आहे असं वाचलं. हे दोन शब्द वाचून, बापरे, कितीतरी आठवणी जाग्या झाल्या 
आता पत्रलेखन हे thing of the past झालं असलं, तरी चिठ्ठ्या, पत्र, इमेल या सगळ्याला मी पत्रलेखनच मानते, कारण हे सगळं मी भरपूर लिहिलेलं आहे, अजूनही लिहिते 





शाळेत, वर्ग चालू असताना मी आणि माझी पुढे बसणारी एक मैत्रीण एकमेकींना अनेकदा छोट्या चिठ्ठ्या लिहायचो आणि मध्ये बसलेल्या मुलीही त्या इमानेइतबारे ’पास’ करायच्या. ’बोअर होतंय’, ’कंटाळा आलाय’, ’डब्यात गवार आहे’ असं काहीतरी फुटकळ असायचं त्यात, पण टीचरचं लक्ष चुकवत चिठ्ठ्या लिहायचं थ्रिल भारी होतं 



माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं, ती दुसऱ्या गावी रहायला गेली, आमच्याकडे फोन नव्हता आणि तिच्याकडेही. ती आईला पत्र लिहायची आणि मी तिला! तिला खरंतर आईच्या शब्दांमध्ये जास्त इंटरेस्ट असायचा, पण एका इनलॅंडमधली बहुतांश जागा मी शाळा, कॉलेज, तुझी आठवण येते टाईप्स लिहून भरून काढायचे 
मग आई उरलेल्या जागेत लिहायची. माझा एक भाऊ तेव्हा मुंबईला रहायचा. तो मात्र मला एकटीला पत्र लिहायचा आणि अर्थातच, मीही त्याला उत्तर द्यायचे. ही पत्र पोस्टकार्डवर असायची 



तेव्हा ’पेनफ्रेंड’ म्हणून प्रकाराची प्रचंड क्रेझ होती, संपूर्ण अनोळखी व्यक्तीशी पत्रातून मैत्री करायची. माझ्या काही मैत्रिणींचे असे परदेशातले पेन फ्रेंड होते आणि त्या फार कौतुकाने ती पत्र दाखवायच्या. पण का कोण जाणे, पत्र लिहायला आवड्त असूनही, मी ते धाडस कधीच करू शकले नाही.
कॉलेजमध्ये मात्र माझ्या पत्र प्रेमाला प्रतिसाद देणारी मैत्रीण मला भेटली. आम्ही रोज भेटायचो, तरी एकमेकींना भलीमोठी पत्र लिहायचो आणि प्रत्यक्ष भेटल्यावर ती एकमेकींना द्यायचो 
तेव्हा खास लेटर पॅड घेणं, वेगवेगळ्या रंगांची पेनं वापरून पत्र लिहिणं, स्टिकर्स लावणं असे खूप लाडही करायचो पत्रांचे. आमचं हे पत्रप्रेम खूप वर्ष चाललं. यात मोस्टली गॉसिप, तुझं ते आवडलं नाही, हे आवडलं, सुट्टीतले प्लॅन्स वगैरे असायचे. खूप वर्ष ही पत्रही मी जपून ठेवली होती
आमची ही पत्र बघून आणखी एका कॉलेजचा मित्रही मला पत्र लिहायला लागला, पण तो रोज भेटत असूनही इनलॅंड पत्र लिहायचा. प्रत्यक्ष भेटीचा मजकूर आणि पत्रांतला मजकूर वेगवेगळा असायचा, हे विशेष. समोर आम्ही खूप गप्पा मारायचो, टीपी करायचो. पण पत्रांमध्ये स्वप्न, ऍंबिशन्स, लहानपण याबद्दल लिहायचो, जे समोरासमोर बोलणं ’एम्बॅरसिंग’ होतं, ते
विशेष म्हणजे, कॉलेजमध्ये असूनही ना कोणी मला प्रेमपत्र लिहिलं, ना मी कोणाला 







ती फेज आली थेट लग्न ठरल्यावर
पण एव्हाना कागदी पत्रांचा जमाना संपला होता. माझं लग्न ठरलं तेव्हा मी आणि नवरा वेगवेगळ्या गावी रहायचो. त्यामुळे आम्ही एकमेकांना इमेल्स लिहायचो. भरपूर!! याहू आणि हॉटमेलच्या सेवेचा पुरेपूर लाभ आम्ही करून घेतला 




मी अनेक सेलिब्रिटींनाही पत्र / इमेल्स लिहिल्या आहेत. मोस्टली पुस्तकं वाचून त्यावरचा अभिप्राय आणि त्यांच्या कामाचं कौतुक अशा स्वरूपाचं पत्र. पण मला कोणी उत्तर दिलं नाही
पत्र ठीक आहे. त्यांना फॅनमेल्स कितीतरी येत असतील. पण ईमेलचं उत्तरही कोणी दिलं नाही. तेव्हा वाईट वाटलं होतं 
या उलट, मला माझ्या कथा वाचून कोणी ईमेल केली, तर मी आवर्जून त्यांना उत्तर देते, आणखीही विचारपूस करते
उत्तर द्यायचंच असेल, तर केवळ ’धन्यवाद’ असं मला देताच येत नाही. आणखी चार ओळी उमटतातच. मॅन्युफॅकचरिंग इश्यू आहे 





इतकंच काय, अनुवाद पूर्ण करून झाला, की मी सगळ्या फाईल्स जेव्हा प्रकाशकांना पाठवते, तेव्हाही मोठी कव्हरिंग ईमेल लिहिते- अनुवाद कसा केला आहे, कोणते शब्द/ वाक्प्रचार योजले आहेत/ ले आऊट कसा केला आहे/ मुद्दाम काही मजकूर योजला आहे का… मोठी ईमेल असते 
तिथेही खरंतर PFA लिहून भागतं. कोणीच इतका विचार करत नाही. पण माझी हौस आणि ऊर्मी काही संपत नाही! 



मी अगदी कमी काळ परदेशात होते. तेव्हा घरून पत्र यायची, त्याचं अप्रूप अजूनही लक्षात आहे. सध्या मी घरातल्या घरातच माझ्या मुलालाही चिठ्ठ्या लिहिते. विशेषत: मी बाहेर असताना तो घरी आला, तर ’सूचना’ वाली मोठी पॉइंटवाइज चिठ्ठी असते. तीच मी व्हॉट्सॅपवर लिहू शकते किंवा व्हॉइस नोटही पाठवू शकते. पण माझे हात आपोआप कागदाकडेच वळतात. मध्येच मी स्मायली देते, शब्दखेळ करते. मलाच मजा येते
तो मला उत्तर लिहित नाही. सूचनेप्रमाणे फक्त सगळी कामं नीट करतो 




टपाल विभागावर मी पर्सनली खूश आहे, कारण माझी सगळी पत्र टपाल खात्याने इच्छित स्थळी पोचवली. सगळ्यात मोठं काम म्हणजे, टपाल खात्याने माझे #कथापौर्णिमा सर्वत्र विनाविघ्न पोचवले. यासाठी मी टपालाच्या स्पीड पोस्ट सेवेची कायमची कृतज्ञ आहे 
स्पीड पोस्टमध्ये पुस्तक गेलं, की ते पोचणारच इतकी खात्री मला या सेवेची आहे!
(हां. स्पीड पोस्ट होईल का, ही शंका कायम असते. हा एक वेगळा विषय आहे. इन जनरलच, पोस्ट सेवा हा एक धन्य विषय आहे, पण आज कृतज्ञता व्यक्त करायची आहे, त्यामुळे जास्त काही बोलत नाही 
)





माझ्याच प्रमाणे, माझ्या पिढीच्या आणि तिच्या मागच्या पिढीच्या लाखो लोकांनी एकमेकांना पत्र लिहिली आहेत. खुशालीची पत्र, भाऊबीजेच्या मनी ऑर्डर्स, क्वचित पाठवली गेलेली पार्सलं हा तर अगदी सामान्य घरांतला ’नॉर्म’ होता
पोस्टमन हमखास दुपारी दोनला येणार, त्याला पाणी देऊन पत्र घेण्याची मजा अनेकांनी अनुभवली असेल. पण मग फोन, ईमेल आणि मोबाईल क्रांती झाल्यावर ज्येष्ठ नागरिकही व्हॉट्सॅपवर सक्रीय झाले आणि खुशालीची पत्र लिहिणारे लोकच संपले 


मला आजही पत्र लिहायला आवडेल. मध्यंतरी एका स्नेह्यांबरोबर अशीच ईमेलद्वारे खूप पत्रापत्री झाली आणि फार मस्त वाटलं. पण आमचंही संभाषण पुढे फोन आणि व्हॉट्सॅपवर सरकलं, पत्र बंद झाली. असंच होतं
पत्र म्हणजे लिहिणाऱ्याच्या हृदयाचा एक तुकडा असतो. आपुलकी असलेल्या व्यक्तीशी केलेलं एक हृद्य संभाषण. पण सोशल मीडियामुळे दिखावा वाढला, फोटो वाढले, इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनची सवय लागली, तिथे हळूहळू लिहिलं जाणारं, त्याहून हळू पोचणारं पत्र कसं तग धरणार? 


असो. टपाल खातं सक्रीय राहो, अशी आजच्या दिवशीची मनापासूनची इच्छा. पत्र बाजूला पडली, पण स्पीड पोस्ट, पार्सल सेवा, पोस्टातल्या ठेवी यांना कायम मागणी राहो. न जाणो, कालचक्र फिरतं, जुन्याला मागणी येते, जुनी फॅशन रिव्हाइव होते, तसं पत्र लेखनही परत ट्रेंडिंग होईल!
होप फॉर द बेस्ट 



