लग्नात आताशा पंगतीतलं जेवण, जिलबी-मसालेभात-अळूची भाजी हा टिपिकल मराठी मेन्यू मागे पडला आहे, पंजाबी पदार्थांनी अतीक्रमण केलं आहे, अशी चर्चा एका फेसबुक समूहात सुरू असताना, मला आठवलं, ते मराठी लग्नांमधलं रिसेप्शन!
मराठी, म्हणजे तुमच्या-आमच्यासारख्या मध्यमवर्गीय लग्नांमध्ये रिसेप्शनची पद्धतच कमी होती. वर अथवा वधूपिता खूपच मोठ्या हुद्द्यावर असतील (म्हणजे, ते नोकरदार असतील, असंच अध्याहृत होतं! तेव्हा मराठी माणूस व्यवसाय करत नव्हता), तर त्यांच्या ऑफिसच्या लोकांसाठी रिसेप्शन असायचं. अर्थातच, रिसेप्शनला अगदी सख्ख्या नातेवाइकांनाच बोलावणं असायचं. सीमांतपूजन आणि लग्न इथे झाडून सर्व नातेवाइकांनी हजेरी लावल्यावर रिसेप्शन मात्र ’खास’ लोकांसाठीच असायचं. रिसेप्शनला जाणं, म्हणजे आपणही कोणीतरी खास, वेगळे आहोत, असं वाटायचं.
रिसेप्शनसाठी सहसा वधू शालू नेसायची. तोही लाल किंवा डाळिंबी रंगाचा. शालू नसेल, तर मोठ्या काठाची कांजीवरम फिक्स. मोस्टली मरून किंवा ब्राउन! वर १००% सूटातच असायचा, काळा किंवा निळा, आणि लाल टाय. वधूचा हिरवा चुडा, मंगळसूत्र ठसठशीत उठून दिसायचं. मुंडावळ्या, हार, कुंकू यांना फाटा असायचा. त्यामुळे वधू-वर वेगळेच दिसायचे, थोडे मोकळेही वागायचे. रिसेप्शनला आलेल्या पाहुण्यांना वाकून नमस्कार नसायचा, कारण ते ’गेस्ट’ असायचे ना, त्यामुळे वधू दोन्ही हात जोडून नमस्कार करायची, तर वर शेक-हॅंड करायचा. बाबा लोकांचे बॉसही ’मिसेस’ना घेऊन प्रेमाने यायचे, कलीग्जही उगाच इंग्रजी झाडायचे आणि हे सगळे लोक परग्रहवासी असल्यासारखे ’घरातले’ लोक त्यांना थोडं अंतर राखून कौतुकाने न्याहाळायचे. त्यातही एखादी स्मार्ट मुलगी असली किंवा शायनिंग मारणारा मुलगा असला, तर बायकांच्या चौकस नजरा त्यांचं ’मूल्यमापन’ करायच्या.
आणि रिस्पेशनचा मेन्यूही फिक्स. रिसेप्शनला कधीच पूर्ण जेवण/ ताट नसायचं. सकाळी पक्वान्नाचं जेवण झालेलं असल्यामुळे, आता परत इतकं कोणी जेवत नाही / खर्च कमी / ऑफिसातल्या पाहुण्यांना हात बरबटत जेवण नको, खायला सुटसुटीत पदार्थ हवेत अशी कारणं असतील. किंवा तिन्ही असतील! पण मेन्यू मात्र दोनच पाहिलेत मी-
मेन्यू १ :- उपम्याची मूद, त्यावर भुरभुरलेली बारिक शेव, कोथिंबीर आणि लिंबाची फोड + बटाट्याचे वेफर्स + नारळाची बर्फी.
मेन्यू २ :- दोन बटाटेवडे, खोबऱ्याची चटणी + बटाट्याचे वेफर्स + दोन साखर लावलेले कोरडे गुलाबजाम!
अल्टिमेट, परफेक्ट मेन्यू होते हे. ती नारळाची बर्फी तर सुपर्ब असायची. मोठ्ठी, जाडी, चौकोनी, मऊ आणि कडक यांच्यामधली, पिवळ्या रंगाची… आहाहा. उपमा सोडला, तर बाकी सगळेच पदार्थ नवलाईचे. वेफर्स पाकिटात मिळत नव्हते, वडे चौकाचौकात तळले जात नव्हते आणि गुलाबजाम तर घरीच, तेही सणासुदीलाच केले जायचे. त्यामुळे एक तर रिसेप्शनचे अपरूप आणि त्यात मिळणाऱ्या ’डिश’चे डबल अपरूप! ही आख्खी डिश आपल्याला एकट्याला मिळणार आहे, या कल्पनेनेच बच्चे कंपनी खूश व्हायची. भर उन्हाळ्यात लग्न असेल, तर सुरूवातीला क्वचित पन्हंही असायचं. And who can forget, वधू-वर आणि दोघांनी शेअर केलेलं एकच गोल्डस्पॉट! हा एक फोटो प्रत्येक लग्न/ रिसेप्शनमध्ये असणारच आहे!
वेलकम ड्रिंक, चाटचे काउन्टर, डोसा काउन्टर, तवा काउन्टर, अनेक भाज्या, दाल, राइस, मिठाया, तंदूर, पान, आइसक्रीम… हळूहळू एकेक पदार्थ वाढत गेले, रिसेप्शनही लग्नाच्या हॉलवर नाही, तर ’लॉन’वर व्हायला लागली, सरसकट सर्वांनाच रिसेप्शनला बोलावणी यायला लागली, साधेपणातली डिग्निटी लयाला गेली आणि मराठी रिसेप्शनमधला awe संपला.
भपका, बडेजाव, नको इतके फोटो, व्हिडिओ, रील, खाण्यातले चॉइस आपण बदलू शकू का, माहित नाही, पण किमान मेन्यू आणि वधू-वरांचे पोशाख तरी पूर्णपणे मराठी असायला हवेत, असं वाटतं.
****
Content, mine. Original.
Photos from the internet.