June 6, 2025

मराठी रिसेप्शन

 

लग्नात आताशा पंगतीतलं जेवण, जिलबी-मसालेभात-अळूची भाजी हा टिपिकल मराठी मेन्यू मागे पडला आहे, पंजाबी पदार्थांनी अतीक्रमण केलं आहे, अशी चर्चा एका फेसबुक समूहात सुरू असताना, मला आठवलं, ते मराठी लग्नांमधलं रिसेप्शन!

मराठी, म्हणजे तुमच्या-आमच्यासारख्या मध्यमवर्गीय लग्नांमध्ये रिसेप्शनची पद्धतच कमी होती. वर अथवा वधूपिता खूपच मोठ्या हुद्द्यावर असतील (म्हणजे, ते नोकरदार असतील, असंच अध्याहृत होतं! तेव्हा मराठी माणूस व्यवसाय करत नव्हता), तर त्यांच्या ऑफिसच्या लोकांसाठी रिसेप्शन असायचं. अर्थातच, रिसेप्शनला अगदी सख्ख्या नातेवाइकांनाच बोलावणं असायचं. सीमांतपूजन आणि लग्न इथे झाडून सर्व नातेवाइकांनी हजेरी लावल्यावर रिसेप्शन मात्र ’खास’ लोकांसाठीच असायचं. रिसेप्शनला जाणं, म्हणजे आपणही कोणीतरी खास, वेगळे आहोत, असं वाटायचं.

रिसेप्शनसाठी सहसा वधू शालू नेसायची. तोही लाल किंवा डाळिंबी रंगाचा. शालू नसेल, तर मोठ्या काठाची कांजीवरम फिक्स. मोस्टली मरून किंवा ब्राउन! वर १००% सूटातच असायचा, काळा किंवा निळा, आणि लाल टाय. वधूचा हिरवा चुडा, मंगळसूत्र ठसठशीत उठून दिसायचं. मुंडावळ्या, हार, कुंकू यांना फाटा असायचा. त्यामुळे वधू-वर वेगळेच दिसायचे, थोडे मोकळेही वागायचे. रिसेप्शनला आलेल्या पाहुण्यांना वाकून नमस्कार नसायचा, कारण ते ’गेस्ट’ असायचे ना, त्यामुळे वधू दोन्ही हात जोडून नमस्कार करायची, तर वर शेक-हॅंड करायचा. बाबा लोकांचे बॉसही ’मिसेस’ना घेऊन प्रेमाने यायचे, कलीग्जही उगाच इंग्रजी झाडायचे आणि हे सगळे लोक परग्रहवासी असल्यासारखे ’घरातले’ लोक त्यांना थोडं अंतर राखून कौतुकाने न्याहाळायचे. त्यातही एखादी स्मार्ट मुलगी असली किंवा शायनिंग मारणारा मुलगा असला, तर बायकांच्या चौकस नजरा त्यांचं ’मूल्यमापन’ करायच्या.

आणि रिस्पेशनचा मेन्यूही फिक्स. रिसेप्शनला कधीच पूर्ण जेवण/ ताट नसायचं. सकाळी पक्वान्नाचं जेवण झालेलं असल्यामुळे, आता परत इतकं कोणी जेवत नाही / खर्च कमी / ऑफिसातल्या पाहुण्यांना हात बरबटत जेवण नको, खायला सुटसुटीत पदार्थ हवेत अशी कारणं असतील. किंवा तिन्ही असतील! पण मेन्यू मात्र दोनच पाहिलेत मी-

मेन्यू १ :- उपम्याची मूद, त्यावर भुरभुरलेली बारिक शेव, कोथिंबीर आणि लिंबाची फोड + बटाट्याचे वेफर्स + नारळाची बर्फी.

मेन्यू २ :- दोन बटाटेवडे, खोबऱ्याची चटणी + बटाट्याचे वेफर्स + दोन साखर लावलेले कोरडे गुलाबजाम!

 



 

अल्टिमेट, परफेक्ट मेन्यू होते हे. ती नारळाची बर्फी तर सुपर्ब असायची. मोठ्ठी, जाडी, चौकोनी, मऊ आणि कडक यांच्यामधली, पिवळ्या रंगाची… आहाहा. उपमा सोडला, तर बाकी सगळेच पदार्थ नवलाईचे. वेफर्स पाकिटात मिळत नव्हते, वडे चौकाचौकात तळले जात नव्हते आणि गुलाबजाम तर घरीच, तेही सणासुदीलाच केले जायचे. त्यामुळे एक तर रिसेप्शनचे अपरूप आणि त्यात मिळणाऱ्या ’डिश’चे डबल अपरूप! ही आख्खी डिश आपल्याला एकट्याला मिळणार आहे, या कल्पनेनेच बच्चे कंपनी खूश व्हायची. भर उन्हाळ्यात लग्न असेल, तर सुरूवातीला क्वचित पन्हंही असायचं. And who can forget, वधू-वर आणि दोघांनी शेअर केलेलं एकच गोल्डस्पॉट! हा एक फोटो प्रत्येक लग्न/ रिसेप्शनमध्ये असणारच आहे!

वेलकम ड्रिंक, चाटचे काउन्टर, डोसा काउन्टर, तवा काउन्टर, अनेक भाज्या, दाल, राइस, मिठाया, तंदूर, पान, आइसक्रीम… हळूहळू एकेक पदार्थ वाढत गेले, रिसेप्शनही लग्नाच्या हॉलवर नाही, तर ’लॉन’वर व्हायला लागली, सरसकट सर्वांनाच रिसेप्शनला बोलावणी यायला लागली, साधेपणातली डिग्निटी लयाला गेली आणि मराठी रिसेप्शनमधला awe संपला.

भपका, बडेजाव, नको इतके फोटो, व्हिडिओ, रील, खाण्यातले चॉइस आपण बदलू शकू का, माहित नाही, पण किमान मेन्यू आणि वधू-वरांचे पोशाख तरी पूर्णपणे मराठी असायला हवेत, असं वाटतं.          

**** 

 

Content, mine. Original. 

Photos from the internet.  

 

May 21, 2025

कथापौर्णिमा

#कथापौर्णिमा या माझ्या कथासंग्रहाची माहीत नवीन (आणि जुन्या) वाचकांसाठी 😊

ज्येष्ठ साहित्यिका मंगला गोडबोले आणि लेखक, दिग्दर्शक किरण यज्ञोपवीत यांच्या शुभहस्ते २८ ऑक्टोबर, २०२३ ला कोजागिरी पौर्णिमेच्या सुंदर संध्याकाळी #कथापौर्णिमा चे प्रकाशन झाले. रसिक साहित्य, पुणे यांनी या कथासंग्रहाची उत्कृष्ट निर्मिती केली आहे. ज्येष्ठ साहित्यिका डॉ. विजया वाड यांनी सुंदर प्रस्तावना लिहिली आहे. 
 


“एखादी कथा सुरू केली, की पूर्ण होईपर्यंत चैन पडत नाही, पुढे काय असेल याची उत्सुकता वाटत राहते...”
“संवाद अतिशय ओघवते आहेत.”
“जणू काही माझ्यासमोर कथा घडत आहे, असं वाटत होतं.”
“आम्ही वेळा ठरवून संग्रह वाचतोय, नाहीतर भांडणं होत आहेत.”
“unputdownable!” 
 
“कथापौर्णिमा” वाचून मला मिळालेल्या काही खऱ्याखुऱ्या प्रतिक्रिया आहेत! 😊
 


मानवी भावभावनांना शब्दबद्ध करणाऱ्या १५ कथा संग्रहात आहेत. संग्रह शेकडो वाचकांनी वाचला आहे आणि त्यांना तो आवडला आहे. संग्रहाला "सर्वोत्कृष्ट लक्षवेधी कथासंग्रह" असे साहित्यवलय या संस्थेचे पारितोषिकही प्राप्त झाले आहे. 
 
स्वतः वाचायला आणि भेट द्यायला हा कथासंग्रह अगदी योग्य आहे. हवा असेल, तर मला कॉमेंट करून सांगा, किंवा मेसेंजर वर मेसेज करा. मी संग्रह तुम्हाला पाठवेन.
पृष्ठसंख्या : २७० पाने
किंमत : रु. ३०० पोस्टेजसहित.
स्पीड पोस्टने ३ दिवसात तुम्हाला घरपोच हा उत्तम कथासंग्रह मिळेल.
तुमच्या कॉमेंटच्या प्रतीक्षेत 😊

May 5, 2025

मैत्री?!

 

#PCWrites सोशल मीडियामुळे माझी काही मित्रांबरोबरची मैत्री संपली! याची चरचरीत जाणीव काही दिवसांपूर्वी झाली. सोशल मीडियामुळे आऊचा काऊ असलेले लोकही ’फ्रेंड’ होतात, पण माझ्या बाबतीत सांगायचं, तर खऱ्या आयुष्यातले खरे मित्र या आभासी जगामुळे तुटले. कारण? अर्थातच, राजकीय मतभिन्नता! मला लिहितानाही इतकं odd वाटतंय… या मित्रांशी माझी मैत्री २०१४ पूर्वीची होती. तेव्हा तुम्ही कोणत्या पक्षाचे, कोणत्या विचारसरणीचे असे विचारून आणि पारखून मैत्री केली जात नव्हती! तेव्हा बुद्धीमत्ता, कामाचे क्षेत्र, एकमेकांशी जुळलेली वेव्हलेन्थ, प्रासंगिक विनोद, एकमेकांबद्दल वाटत असलेला आदर, कौतुक आपुलकी… हा आमच्या मैत्रीचा बेस होता.

२०१४ नंतर, म्हणजे मैत्रीला तीन-चार वर्ष झाल्यानंतर लक्षात आलं, की अरे, आपली राजकीय मतं वेगळी आहेत! हळूहळू सर्वत्र विखार वाढायला लागला, तसा या मित्रांच्याही बोलण्यात अनावश्यक चिथावणी, हेटाळणी यायला लागली. तरीही, मैत्रीच्या आड राजकीय मतं येणार नाहीत असं वाटलं होतं. पण २०१४ पासून देशात लोकसभा, विधानसभा निवडणुका झाल्या, शेजारी देशाने भ्याड आक्रमणं केली, त्याला भारताने चोख उत्तर दिलं, देशात अनेक आंदोलनं झाली आणि हळूहळू निवडणुकांपुरते सीमीत असलेले विषय मैत्रीत शिरले. आता त्यांचं-माझं काम, वैयक्तिक आयुष्य, आरोग्य, अचिव्हमेन्ट्स, मुलांचे/पालकांचे प्रश्न, पर्यटन, सिनेमे, खाणं-पिणं-भेटणं… प्रत्येक गोष्टीत राजकीय मतभेद डोकावतात. दु:खाची गोष्ट अशी, की हे मतभेद एका विचारधारेपुरते सीमित नाहीयेत, दर आता देशविरोधाचे टोक त्यांनी गाठले आहे. हा विरोध आता इतका टोकाचा आहे, की उद्या देव न करो, पण युद्ध खरोखर दारात आलं, तर हेच मित्र हल्लेखोरांना माझा दरवाजा दाखवतील, अशी भीती वाटते. आणि ही भीती अनाकलनीय किंवा कपोलकल्पित नाही, हे त्यातून भीतीदायक आहे.

आता हे मित्र प्रत्यक्षात भेटले, तरी त्यांच्याशी बोलायची इच्छा होत नाही. त्यांचा चेहरा दिसण्याआधी ऐकू येतात त्यांची विखारी मतं. आता साध्या गप्पा, नर्म विनोद, मतांचे आदानप्रदान करणारी मैत्री संपली. ही फक्त माझी गोष्ट नाहीये. हे आपल्या अनेकांबरोबर झालंही असेल. This is so detrimental to us as normal human beings हे कोणाच्या लक्षातच येत नाहीये. आमची मैत्री संपली याचा मला अतिशय खेद वाटतो. पण त्यांच्या उन्मादात ते त्यांच्या लक्षात तरी आलं असेल का? बहुतेक नाहीच. कारण आता माणूस महत्त्वाचा नाहीये, तो ’कोणत्या बाजू’चा आहे हे महत्त्वाचं आहे!