May 5, 2025

मैत्री?!

 

#PCWrites सोशल मीडियामुळे माझी काही मित्रांबरोबरची मैत्री संपली! याची चरचरीत जाणीव काही दिवसांपूर्वी झाली. सोशल मीडियामुळे आऊचा काऊ असलेले लोकही ’फ्रेंड’ होतात, पण माझ्या बाबतीत सांगायचं, तर खऱ्या आयुष्यातले खरे मित्र या आभासी जगामुळे तुटले. कारण? अर्थातच, राजकीय मतभिन्नता! मला लिहितानाही इतकं odd वाटतंय… या मित्रांशी माझी मैत्री २०१४ पूर्वीची होती. तेव्हा तुम्ही कोणत्या पक्षाचे, कोणत्या विचारसरणीचे असे विचारून आणि पारखून मैत्री केली जात नव्हती! तेव्हा बुद्धीमत्ता, कामाचे क्षेत्र, एकमेकांशी जुळलेली वेव्हलेन्थ, प्रासंगिक विनोद, एकमेकांबद्दल वाटत असलेला आदर, कौतुक आपुलकी… हा आमच्या मैत्रीचा बेस होता.

२०१४ नंतर, म्हणजे मैत्रीला तीन-चार वर्ष झाल्यानंतर लक्षात आलं, की अरे, आपली राजकीय मतं वेगळी आहेत! हळूहळू सर्वत्र विखार वाढायला लागला, तसा या मित्रांच्याही बोलण्यात अनावश्यक चिथावणी, हेटाळणी यायला लागली. तरीही, मैत्रीच्या आड राजकीय मतं येणार नाहीत असं वाटलं होतं. पण २०१४ पासून देशात लोकसभा, विधानसभा निवडणुका झाल्या, शेजारी देशाने भ्याड आक्रमणं केली, त्याला भारताने चोख उत्तर दिलं, देशात अनेक आंदोलनं झाली आणि हळूहळू निवडणुकांपुरते सीमीत असलेले विषय मैत्रीत शिरले. आता त्यांचं-माझं काम, वैयक्तिक आयुष्य, आरोग्य, अचिव्हमेन्ट्स, मुलांचे/पालकांचे प्रश्न, पर्यटन, सिनेमे, खाणं-पिणं-भेटणं… प्रत्येक गोष्टीत राजकीय मतभेद डोकावतात. दु:खाची गोष्ट अशी, की हे मतभेद एका विचारधारेपुरते सीमित नाहीयेत, दर आता देशविरोधाचे टोक त्यांनी गाठले आहे. हा विरोध आता इतका टोकाचा आहे, की उद्या देव न करो, पण युद्ध खरोखर दारात आलं, तर हेच मित्र हल्लेखोरांना माझा दरवाजा दाखवतील, अशी भीती वाटते. आणि ही भीती अनाकलनीय किंवा कपोलकल्पित नाही, हे त्यातून भीतीदायक आहे.

आता हे मित्र प्रत्यक्षात भेटले, तरी त्यांच्याशी बोलायची इच्छा होत नाही. त्यांचा चेहरा दिसण्याआधी ऐकू येतात त्यांची विखारी मतं. आता साध्या गप्पा, नर्म विनोद, मतांचे आदानप्रदान करणारी मैत्री संपली. ही फक्त माझी गोष्ट नाहीये. हे आपल्या अनेकांबरोबर झालंही असेल. This is so detrimental to us as normal human beings हे कोणाच्या लक्षातच येत नाहीये. आमची मैत्री संपली याचा मला अतिशय खेद वाटतो. पण त्यांच्या उन्मादात ते त्यांच्या लक्षात तरी आलं असेल का? बहुतेक नाहीच. कारण आता माणूस महत्त्वाचा नाहीये, तो ’कोणत्या बाजू’चा आहे हे महत्त्वाचं आहे!  

0 comments: