June 11, 2009

'कृष्णा पाटील'

एखादी १९ वर्षाची मुलगी कशी असते? अल्लड, अवखळ, हसरी, कपड्यांच्या बाबतीत चोखंदळ, स्वतःचं कौतुक घरातल्या मंडळींकडून करून घ्यायला आवडणारी, आयुष्यातलं ध्येय ठरवून ते साकार करण्यासाठी धडपडणारी...

'कृष्णा पाटील' ही अशीच एक मुलगी. नाव ओळखीचं वाटतंय ना? होय, हीच ती वीरांगना, जिने वयाच्या केवळ एकोणीसाव्या वर्षी जगातले सर्वात उत्तुंग शिखर काबीज केलेय- जिने 'माऊंट एव्हरेस्ट' सर केलाय!!! भारतातली सर्वात दुसरी कमी वयाची आणि पहिलीच मराठी मुलगी ही जिने हा विक्रम केलाय!
ज्या वयात मुलं 'आपलं ध्येय काय आहे?' 'आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे?' हे अजूनही नक्की करू शकलेले नसतात, त्या वयात ही मुलगी काय पराक्रम करून आलीये याचं महत्त्व तिचं वय पाहिलं की कळतं! जगातल्या सर्वात उंच जागी जाऊन आल्यानंतरही तिचे पाय जमिनीवरच आहेत हे तिचं आणि केवळ तिचंच कौतुक! आणि कृष्णाच्या दृष्टीने ही तर केवळ सुरूवात आहे. तिला 'पर्यावरण रक्षणा'र्थ खूप काम करायचं आहे. वसुंधरेची हानी रोखण्यासाठी खारीचा वाटा उचलायचा आहे. तिची ही 'एव्हरेस्ट'ची मोहिम ही देखील 'ईको-फ्रेन्डली' मोहिम होती.

कृष्णाशी संवाद साधू शकण्याचं भाग्य मला लाभलं. तिच्याविषयी, तिच्या मोहिमेविषयी अजून जाणून घ्यायला नक्कीच आवडेल तुम्हाला. या लिंकवर एक टीचकी मारा, बस्स! -http://www.maayboli.com/node/8358

June 2, 2009

अक्षरवार्ता

मायबोली मराठी भाषेवर समस्त मराठी लोकांचे अतिशय प्रेम. कितीही वाद त्यामध्ये आले, ओरड झाली, की 'मराठीला घरघर लागली', तरी सध्याचे मराठी पुस्तकांच्या विक्रीचे आणि लोकप्रियतेचे आकडे बघता, मायबोलीच्या जीवात जीव नक्कीच आला असेल. भाषेचा विस्तार जितका बोलण्यामधून होतो, तितकीच भाषेची समृद्धी ही त्या भाषेच्या साहित्याच्या प्रसारामधून होते. आपल्या मराठीमध्ये उत्तमोत्तम साहित्यकृतींची परंपरा फार जुनी. एकाहून एक सरस लेखक आणि कवी आपल्याला मिळाले आणि त्यांनी पुस्तकांच्या माध्यमामधून मराठी माणसाची वाचनाची भूक शमवली, तृप्त केली.

मध्यंतरीच्या काळात 'सकस, दर्जेदार असं काही हल्ली वाचायलाच मिळत नाही' अशी तक्रार वारंवार ऐकू येत असे.'ई-बूक' ही संकल्पनाही रूढ होऊ पहात होती. पण कालांतराने 'हातात पुस्तक घेऊन, कोर्‍या पानाचा वास अनुभवत पुस्तक वाचण्यात' जी मजा आहे, ती ई-बूकमध्ये नाही, हे पुस्तकप्रेमींना उमजले. मराठी पुस्तक हातात घेऊन वाचणे हेही 'ओल्ड-फॅशन्ड' राहिले नाही.

आता हळूहळू दिवस बदलत आहेत. एखादं पुस्तक एखाद्याने वाचलं नसेल तर 'अजूऽऽऽन हे पुस्तक वाचलं नाहीस???' असे विचारून त्याच्या हातात ते पुस्तक द्यायचे दिवस आहेत हे. अनेक विषयांवरची, अनेक जुन्या-नव्या, प्रस्थापित-नवोदित लेखकांची पुस्तकं पुन्हा बाजारात येत आहेत, आणि तूफान खपतही आहेत! पुस्तक प्रदर्शनांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहेत!! मराठी लेखकांना, प्रकाशकांना याहून दिलाश्याची आणि आनंदाची बाब कोणती असेल? जुनी, जुन्या काळची पुस्तकं अजूनही जोमाने पंचविसावी, तिसावी आवृत्तीरूपात खपतात, तर प्रसंगोचित एखाद्या कवीचे, लेखकाचे पुस्तक पुन्हा नवीन स्वरूपात उपलब्ध आहे, म्हणून उत्सुकतेने घेतले जाते. नवीन वाचकवर्ग तयार होत असतो, जोही या पुस्तकांचा गुणग्राहक असतो. एकंदर, मराठी पुस्तकांना सतत मागणी आहे.

एखादा माणूस जर खरा पुस्तकप्रेमी असेल, तर त्याची ही वाचनभूक दिवसागणिक वाढतच जाते. मग होतं काय, की कधीतरी एक 'वाचन ब्लॉक' येतो. खूप पुस्तकं वाचली, तरी 'जबरदस्त', 'झपाटून टाकणारे', 'स्फूर्तीदायक' असे पुस्तक अनेक दिवसात वाचलेलं नसतं. कोणतं पुस्तक वाचलं, की 'ती स्फूर्ती' मिळेल, 'तो मूड' येईल हे कोणताच वाचक सांगू शकणार नाही म्हणा, कारण एकेक पुस्तक वाचायचे देखील 'दिवस' असतात. एकेकाळी ज्या पुस्तकाची पारायणं केली, ते आता हातातही धरवत नाही, तर एखादं पुस्तक आपण या आधी का नाही वाचलं ही चुटपुट कायम लागून रहाते. अनेक वेळेला हे समजत नाही की 'आता यानंतर कोणतं पुस्तक वाचावं?' पुष्कळदा मित्र, नातेवाईक यांनी सुचवलेली पुस्तकं आपल्या 'टाईपची' नसतात. एखादं पुस्तक अगदी उत्सुकतेने हातात घ्यावं आणि घोर अपेक्षाभंग व्हावा, हे तर आपण सगळ्यांनी किमान एकदा तरी अनुभवलं असेलच.

अशा वेळी, कोणी एखाद्या पुस्तकाचा 'स्नीक प्रीव्ह्यू' आपल्याला दिला, त्या पुस्तकाविषयी जाणून घेण्यासाठी त्यात थोडं डोकावू दिलं, तर काय मजा येईल ना? असाच एक उपक्रम सध्या 'मायबोली' या मराठी संकेतस्थळावर सध्या चालू आहे- 'अक्षरवार्ता!'. डॉ. चिन्मय दामले हे हा उपक्रम चालवत आहेत. 'समकालीन', 'ग्रंथाली' 'राजहंस' इत्यादी या आघाडीच्या प्रकाशन संस्थांच्या नवीन पुस्तकांविषयी ते या उपक्रमाअंतर्गत माहिती करून देतात. थोडंसं पुस्तकाविषयी प्रास्ताविक, आणि चक्क पुस्तकामधली काही पानंही ते आपल्याला वाचायला देतात. यातलं पुस्तकांचं वैविध्य वाखाणण्याजोगं आहे.. अगदी आत्ताच आलेल्या डॉ. प्रकाश आमटेंचं 'प्रकाशवाटा', कै. विजय तेंडुलकर यांच्या जयंतीला प्रकाशित झालेलं, ''तें' दिवस', , गानसरस्वती किशोरी आमोणकरांचा सांगितिक प्रवास- 'स्वरार्थरमणी रागरससिद्धांत', 'अमूल'कर्ते श्री. वर्गीस कुरियन यांचं 'स्वप्नं' अशी नामांकित व्यक्तिमत्त्वांच्या पुस्तकांची ओळख आपल्याला या उपक्रमात झालेली आहे, आणि यापुढेही होत राहील. विशेष म्हणजे, ही सर्व पुस्तकं मायबोलीच्या 'खरेदी विभागातही' उपलब्ध आहेत.

जगभर पसरलेल्या मराठी वाचकापर्यंत नवीन आणि उत्तम पुस्तकं पोचावीत, यासाठी डॉ. चिन्मय मनापासून प्रयत्न करत आहेत, याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि आभार. या उपक्रमाचे यश आपल्याही हाती आहे. ही पुस्तकं पाहून, आपल्याला वाचावीशी वाटली, तर अवश्य ती विकत घेऊया, आणि एक उत्तम वाचनीय अनुभव आपल्या शिदोरीत जमा करूया.