November 26, 2009

कोणाला फरक पडतो?

२६/११च्या निमित्तानं खरंच हा प्रश्न विचारावासा वाटतो- खरंच फरक पडतो का तुम्हाला? तुम्ही- राजकारणी, मंत्री आणि मीडीयाचे प्रतिनिधी.

आज त्या हल्ल्याला एक वर्ष झालं, त्यानिमित्तानं संपूर्ण भारतदेश परत एकदा ते दु:खद, संतापजनक क्षण जगतोय- तो सुरेक्षेमधला ढिलेपणा, हलगर्जीपणा, सामान्यांचे आणि पोलिसांचे मृत्यू, तब्बल तीन दिवस चाललेला संहार, अतिरेक्यांनी मुंबईच्या नाकावर टिच्चून केलेली विटंबना..

त्यानंतर पूलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. कसाबचा खटला चालू आहे, शेजारचे राष्ट्र आज एक आणि उद्या एक बोलत, आपल्याला झुलवत ठेवत बाकी बलाढ्य देशांकडून कोट्यवधी डोलर्सचा निधी मिळवत परत अतिरेकी कारवायांना उत्तेजन देत आहेच. काही ठिकाणी सुरक्षा यंत्रणा बसली आणि कालांतराने परत एकदा ढासळलीही. नेत्यांनी भाषणं ठोकली सवयीनी.. त्यांना त्याचा दाह कळला का तरी? मीडीया त्यावेळी बाईटसाठी वेडी झाली, जीवावर उदार झाली, माणूसकी विसरली. शेवटी पुढे आला तो सामान्य माणूसच- असा माणूस ज्याला चेहरा नाही, पण संवेदना आहेत. आज तोच माणूस शांततेसाठी मेणबत्त्या लावेल, तर पोलिस निधीसाठी एक दिवसाचा पगार देईल.

पण ज्यांना ठोस काही करता येईल त्यांनी काय केले हो ह्या काळात? अगदीच काही नाही असं नाही- दोन निवडणूका केल्या ना- आधी लोकसभा, मग विधानसभा. त्यात सर्व शक्ती पणाला लावली. अमूक मंत्री पडावा म्हणून केलेली फिल्डींग, तमूक उभा रहावा म्हणून वापरलेलं दबावतंत्र, जागांची गणितं, करोडोंचे व्यवहार! ह्या सगळ्यात देशाचा स्वाभिमान, लोकांची सुरक्षितता कुठे लक्षात ठेवणार? आणि हे केवळ सत्ताधारी पक्षासाठी नाही, विरोधी पक्षाने काय केले? त्यांना नक्की विरोध कशाला करावा हे तरी उमगतंय का? ह्या देशातल्या सध्याच्या राजकारण्यांनी कधीतरी 'देश' ही प्रायॉरिटी ठेवली का हो? ठेवली असती, तर आज ही वेळ आली असती का? अन्य देशांनी काही विधानं केली, तर निषेध पत्रकं काढण्याशिवाय काय केलं आपण? देश आतून सुधारण्यासाठी कोणी साधा ठरावही पुढे केला नाही? आजही पोलिस खात्यात हजारो पदं रिक्त आहेत, पोलिस महासंचालक कोण?- ह्यावरही राजकारण शिजत आहे- खरंच कोणाला काय पडलंय? लाखो-करोडोंच्या पैशात हे अक्षरशः लोळतात, पण देशाच्या सैनिकासाठी, सामान्य माणसाच्या सुरक्षेसाठी नियुक्त केलेल्या पोलिस दलासाठी पुरेशी शस्त्रास्त्रही उपलब्ध करून देऊ शकत नाही आपण? त्यावेळी नाही आणि त्यानंतरही नाही? मग कशाच्या जोरावर हे लोक श्रद्धांजली सभांचं आयोजन करतात?

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून गौरवण्यात आलेला पत्रकार आज मोठमोठे लेख लिहिल, ते दिवस, त्या घटना सगळं परत जिवंत करेल. पण वर्षभर तो काय करत होता? कोणत्या वृत्तपत्राने, टीव्ही चॅनेलने 'सुरक्षा' ह्या विषयावर पाठपुरावा केला? प्रसारमाध्यमांनी का नाही वर्षभर युवकांची जागृती मोहिम राबवली? का नाही लोकशाहीमधले दबावतंत्राचे हत्यार वापरून उगवत्या पीढीची ऊर्जा मंत्र्यांना उत्तर देण्यास भाग पाडण्यात खर्ची घातली? लोकशाहीचा प्रमुख घटक म्हणून किती ताकद आहे त्यांच्याकडे ती कशात वापरली?- नको ते बाईट्स घेण्यात, सासू-सून छळात, फालतू स्टींग ऑपरेशन्समध्ये, मांजर आडवं गेलं की काय कराल? -यांमध्ये? का नाही ते पुढाकार घेत कोणत्या विधायक चळवळीत? २४ तास तुमचे कारखाने बातम्या बाहेर काढत असता, तुम्हाला कोणालाच ह्या एका विषयाची लाट उठवता आली नाही? आज मारे पानपानभर लिहाल, म्हणजे जबाबदारी संपली का? मीडीया ही राजकारणासारखीच केवळ पैश्यांचाच गणिताला बघून वार्तांकन करते यासारखं कोणतं दुर्दैव असणार?

खरंच कोणालाच काहीच फरक पडेनासा झालाय? पैसा पैसा पैसा.. इतका गैरमार्गाचा पैसा घेऊन काय करणार? असा पैसा, जो तुम्ही स्वतःला विकून उभा केलाय? असं म्हणतात की ह्या जन्मात जी पापं केली आहेत, ती ह्याच जन्मात फेडून जावं लागतं. खरंच असतं का हो असं? कारण ह्यांची पापं इतकी मोठी आहेत, की तीही ती पैसा फेकून पुण्यात बदलून घेतील. 'वजीर' नावाचा एक चित्रपट होता, त्यात शेवटी अशोक सराफाचं पात्र- माजी मुख्यमंत्री- अशा अवस्थेला पोचतो, की अगदी एकटा, एकाकी पडतो, कोणीही ओळखत नाही त्याला! पण हे आजच्या जगात शक्य नाही, कारण देवाची लाठी बसणार तरी कोणाच्या पाठी? सगळेच चोर. ह्या लोकांना कधीच मनातही शरम वाटत नाही का? आपण काय करतोय? ह्याचा परिणाम काय होणारे? किती भयानक खेळ चालू आहे हा?

आणि दु:ख म्हणजे ह्याची झळ त्यांना कधीच बसत नाही, भरडला जातो तो केवळ सामान्य माणूस- असा माणूस ज्याच्याकडे कोणतंही 'बॅकिंग' नाही, 'कनेक्शन' नाही- जो आपलं ज्ञान, कौशल्य वापरून केवळ एक चांगलं स्वच्छ आयुष्य जगू पहातोय! पण त्याला तसं जगू दिलं जात नाही. ज्यांच्या हातात सर्व बदल करण्याची शक्ती आहे, बळ आहे, ते स्वतःची अक्कल विकून बसलेत आणि जे काही करू पहात आहेत, त्यांचं आयुष्य म्हणजे एक न संपणारी शिक्षा झालीये!

तोच हा सामान्य माणूस. आज हळहळेल, व्याकूळ होईल, सरकारला शिव्या हासडेल आणि दोन मिनिटे शांतीसाठी प्रार्थना करेल.
सत्ताधारी नेहेमीप्रमाणेच निष्क्रीय रहातील, अजून भ्रष्टाचार करण्याच्या वाटा शोधतील आणि दोन मिनिटे शांतीसाठी प्रार्थना करेल.
बातमीवाले बातमी देतील 'देशवासी कटू आठवणीत शोकाकूल'.

करण्यासारखं जे काही आहे, ते कोणीच करणार नाही. २६/११ नंतर अजून एखादी तारीख येईल, अजून एक, अजून एक. निष्क्रीयपणा आणि बातम्या त्याच रहातील.
असं म्हणेन, की दुर्दैवाने जे गेले, ते सुटले. आम्ही बाष्कळ बडबड करणारे वाट बघतोय आमच्या सुटकेची.

November 6, 2009

क्रश!

रवा दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोलपंपावर रांगेत उभी होते.. बरीच मोठी रांग होती, हळूहळू पुढे सरकत होती.. माझ्या पुढचा एक माणूस सोडून त्याच्या पुढचा माणसाकडे माझं लक्ष गेलं आणि मला तो उगाचच ओळखीचा वाटायला लागला.. बराच ताण दिला मेन्दूला, पण काही ट्यूब पेटेना.. इतक्यात रांग पुढे सरकली, त्याचा नंबर आला, आणि आम्हीही पुढे सरकलो.. माझ्या गाडीत इंधन टाकून झालं, तोवर तो अजून पंपावरच होता.. मोबाईल कानाला होता.. बोलता बोलता त्याने सहजच मागे वळून पाहिलं आणि मला त्याचा संपूर्ण चेहरा दिसला! आणि क्लिक!!! येस्स्स्स! आठवला..

बापरे! मी कितीऽऽऽऽऽऽ वर्ष मागे गेले.. पार शाळेत- आठवीत. आमच्या शाळेने फोकडान्स स्पर्धेत भाग घेतला होता.. आधी गॅदरिंगमध्येच बसवलेला नाच अजून मोठ्या प्रमाणात बसवणार होत्या बाई.. त्या बाईही नवीनच लागल्या होत्या शाळेत.. हा त्यांच्या मुलीचा मित्र- तेव्हा बहुधा अकरावीला होता.. शाळेआधी तालमी असायच्या तेव्हा बाईंची मुलगी यायची त्यांना मदत करायला- नाचाच्या स्ट्पेस वगैरेसाठी.. तेव्हा हाही यायचा तिच्याबरोबर टेपरेकॉर्डर, माईकसाठी मदत वगैरे करायला.. आधी बहुतेक फक्त मदत म्हणून, आणि नंतर इथे बर्‍याच मुली आहेत, म्हणून नंतरही येत राहिला. आधीच तो दिसायला हँडसम वगैरे, त्यातून कॉलेजकुमार आणि आमचं टीनएज!! आम्हा तमाम (बहुधा) २४ मुलींचा (बहुतांश पहिला) (सामूहिक) क्रश एकाचवेळी झाला तो!! लख्ख आठवतात ते दिवस.. शाळेला तर लवकर जायचोच आम्ही, पण वेळ मिळाला की त्याच गप्पा.. ’आज तो तिच्याकडे बघत होता’, ’आज त्याने मस्त शर्ट घातलाय ना..’, ’आज टीचरकडे त्याचं लक्षच नव्हतं’, ’जरा जास्तच भावखाऊ आहे ना..’, ’तो ’तिच्याशी’ बोलला अगं काल, नाहीतरी त्याच्या पुढे पुढे करायचीच ती!’ इथे बाईंची मुलगी आमच्या खिजगणतीतही नव्हती हा..

फोकडान्सच्या अगदी आदल्या दिवशी रंगीत तालीम होती- ड्रेपरी आणि आमचं आकर्षण म्हणजे मेकप! शिवाय ’तो’ असणार प्रॅक्टीस बघायला, म्हणून जास्तच काळजीपूर्वक रंगरंगोटी केलेली प्रत्येकीने! आणि जसा सामूहिक क्रश झाला, तसाच सामूहिक प्रेमभंगही!! तो चक्क त्या दिवशी त्याच्या अजून एक मैत्रिणीबरोबर आला!! मैत्रिण एकदम मस्त होती (हे तेव्हा मान्य करणं जडच गेलं होतं, हा भाग वेगळा!). ती आता त्याची बायकोच झालीच ह्या खात्रीने आम्हीच आमचे पत्ते कट करून टाकले!! लगेच काहीकाही मुलींनी शहाणपणा करत ’मला नाहीतरी तो जादाच वाटत होता’ वगैरे म्हणत ’आम्ही कशा शहाण्या’ वगैरे ठसवण्याचा प्रयत्न केला, पण सगळ्यांनाच सगळं ठाऊक होतं!

असो! त्याला बघितल्याबरोब्बर कुठलं कुठलं कायकाय आठवलं! आता मी त्याच्याकडे पाहिलं. अगदी मुद्दाम- असं काय होतं बरं त्याच्यात? आज पाहिलं, तर काहीच नाही सापडलं.. नेहेमीसारखाच साधा माणूस होता.. जिथे मी गृहिणी झाले, तिथे तोही गृहस्थ झालाच की! (मनात त्याचं वयही काढून पाहिलं ;-)) हे जाणवल्यानंतर मात्र थोडीश्शी निराशा झाली हं.. म्हणजे जो आपला ’फर्स्ट क्रश’ होता, तो तसाच हँडसम हंक न रहाता, साधा बाईकवर फिरणारा, नोकरीबिकरी करणारा, भाजी-बिजी आणणारा, पेट्रोल भरायला येणारा सामान्य माणूसच असावा ना? हाय रे दैवा वगैरे.. :-)

त्यावरून आठवलं- थोडी मोठी असेन तेव्हा, पण असाच महा-क्रश होता ’मिलिंद सोमण’वर! हाऽऽऽऽय! वगैरे.. पहिल्यांदा त्याला पाहिलं तेव्हा मस्त लांब केस होते त्याचे, काय स्माईल होतं, मधूबरोबरचं अफेयर, ’तो’ फोटो- एकदम फॉर्मात होता.. स्विमिंग चॅम्प असल्याने बांधेसूद शरीर, उंची, देखणा चेहरा, किलर हास्य- आहाहा! कोणत्याही मुलीच्या ’स्वप्नातला राजकुमार’ लेबलखाली पर्रफेक्ट! आणि अगदी तितकं ’आहा’ नसलं, तरी अगदी आत्तापर्यंत मला मिलिंद सोमण आवडायचा.. ह्म्म.. म्हणजे अजूनही आवडतो, पण जरास्सा, बारीकसा भ्रमनिरास झाला ’गंध’ पाहिल्यानंतर- त्याचं मराठी ऐकल्यानंतर! लूक्सच्या बाबतीत प्रश्नच नाही.. साहेब चाळीशीत पोचूनदेखील असे फिट की अजूनही बघऽऽत रहावे! पण त्यांनी मराठी बोलू नये बाबा.. कसलं ते इन्ग्रजाळलेलं, मुद्दाम प्रयत्न करून बोललेलं मराठी? बर्‍याच जणांनी त्याचंही कौतुक केलं म्हणा, पण ’सोमण’ असून ऍक्सेन्टेड मराठी? अंहं, मला तरी पटलं नाही..

असो, ह्या दोन्ही क्रशांमुळे आज ’आपण किती येडचाप होतो’ हे परत एकदा सिद्ध झालं म्हणा, तरी मस्त फ्रेश वाटलं. त्या निमित्ताने मी कुठे कुठे फिरून आले- तो पहिला क्रश- आत्ता तो सामान्य असला, तरी एकेकाळी तो आमचा हीरो होता, हे नाकारता येणार का? पाच मिनिटात त्याने किती जुन्या गल्लीत नेऊन आणलं मला! त्या निमित्तनं शाळेतले नाच, त्यावेळचं सळसळतं वातावरण, कमेन्ट्स, नाचात जावं म्हणून बाईंची केलेली भलावण, मैत्रिणीला दिलेला पाठींबा, तिच्यासाठी बाईंची केलेली मनधरणी.., कायकाय आठवलं! आज त्यातल्या कित्येक मैत्रिणींच्या अजूनही टचमध्ये आहे, तर त्यातल्या अजून कितीतरी कुठेकुठे गेल्यात काय माहिती? टीचर भेटतात, त्यांचं वय झालेलं मात्र सहन होत नाही!

मिलिंद सोमणने तर कॉलेजमध्ये नेलं मला.. अजूनही आठवतंय- त्याचा ’तो’ बहुचर्चित फोटो- इतका घाबरत घाबरत, लाजत लाजत पाहिला होता, आणि अक्षरश: क्षणभर बघून धडधडत्या काळजाने गप्पकन ते पान बंद करून टाकलं होतं.. मधु सप्रेचं लग्न झाल्यानंतर ’आता त्याचं कसं होणार’ वाटून बरेच दिवस अस्वस्थ होते.. ’कुठे तो, कुठे आपण’ असे प्रॅक्टीकल विचारही केला नाही तेव्हा.. कम ऑन, मिलिंदचा प्रेमभंग, म्हणजे मला त्याच्याइतकं वाईट वाटणारच ना! ज्यांना तो आवडायचा नाही, त्यांच्याशी वाद घालघालून तो कसा बेस्ट आहे हे पटवण्यात अनेक तासही घालवले.. त्याकाळी त्याची आलेली प्रत्येक मुलाखत ऐकली, वाचली, बघितली होती..

हे क्रश म्हणजे तरी काय होते? मिलिंद सोमणतर अप्राप्यच, पण ’तो’ मुलगाही.. त्याचा ’तसा’ विचार कधी नव्हता केलेला.. तेवढी अक्कल, समज नव्हतीच तेव्हा.. पण अडोलसन्समध्ये पदार्पण आपण केलंय ही जाणीव त्याच्यामुळे झाली हे नक्की. हे काहीतरी वेगळं आहे, वेगळं असतं हे कळलं होतं.. कसल्या हुरहुरत्या गोड भावना त्या.. त्या परत आठवतानाही मज्जा वाटली.. वाह! काय साधे सोपे मस्त अन्कॉम्प्लिकेटेड दिवस होते ना ते.. जुन्या गोष्टींचं असंच असतं ना? कोणत्या क्षणी कोणती जुनी वस्तू, आठवण, माणूस आपल्या कोर्‍या मनासमोर येईल आणि कोणत्या गावाला आपल्याला घेऊन जाईल काहीच सांगता येत नाही! त्यात्या क्रशच्या निमित्तानं मस्त ट्रीप टू द नॉस्टॅलजिया लेन झाली.. त्या क्रशांचं पुढे काही झालं नाही, तरी ह्या ट्रीपसाठीतरी त्यांचे आभारच!