November 11, 2008

असूया!


दुसर्‍याचं भलं व्हावं म्हणून वाटते ती तळमळ;
अन दुसर्‍याचं भलं झालं, की वाटते ती मळमळ!’

ही ग्राफिटी माहिती असेल, ही वाचल्यानंतर पटकन एक स्मित चेहर्‍यावर आलंही असेल, पण कधी विचार केलाय, हे किती खरं आहे याचा? मी जेव्हा ही ग्राफिटी प्रथम वाचली तेव्हा यातला शाब्दिक खेळ क्षणभर आवडून गेला. पण गेल्या अनेक दिवसातल्या अनुभवांच्या पार्श्वभूमीवर जेव्हा ही ग्राफिटी मी आज परत मेलमधल्या फॉरवर्डमधे वाचली, तेव्हा त्यातले सत्य मनाला भिडले, टोचलेही!

दुसर्‍याचं भलं व्हावं असं खरंच मनापासून किती जणांना वाटत असतं? उलट त्याचं भलं चाललं नाहीये, म्हणूनच तळमळ वाटत असते का? एकदा त्याचं भलं झालं की तळमळ संपते आणि मळमळायला का लागतं? तळमळ आंतरिक असते ना? दुसर्‍याच्या सुखात आपलं सुख, समाधान शोधणारे किती जण राहिलेत जगामध्ये? एखाद्याने काही चांगलं काम केलं असेल, तर मोकळ्या मनाने कौतुक करणारेही सापडत नाहीत सध्या. उलट, ’अरे, तुला कसं हे जमलं? तुला हे येतं, असं येतं हे माहीतच नव्हतं!’, असं उपहासात्मक, त्याची लायकी काढणारं ’कौतुक’ मात्र केलं जातं.

खरंच, कौतुकाचे चार शब्द इतके महाग असतात आपल्याला? मुक्त हस्ते, मोकळ्या मनाने कौतुक करणं इतकं अवघड असतं? जे आपल्याला येत नाही ते दुसर्‍याला आलं तर लगेच त्याच्याबद्दल असूया वाटायला लागते? त्याचं निर्भेळ यश दिसत नाही, त्यातली खुसपटं का काढली जातात? दोन गोड शब्द त्याचा हुरूप वाढवू शकतात याची जणीव का होत नाही? आपणही त्याच्याकडून काही शिकू शकतो हे का समजत नाही? जो वेळ त्याच्यावर धुसफुसण्यात जातो, तोच वेळ नवीन काही शिकण्यात का सदुपयोगी लागत नाही? ’दुसर्‍याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, पण स्वत:च्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही’ ही म्हण खोटी का नाही ठरू शकत? बर, नेहेमी सगळ्यांना चांगलंच म्हटलं पाहिजे असंही नाही, जे चूक आहे ते चूकच, पण ती चूक दाखवायचीही एक पद्धत असते. मुळात त्याने चूक सुधारावी ही इच्छा असेल, तरच व्यवस्थितपणे त्याच्यापर्यंत ती पोचवली जाईल ना! पण इच्छा असते ती एखाद्याला नामोहरम करायची, त्याच्यातला उत्साह संपवण्याची..

खरंतर हा कोण्या एकाचा दोष नाही, हा तर मनुष्यस्वभाव! असूया, हेवा या भावना खरंतर आपल्या स्वत:च्याच प्रगतिसाठी उपयुक्त. माणूस जे आहे त्यात समाधानी राहिला, तर त्याची प्रगती कशी होणार? त्याला उन्नतिसाठी झगडलं पाहिजेच. पण हे झगडणं स्वत:शी हवं ना? ’त्याच्याकडे काय आहे जे माझ्याकडे नाही?’ असा विचार केला, तर आपण स्वत:मध्ये कितीतरी बदल आणू शकतो. पण असूया द्वेषाचं रूप कधी घेते समजतही नाही. ’त्याच्याकडे आलंच कसं, जे माझ्याकडे नाही?’ असं संतप्त रूप घेऊन जे आहे, तेही संपवण्याचं तो काम करतो.

कधी असूया असते वैयक्तिक- दोघांमधली, आपसातली.. ही अशी असूया परवडली. किमान आपल्याला माहीत तरी असतं, आपली गाठ कोणाशी आहे ते! मात्र कधीकधी आपला ज्यांच्याशी कधी संबंधही आला नाहीये असे लोकही आपल्याशी कारण नसताना वैर बाळगून आहेत हे जेव्हा समजतं तेव्हा सुन्न व्हायला होतं. तंत्रज्ञान जसजसं पुढे गेलं, तसतसं त्याचे तोटेही दाखवत गेलं.. माणसं जशी एका टीचकीच्या अंतरावर आली, तितकीच ती vulnerableही झाली. इंटरनेटला चेहरा नाही, त्यामुळे एरवी ते स्पष्टपणे, रोखठोकपणे बोलता, करता येणं शक्य झालं नसतं, तेही सहज जमू लागलं.. आणि असूया, हेवेदावे, गैरसमज निर्माण होणे आणि करणे म्हणजे दोन टीचक्यांचे खेळ झाले. यांकडे कितीही दुर्लक्ष केले, आयडीज ब्लॉक केले, इग्नोअर केले, तरी मन:स्ताप टळतो का? आभासी जग सत्य जगावर पकड घ्यायला लागतं आणि कधीतरी आपलं आपल्यालाच नवल वाटायला लागतं, ’मी खरंच इतकी वाईट आहे का, की माझ्या आनंदात कोणालाच आनंद वाटत नाही?’ कल्पना करू शकता, फार भयानक असतो हा विचार.

सर्वात क्लेषकारक असते मात्र आपल्या लोकांची असूया. आपण ज्यांना आपले मित्र मानतो, आपले हितचिंतक मानतो त्यांचे आपल्याबद्दलचे खरे विचार जेव्हा अचानक आपल्या समोर येतात, तेव्हा मात्र अतीव दु:ख होतं. कौतुकाचे दोन शब्दही उत्स्फूर्तपणे आपली माणसं आपल्यासाठी देऊ शकत नसतील, तर खरंच आपण त्यांना ’आपली’ म्हणू शकतो का? का, ती ’आपली’ कधी नसतातच? आपल्यालाच हौस असते गोतावळा जमवण्याची आणि येईलजाईल त्याला ’आपला’ असं लेबल चिकटवण्याची? चार खरोखरचे हितचिंतक आसपास असणं आजकाल खरंच चैनीची गोष्ट झालीये!

देवकृपेने, मला आजपर्यंत कोणाचीच, कश्याहीबद्दल असूया वाटलेली नाही, कोणाचं कौतुक करण्यात मी कचरत नाही आणि मला त्यात कमीपणाही वाटत नाही. देवाशी हीच प्रार्थना की हे शब्द, या भावना माझ्यापासून दूरच राहोत. आणि शक्य असेल तर बाकीच्यांपासूनही...

7 comments:

मिलिंद छत्रे said...

hmm agadi khare aahe.. aalikadachyaa kaahi ghaDaamodI paahilyaa ki tu bolates tyaat tathya aahe he disate..

problem haa aahe naa ki ithe mhanaje jagaat pratyek jaN svata:laa faar shahaaNaa samajat asato. mI kitI hushaar, malaa kaay kaay yete, mi yaav mi tyaav haa jo 'mI' paNaa aahe naa toch hyaa sarva goshtIMchyaa muLaashi aahe.

tyaamuLe bhal hvaave hi ji taLamaL asate tI paN hyaa 'mi' paNaatUn aalelI asate mhanaje 'mI' tujhe bhale vhaave mhanUn tulaa madat kelI, 'mI' sallaa dilaa vagaire vagire.. paN ekadaa tujhe bhale jhaale ki are arechyaa hi ashi koN aahe maajhyaapuDhe.. malaa tar hichyaapekshaa kititari paT jaast yete mag maajhe kaa naahI bhale jhaale asaa vichaar suru hoto aani tyaachech pudhe asuyaa aani dveShaat rupaaMtar hote..

jaunde khupach motthi pratikriyaa lihili

Milind

सर्किट said...

चालायचंच! माझा एक डच कलिग/मित्र मला म्हटला होता, "There are suckers everywhere around you. They suck-out all positive energy and happiness out of you. It's up to you whether you decide to succumb to them, or not."
कुठल्याकुठे परदेशात वेगळ्या संस्कॄतीत वाढलेल्या/राहिलेल्या त्यालाही असे ४ फ़ण्डे हाताशी ठेवावेसे वाटले हे पाहून कळलं भलीबुरी माणसं सगळीकडे सारखीच.

नितिन चौधरी said...

mala ek sangawasa watata..apan apla karma karat rahawa..loka kay mhantil kiwa kay boltil ekde hetupuraskar kanadola karawa..karan kawlyachya shapane Gay marat nahi..
Ani asuya asne ha ekhadyacha swabhaw asu shakto..swabhaw fakta tya wyaktinech pryatna kela tar badalu shakto..annyatha ram Bharose...

Unknown said...

barobar aahe tujha .. सर्वात क्लेषकारक असते मात्र आपल्या लोकांची असूया>>asa kahi anubhav yeun gelyane aagadi patala..

Dk said...

खरंतर हा कोण्या एकाचा दोष नाही, हा तर मनुष्यस्वभाव! असूया, हेवा या भावना खरंतर आपल्या स्वत:च्याच प्रगतिसाठी उपयुक्त.>>> many aahe! pan mulaatch asuyaa hee insecurity tun utppn zaaleelee aste! jar insecurity, competition nsel race nsel tar asuya hi nsel g kdaachit aataa hech bgh na amchya campus saathee 1 mulgi mhnaali mi naahee basnaar campus la>> mhnje may be tila bhitee ,heva, competition hyaatuun honaree insecurity hi naahee!! well udaaharn chu keech asel pan sadhya campus shivaay dusere kaahee bolne ktheench aahe. nywz nehmeeprmaanech post chaan aahe he sangaaylaa nakoch....

oopsssss me te saangitlch ke g aataa!

Deep

Shit happens life goes on....

Anonymous said...

Really true!

अभिजित पेंढारकर said...

पूनम ताई,
ग्राफिटीचा उल्लेख केल्याबद्दल धन्यवाद!

तुम्ही लिहिताही अगदी मनापासून!