December 2, 2008

जबाबदार वार्तांकन!

जबाबदार वार्तांकन म्हणजे काय? जी घटना झाली आहे तिचा सर्व कोनांमधून सांगोपांग आढावा घेऊन तो लोकांसमोर आणणे. हे मुळात कशासाठी? तर, अनेक गोष्टी या सामान्य जनतपासून लपवल्या जातात, किंवा लपतात. तर आपल्या आसपास काय चालले आहे हे सर्वांना समजावे, अन्याय असेल तर त्याला योग्य ती वाचा फोडली जावी, काही चांगले असेल तर ते सर्वदूर पोहोचावे हा उद्देश्य. परंतु, हे आज साध्य झाले आहे का?

फार पूर्वी, जेव्हा दूरदर्शन हे एकच माध्यम होतं, तेव्हा सरकारी बातम्या जे खाद्य देतील ते आणि तेवढंच आम जनतेला चघळायला मिळायचं. पण, टीव्ही चॅनल खुले झाले, खासगी झाले आणि हे दृष्य बघताबघता बदलले. काही काही टीव्ही चॅनलनी फक्त बातम्या प्रक्षेपित करायला सुरुवात केली. सुरुवातीला हे खूपच ’एक्सायटींग’ वगैरे होते. २४ तास बातम्या! कधीही पहा- दिवसरात्र देश-विदेशच्या बातम्या. पण २४ तास सारखे दाखवायचे तरी काय?- असा प्रश्न भेडसावू लागला! त्यामुळे, एका छोट्या घटनेचीही बातमी व्हायला लागली, बातमी नसेल तर ती खूबीने बातमी करता येऊ लागली. मग अगदी ’गावात कुत्री फार झाली आहेत’ पासून ’अमूक मंत्री सकाळच्या नाश्त्याला सफरचंदाचाच रस पीतात’ पर्यंत कशाचीही बातमी ’ब्रेकिंग न्यूज’ या नावाखाली चालू लागली. हे सर्व खपून गेले, लोकांनी याकडे बातमी कमी आणि करममणूक जास्ती या नजरेने पाहून सवय करून घेतली. अनेक मोठ्मोठ्या समूहांच्या, वृत्तपत्रांच्या, कॉर्पोरेट हाऊसेसच्या वृत्तवाहिन्या एकापाठोपाठ एक सुरू झाल्या आणि ’आम्ही वेगळे आहोत’ असे म्हणत सगळे एकमेकांचाच कित्ता गिरवायला लागले.

पण हे कुठपर्यंत? ’चॅनल चालू राहणं महत्त्वाचं, मग कशाचीही बातमी केली तरी चालेल’ असं म्हणत या वाहिन्यांच्या चालक-मालकांनी अक्षरश: स्वत:ची सदसदविवेकबुद्धी विकली. मुंबईचा दहशतवादी हल्ला हा तर सगळ्याचाच कळस होता. पहिली गोष्ट म्हणजे हा हल्ला इतका धक्कादायक होता, की पहिले काही तास या बातमीवर विश्वासच बसला नाही. परंतु वृत्तवाहिन्यांच्या कृपेने सगळेच ’लाईव्ह’ दिसत असल्याने रक्ताचे सडे, बंदोबस्तासाठी ठिकठिकाणी उभे असलेले पोलिस, त्यांच्याकडे असलेली शस्त्रे, कोणते अधिकारी कुठे निघाले आहेत आणि ’आता या क्षणी तुम्हाला काय वाटत आहे?’ असे संतापजनक प्रश्न- हे सगळे सगळे दिसले. जसे तुम्हा आम्हाला दिसले, तसेच दहशतवाद्यांच्या खबर्‍यांना आणि त्यांना मदत करणार्‍यांनाही दिसले. जे लोक सॅटेलाईट फोन वापरत होते, त्यांच्याशी संपर्क साधण्यात काय अडचण असणार होती? कोणते फोर्सेस मदतीला येत आहेत, कधी येत आहेत, कुठे आहेत- सर्व लाईव्ह खबरी द्यायला न्यूज चॅनल होतेच ना तत्पर! तरी पण यांना आपण देशहिताविरुद्ध चुकून काहीतरी करत आहोत याचा संशयही आला नाही! ’वार्तांकनात मीच कसा पुढे, माझाच चॅनल कसा सगळ्या बातम्या देतो, ’कोणाला काय वाटतंय’ हे कसं मलाच माहिती....’ या दर्पोक्त्यांमुळे आपण किती संवेदनशील बातम्या दहशतवाद्यांना बसल्या बसल्या पुरवतोय हे यांच्या ध्यानातही आले नाही! बरं, यांच्या नाही, तर किमान सरकारच्या तरी आले. म्हणून यांना ’लाईव्ह’ प्रक्षेपण करायला बंदी घातली, तरी यांना त्यातले गांभीर्य कळू नये???? यांनी या बंदीचीही बातमीच केली!!! ’आम्ही सगळेच नाही दाखवू शकत आत्ता, कारण देशहिताचा प्रश्न आहे, पण आमचे लोक इथेच आहेत, इथून असा गोळीबार होतोय, तिकडून अशी आग लागलीये’... करत पुन्हा सुरूच! कहर म्हणजे एक मिनिट उशीराचे प्रक्षेपण करून यांनी ’लाईव्ह’ कव्हरेजवरही पळवाट काढली!

कोणाचे किती नुकसान झाले, याला हे न्यूज चॅनल स्वत: साक्षीदार आहेत. अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मृत्यूला हेच जबाबदार आहेत असं म्हणलं जातं. हे विधान जरा अतिरंजित वाटले, तरी झटकन नाकारावे असेही नाही! परंतु, दुसर्‍या दिवशी चर्चगेटला गोळीबाराची अफवा पसरवण्यात मात्र केवळ न्यूज चॅनलचाच हात होता! इतके एकेकाळचे निर्भिड आणि डॅशिंग पत्रकार आता या वाहिन्यांवर काम करतात, एकालाही मनातूनसुद्धा स्वत:च्या या उलट्या कर्तृत्त्वाची शरम वाटली नसेल का? खातरजमा न करता बातम्या द्यायच्या आणि मग माफी मागायची? पोलिसांना, यंत्रणेला, सामान्य माणसाला वेठीला धरायचे तरी किती?
आता ही मागणी पुन्हा एकदा पुढे येत आहे की वृत्तवाहिन्यांना आचारसंहिता असावी. कोणत्या बातम्या लाईव्ह दाखवायच्या आणि कोणत्या नाही हे सरकारने ठरवावे. हाच मुळात खटकणारा मुद्दा आहे. या वृत्तवाहिन्यांमधे एकसे एक विद्वान, ’परदेशात’ शिकलेले, खडतर जागी जाऊन, राहून वार्तांकन केलेले असे अतिरथी महारथी आहेत, तर यांना स्वत:च्या जबाबदारीवर एक साधी आचारसंहिता नाही करता येत? तीही यांना कोणीतरी करून द्यावी लागते? कशासाठी? तर त्यातल्या पळवाटा शोधून काढण्यासाठी? यांच्या वृत्तवाहिनीचा मूळ उद्देश्याशी जरी ते प्रामाणिक राहिले तरी कितीतरी सकारात्मक बदल होतील. आज आसपास कितीतरी बातम्या आहेत, त्यांच्यावर काम करा ना. आज सामान्य माणूस कित्येक चिंतांखाली दडपून गेला आहे, त्याला वाचा फोडा. सरकारी यंत्रणेचा हस्तक्षेप नको असेल, तर त्यांच्याशी सहकार्य करा. लोकशाहीचा चौथा स्तंभ स्वत:ला म्हणवून घ्यायला आपण लायक आहोत का हा प्रश्न या माध्यामाशी निगडीत असलेल्या प्रत्येकानी स्वत:च्या मनालाच विचारला तरी बरेच काही साध्य होईल.