January 21, 2009

स्वयंशिस्त!

मी ट्रॅफिकचे नियम पाळते!’ हे लवकरच एक विनोदी वाक्य होईल असं वाटायला लागलंय, कारण रोजच सरळसरळ ट्रॅफिकच्या नियमांचं उल्लंघन करून गाड्या हाकणारे अनेक वीर मला घडोघडी दिसतात. ’लाल दिव्याला थांबायचं असतं’ हे शाळेत पहिल्या इयत्तेत शिकलेलं बहुधा अख्ख्या रस्त्यावर मला एकटीलाच आठवत असतं, कारण अक्षरश: एखाद्या सिग्नलला लाल दिवा पाहून मी एकटीच थांबलेली असते.. माझ्या पुढचे, मागचे सगळे निघून जातात! त्यांचं काही बिघडत नाही, मग एकटी मीच ट्रॅफिकचे नियम पाळून विनोदीपणा नाही का करत?

धावपळ कोणाला चुकली आहे? ऑफिसमधले पंचिंग मशिन मला एकटीलाच काय, तर तमाम नोकरदारांना सकाळी उठल्यापासूनच दिसत असतं. पण ते काहीही करून गाठण्यासाठी लोक पाच मिनिटं लवकर आवरून निघण्याऐवजी ट्रॅफिक नियम का तोडतात? अर्थात, काही महाभाग केवळ उद्दामपणा करून दिवसाच्या कोणत्याही प्रहरी नियमबियम पाळायच्या भानगडीत कधीच पडत नाहीत. रस्ता जेव्हा आपण एक जबाबदार नागरिक म्हणून वापरतो, तेव्हा तो योग्यपणे वापरणे ही आपली जबाबदारी नाही का? फक्त वाहतूकीसंबंधात पाहिलं, तर सिग्नल न पाळणे हा खूनाइतकाच गंभीर गुन्हा नाही का? सध्या वाहनचालकांचा बेदरकारपणा इतका वाढला आहे की मागून जोरजोरात हॉर्न वाजवणे, ओरडाआरडा करणे, प्रसंगी शिव्याही देणे हे सर्रास घडू लागलंय- आणि कोणाला? तर, लाल सिग्नल आहे म्हणून एखाद्या थांबलेल्यालाच! नंतर असे कटाक्ष मिळतात की जणू लाल दिव्याला थांबणं म्हणजे अडाणीपणाचं लक्षण! ’थांबलाय का? जा आणि मुख्य म्हणजे आम्हाला जाऊद्या!’ ही परिस्थिती ओळखून प्रशासनाने ट्रॅफिक वॉर्डन नेमले, तर लोकांनी चक्क त्यांच्याच अंगावर गाड्या घालून त्यांना जखमी केले!! म्हणजे, खरोखर आता खूनच पडायचे बाकी राहिलेत? कश्यापायी? तर साधे वाहतूकीचे नियम पाळावेत ’सभ्य’ जनतेने म्हणून?

कहर म्हणजे एरवी या सिग्नलना न जुमानणारे लोक मोबाईलची रिंग वाजली, एखादा ओळखीचा चेहरा दिसला की कच्चकन ब्रेक दाबून भर रस्त्यामध्ये वाट्टेल तिथे थांबतात. चौकामधला मोठा लाल दिवा यांना दिसत नाही, पण भर गर्दीतले मित्र, मैत्रिणी मात्र लग्गेच दिसतात. मग आपण कुठे आहोत, किती लोक आपल्या आसपास आहेत याचा काहीही विचार न करता जागच्याजागी थांबलेच! रस्त्यामधे येणार्‍या तमाम देवळांपाशी थांबून नमस्कार टेकवला नाही, तर केवढं पाप वाढेल, त्यामुळे तिथेही थांबणं आलंच. आता देवळंच रस्त्यांच्यामधे बांधली आहेत, त्याला हे भक्त तरी काय करणार? भर रस्त्यामधे असलं तरी हरकत नाही, पण बाकी लोकांची गैरसोय करून नमस्कार हा केलाच पाहिजे. ज्या लोकांना याचा त्रास होतो, तेच पापी, घोर अज्ञानी!

पीएमपीएल बसेसबद्दल म्या पामराने काय बोलावे? ’मला अभिमान आहे मी वाहतूकीचे नियम पाळतो’ इतकं छापिल खोटं केवळ तेच बोलू शकतात. पुढे असलेल्या दुचाकीस्वाराला मागून दाबणे, सिग्नल तोडणे, बीआरटीसारख्या मार्गावरही सुसाट गाडी हाकणे, बस ही स्टॉपवर न थांबवता त्याच्या आसपास कुठेही थांबवणे हे तर रोजचेच! साधे झेब्रा क्रॉसिंगवर गाडी न थांबवणे हे पथ्य पळत नाहीत म्हणून बसचालक दंड भरतात, पण गाडी पुढेच थांबवणार! हे बरे असे सहा आसनी रिक्षा चालक. दिसलं ग्राहक की थांब! रिक्षा भरणं महत्त्वाचं, मग कुठेही, कसंही थांबून ती भरली तरी चालेल. यासर्वामधे वाहतूकीचे नियम कुठे येतात? या पायी किती वाहनस्वार रोज बळी पडतात याची पर्वा कोणाला आहे? तरूण, तरूणी आपले जीव गमावत आहेत, याची खन्त आणि जाणीव परिवहन खात्याला का होत नाहीये?

..कारण इतक्या वाईट परिस्थितीला ’मामा फॅक्टर’ तितकाच कारणीभूत आहे. फार काळापासून चिरीमिरी घेऊन त्यांनी अनेक नियमांचं उल्लंघन डोळ्याआड केलं, वाहनचालकांना डोक्यावर बसवलं, कितीतरी गोष्टींकडे काणाडोळा केला.. आणि आता शहरातली एकूणच वाहनसंख्या हाताबाहेर गेल्यानंतर यांना थोडी जाग आली आहे. पण परिस्थिती कधीच हाताबाहेर गेली आहे. रस्ते नुसतेच मोठे करून, किंवा बससाठी वेगळे मार्ग करून, किंवा फ्लायओव्हर बांधून काय साधणार आहे? मुळात जी वाहतूक शिस्त आहे ती नागरिकांमध्ये बाणवण्यासाठी परिवहन खात्याने काय केले आहे? साधा परवानाही ते कोणतीही परिक्षा न घेता, पैसे दिले की देतात.. आता चौकाचौकात ट्रॅफिक वॉर्डन, हवालदार वगैरे उभे असतात, पण लोक त्यांनाही जुमानत नाहीयेत, कारण त्यांना माहीत आहे, की जरी पकडले गेलो, तरी प्रकरण मिटवता येतयंच. त्यातूनही हवालदार आहे म्हणून लाल दिव्याला थांबणारे, त्याची पाठ फिरली की पुन्हा कुत्र्याच्या शेपटाप्रमाणे वाकडे होतातच.

सध्या सगळ्यांनाच आपापल्या जबाबदारीची जाणीव होणे महत्त्वाचे आहे असे मला वाटते. मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर सगळीकडेच नागरीकांच्या भावनांचा कडेलोट झाला. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी काय केले पाहिजे हे सल्ले चौकाचौकात चर्चिले गेले. पण एक जबाबदार नागरीक म्हणून आपले काय कर्तव्य आहे याचा विचार किती जणांनी केला? सार्वजनिक ठिकाणी योग्य असे वर्तन आपले आहे का याचा विचार किती जण करतात? सर्वच जागी स्वयंशिस्तीची आवश्यकता असताना पोकळ गप्पा मारणारेच जास्त का दिसतात? साधे वाहतूकीचे, सार्वजनिक स्वच्छतेचे नियम आपण पाळत नाही. पण देशाची प्रगति ’आमच्याकडे हे असलंच’ असं म्हणत होत नाही. नुसती हळहळ काय कामाची? यासाठी प्रत्येकाचं योगदान महत्त्वाचं आहे. सुरूवात तरी शिस्तीने, कायद्याच्या कडक अंमलबजावणीने करावी लागेल. सरकारी कारभार कडक झाला की हळूहळू नागरीकांमध्येही चांगल्या सवयी भिनतात. हे अवघड आहे, पण होण्यासारखे आहे. घडोघडी अमेरिकेची उदाहरणं आपल्यासमोर आहेत. ट्रॅफिकची शिस्त का घेत नाही आपण त्यांच्याकडून?

आपण सर्वांनीच थोडा वेळ स्वत:शीच विचार केला, आणि तसे आचरणही केले, तर बरेच काही साध्य होण्यासारखे आहे! देशातले सर्व नाही, तरी किमान सुशिक्षित नागरिक जेव्हा सुधारतील तो दिवस खरा सोनियाचा होईल.

January 3, 2009

शुभेच्छा!

वीन वर्षाचे आपण नुकतेच स्वागत केले.. (नवीन इंग्रजी वर्षाचे, असे म्हणूया :)) त्यानिमित्ताने आपल्या सर्वांचे मोबाईलचे इनबॉक्स, ईमेलचे इनबॉक्स, अगदी ऑरकूटवरचे स्क्रॅपबूकही शुभेच्छांनी भरून, वाहून गेले असेल.. हा एक नवीन ट्रेन्ड झालाय हल्ली. इन्टरनेट आणि मोबाईलने आपल्या जीवनात अनेक बदल आणले. त्यातलाच हाही.. लोकांचा संपर्कात अगदी सहज राहता येतं, एकाच वेळी अनेक लोकांशी संपर्क साधता येतो. ईमेल तसे नवीन होते, तेव्हा आठवा ’फॉरवर्ड मेल’ यांची संख्या! वेड लागल्यासारखे असे मेल्स आपल्याला यायचे, आणि आपणही लोकांना अश्या मेल्स पुढे पाठवायचो. कालांतरानी याचा ओघ कमी झाला, पण त्याची जागा आता फॉरवर्ड एसएमएसने घेतली, इतकंच! इकडे चलनातले दहा पैसे कधीचेच नामशेष झाले, पण मोबाईल कंपन्या चक्क दहा, चाळीस वगैरे पैश्यात एकमेकांच्या संपर्कात रहाण्याची सोय देत आहेत, आणि त्याचा फायदा त्यांच्या ’टार्गेट कस्टमर’, अर्थातच तरूण वर्गाने घेतला नाही, तरच नवल! अर्थातच मोबाईल कंपन्यांच्या जाहिराती आकर्षक असतातच. ’फ्रेंड्ज ग्रूप कॉल्स फक्त १० पैश्यात’, ’रात्री ११ ते सकाळी ६ फुकट एसएमएस’, ’रोमिंगचे दर ३०%ने घटले’, इत्यादि. मोठमोठ्या कंपन्यांमधे कर्मचार्‍यांच्या सुविधेसाठीही मोबाईल कंपन्या मुद्दाम स्पेशल ’टॅरिफ प्लॅन्स’ देतात, त्यायोगे कर्मचारी एकमेकांमध्ये जवळपास फुकट बोलू शकतात.

या सगळ्याचाच परिपाक म्हणजे एकमेकांना एसएमएस करणं- वेळ जात नसला की, कारण आहे म्हणून, कारण नाही म्हणून, ठावठिकाणा कुठे आहे हे समजावं म्हणून, आणि सध्याचं कारण म्हणजे ’कोणतातरी सण आहे किंवा महत्त्वाचा दिवस आहे, म्हणून त्याच्या शुभेच्छा देण्यासाठी’! भारतात तर काय, सणांची रेलचेलच! दर महिन्यात काही ना काही आहेच, नसेल तर पाश्चिमात्य देशाकडून आयात केलेला कोणतातरी ’डे’ आहेच. फेब्रुवारीत सण नाही, पण व्हॅलेंटाईन डे सारखा प्रेमीजनांचा जागतिक महत्त्व असलेला अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो, त्या दिवशी प्रिय व्यक्तिला समोरासमोर काही बोलण्यापेक्षा, एसएमएस करणं सोयीच, नाही का? मे महिन्यात अजून काहीच नाही, तर ’मदर्स डे’! एरवी आईला कामाशिवाय हाक न मारणारे आपण, त्या दिवशी मात्र ’मातेची थोरवी’ सांगणारा एसएमएस तिलाच करायला कसे विसरू? हे पुरत नसतील, तर फादर्स डे, बॉस डे, फ्रेंडशिप डे, नवीन वर्षाचा पहिला दिवस, वर्षाचा शेवटचा दिवस, नोकरीतला पहिला/ शेवटचा दिवस, लग्नाचा वाढदिवस, नुसता स्वत:चा, आणि शेकडो मित्रमैत्रिणींचे वाढदिवस हेही वर्षभरात हजर आहेतच. बघा, कित्ती कारणं आहेत एकमेकांना एसएमएस करण्याची! या दिवशी तुम्ही तुमच्या ऍड्रेसबूक मधल्या लोकांना एक तरी एसएमएस करत नसाल, तर उपयोग काय तुमच्या मोबाईलचा? (फक्त इनकमिंग कॉल्स घेता वाटतं? लब्बाड!)

तर या संधीचा सगळेच फायदा घेत आहेत असं मोबाईल सर्व्हिस देणार्‍या कंपन्यांच्या लक्षात आले. लोक ’एसएमएस’ या सुविधेचे अगदी गुलाम जरी झाले नाहीत, तरी तो प्रकार त्यांना आवडू लागला. ’स्वस्तात संपर्क’ ही कल्पना तशी मोहक आहेच. मग या कंपन्यांनी हळूच काय केलं? लोक एसएमएस केल्याशिवाय राहू शकणार नाहीत, अशी खात्री पटल्यावर त्यांनी वर्ष्भरातले हे ’स्पेशल दिवस’ कोणते याची यादी केली. या दिवशी हमखास एसएमएस यांचा ओघ प्रचंड वाढतो असे हे दिवस होते. त्यांनी बारीक अक्षरात हळूच मग या दिवशी एसएमएसचे शुल्क वाढवले. जर एरवी फुकट असतील, तर त्या दिवशी एक रुपया, जर एरवी एक रुपया असेल, तर त्या दिवशी दोन रुपये असे. पण आपण रुपया दोन रुपयांच्या कितीतरी पुढे आलो असल्याने, एसएमएसच्या संख्येत फारसा फरक पडला नाही! एक तर सर्व ग्राहकांना असं बिलिंग होतंय हे समजायलाच एक महिना जावा लागला. पण तोपर्यंत दुसरा ’स्पेशल दिवस’ येऊन उभा ठाकला होता ना! आधीच्या सर्व स्पेशल दिवसांना आपले एसएमएस जाणार आणि आता एक रुपया घेतात म्हणल्यावर एसएमएस करायचे नाहीत होय! इभ्रत, इज्जतका सवाल होता है भाई! लोकांनी अर्धा डोळा एसएमएस बिलवर ठेवून दीड डोळ्याने एसएमएस केलेच, फारतर ५-१० लोक गाळले असतील यादीतून! पण लोकांपर्यंत आपला एसएमएस जाणं महत्त्वाचं! त्यामुळे स्पेशल दिवसांना ढीगभर एसएमएस येणं चालू राहिलंच, किंबहुना वाढलंच!

मेलमधल्या शुभेच्छांचं एक बरं असतं, त्याचा आपल्याला ’ऍलर्ट’तरी मिळत नाही. आपण जेव्हा मेलबॉक्स उघडू, तेव्हा मेल्सचा पाऊस पडेल. हे एकवेळ चालतं, पण एसएमएसचा ऍलर्ट टोन मात्र वेळीअवेळी वाजतो! आता यावर उपाय म्हणून मोबाईल ऑफ ठेवणे, किंवा सायलेंट ठेवणे हा सोपा आहेच, पण अश्या वेळी नेमका महत्त्वाचा, खरोखरच्या कामाचा एखादा एसएमएस किंवा कॉल येतोच! आणि तो आला आहे, असं आपल्याला जेव्हा वाटतं, तेव्हा नेमका असा ’शुभेच्छुक एसएमएस’ असतो, हो की नाही? शुभेच्छा द्याव्यातच, छान वाटतं, हे मीही कबूल करते. पण असे वीसेक मेसेजेस आले, की शुभेच्छांमधली गंमत थोडी कमी होते, असं मला वाटतं. नंतर नंतर तर चक्क अश्या मेसेजेसकडे ’असेल कोणाचातरी एसएमएस, बघू नंतर’ असं म्हणत बघण्याचाही कंटाळा केला जातो असा माझा अनुभव आहे. कधीकधी एसएमएसच्या प्रचंड ट्रॅफिकमुळे दुसर्‍या दिवसापर्यंत ते मेसेजेस येत रहातात, तोवर तर ती शुभेच्छा द्यायची वेळही निघून गेलेली असते!

अर्थात, अश्या ’स्पेशल दिवशी’ मला एकही एसएमएस किंवा इमेल आली नाही, तर मला वाईट वाटेल असंही मी कबूल करते. तेव्हा, हे लिखाण फार मनावर घेऊन कोणी शुभेच्छांचे एसएमएस किंवा मेल करणं सोडू नका, फक्त थोडे तारतम्य बाळगा असं सांगायचं होतं. शुभेच्छांकडे कोणाचं दुर्लक्ष होऊ नये, इतकीच छोटीशी ’शुभ-इच्छा’. हे वर्ष आपल्या सर्वांनाच शांततामय जावो!