August 22, 2011

समुद्र

रसग्रहण: 'समुद्र' - लेखक मिलिंद बोकील

लग्न हा टप्पा दोन व्यक्तींचं आयुष्य़ कायमस्वरूपी बदलून टाकतो. ह्या नंतरच्या प्रत्येक मोठ्या टप्प्यावरचे ते साक्षीदार असतात. लग्न झाल्यानंतर एकमेकांची खरी ओळख- शरीराची आणि मनाची हळूहळू होत जाते. त्या ओळखीच्या खुणा साठवत प्रवास चालूच राहतो- लग्न, नंतर मुलं, त्यांचं मोठं होणं, त्याचबरोबर नोकरी व्यवसायात स्थिरावणं, वाढणं, मध्यमवर्गातून उच्चमध्यमवर्गाकडे वाटचाल- सगळं कसं आखीवरेखीव रेषेवरून एकमेकांच्या संगतीनं. लग्नाला साधारण वीसबावीस वर्ष झाली, की नवरा बायकोला एकमेकांबद्दल परिचित नसलेलं काहीच नसतं बहुधा- का तरीही काहीतरी असतंच? एकमेकांमध्ये शब्दश: विरघळून गेलेले दोघं जेव्हा भूतकाळात त्यांच्यापैकी एकाला व्यक्तीश: आलेल्या अनुभवाला अचानक सामोरे जातात, तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया कशा असतात? जोडपं म्हणून? व्यक्ती म्हणून? आणि त्यांच्या त्यानंतरच्या दांपत्यजीवनावर त्याचा काय आणि कसा फरक पडतो? मिलिंद बोकीलांची ’समुद्र’ ही छोटेखानी कादंबरी आपल्याला ह्या सर्व प्रवासातून घेऊन जाते.

भास्कर आणि नंदिनी ही दोनच मुख्य पात्र कादंबरीत आहेत. सर्व कथा त्यांच्याभोवतीच घडते. हे दांपत्य खूप वर्षांनी एका समुद्रालगतच्या रिसॉर्टवर निवांत सुट्टी घालवायला आले आहे. ह्या रिसॉर्टच्या समोर अथांग समुद्र आणि मागे मोठा डोंगरकडा आहे. अतिशय रम्य अशा ह्या ठिकाणी भास्कर त्याच्या आणि नंदिनीच्या आयुष्याचा वेध घेतो. समुद्र आणि डोंगर ह्या स्थळांचा वापर लेखकाने सुरेख करून घेतला आहे. पुस्तकाच्या उत्तरार्धात ह्या जागा रूपकं म्हणूनही खुबीनं वापरल्या आहेत.

भास्कर एक बर्‍यापैकी मोठा उद्योजक आहे. पुष्कळ वर्ष केलेल्या कष्ट आणि धडपडीनंतर आता त्याचा ’पाणी शुद्धीकरण यंत्रणा’ तयार करण्याचा व्यवसाय बर्‍यापैकी स्थिरावला आहे. व्यवसायाच्या निमित्ताने घरी समृद्धी आली आहे. भास्कर एक सरळ माणूस आहे. काहीसा अबोलही. नंदिनीवर त्याचं मनापासून प्रेम आहे. तो एक टिपिकल नवरा आहे. नवरा बायकोत लपवण्यासारखं काही नसतं अशी त्याची पक्की धारणा आहे. जे काही आहे, ते माहितच असतं आणि जे नसतं ते हक्काने सांगायचं किंवा मागायचं असतं असं त्याचं साधं लॉजिक आहे. त्याची बायको नंदिनी ही गृहिणी आहे. मनानी अतिशय सरळ, पारदर्शी आणि काहीशी मनस्वी. तिचंही आयुष्य भास्करभोवती केन्द्रित आहे. तो जसं म्हणेल तसं ती नेहेमीच करते, अगदी समरसून करते. पण ती स्वत:हून कशातच पुढाकार घेत नाही, हे शल्य भास्करला कायम टोचत असतं. नंदिनीला एकटं सोडलं, तर पुस्तक वाचनात ती स्वत:ला उत्तम रमवू शकते. तिचा विरंगुळा भास्करवर अवलंबून नाही, कारण भास्कर आजूबाजूला असण्याचीच तिला सवय नाही. मात्र निवांतपणे नुसतं पडून राहण्यासाठीसुद्धा भास्करला नंदिनीची गरज लागते. सुरुवातीच्या काही पानातच हा पात्रपरिचय लेखक छोट्या प्रसंगांमधून करतो, तेव्हाच लेखनाचा वेगळेपणा समजायला लागतो.

जरी आपण एका व्यक्तीला संपूर्णपणे ओळखून असलो, तरी मनातून तिची एखादी सवय, एखादी लकब- जी आपल्याला आवडत नाही, ती तिने केली की जरासं खट्टू व्हायला होतंच की नाही? एखाद्या माणसावर त्याच्या सर्व गुण-दोषांसकट स्वीकारणं हे खरोखर अवघड असतं. त्या आपल्याला नकोशा सवयी आपण सतत आपल्यापरीने सुधारायचा प्रयत्न करत असतो. भास्करचं नंदिनीवर प्रेम असलं तरी तिचं स्वत:तच रमणं, एकटीनेच पुस्तक वाचणं, वा समुद्राकडे टक लावून बघत बसणं त्याला सतत टोचत राहतं. तो अबोल असला, तरी आत्ममग्न नाही. निवांत सुट्टीला आल्यावर फिरणं, जेवणं हे दोघांनी एकत्रच केलं पाहिजे, तिथे परत एकेकट्याने सूर्यास्त बघणे वा चक्कर मारायला जाणे वगैरे त्याला पसंत नाही. प्रौढ वयातही शरीर कमावण्याची हौस असलेला आहे. त्याला नंदिनीचं थोडं चाललं तरी दमून जाणं फारसं पसंत नाही. हे एकमेकांचे छोटे छोटे दोष, किंवा एकमेकांच्या न आवडणार्‍या गोष्टी मनाच्या तळात नकळत साठवलेल्या असतात आणि एखाद्या वादाचं निमित्त झालं, की मात्र तेच दोष ऊग्र स्वरूप धारण करून समोरच्यावर वार करायला बरोब्बर वापरले जातात. माणसाच्या ह्या स्वभावविशेषांचा असा समर्पक वापर जागोजाग केलेला आहे, की भास्कर आणि नंदिनीची व्यक्तीरेखा अगदी स्पष्टपणे आपल्यासमोर उभी राहते.

अशातच एका छोट्याश्या वादाचं निमित्त होतं आणि अचानक नंदिनी एक गौप्यस्फोट करते- तिच्या आणि तिच्या एका मित्राच्या आलेल्या संबंधांबद्दल. भास्करला ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत असा अंदाज असतो, पण अर्थातच प्रकरण तिथवर गेले असेल, ह्याची कल्पना नसते. आपल्या बायकोने अशी कबूली दिल्यानंतर कोणत्याही नवर्‍याची काय प्रतिक्रिया होईल? वाचक म्हणून आपल्या मनात जे जे येईल, ते ते पुस्तकात बरोब्बर पकडले आहे. रागाचा स्फोट, पराकोटीचा संताप, स्वामित्वाची भावना, उद्विन्गता, स्वत:वरचाच अविश्वास, फसवलं गेल्याची भावना- सगळं भास्करला टप्प्याने जाणवतं. ’तिला घालवून देऊ घरातून’ इथपर्यंत त्याचे विचार पोचतात. नंदिनीची ह्या घटनेवरची आणि आता भास्करला सांगितल्यानंतरची प्रतिक्रिया काय आहे? भास्करची प्रतिक्रिया बघून अर्थातच ती घाबरते. विमनस्क होऊन भास्करने स्वत:चे बरे वाईट करून घेऊ नये ही तिची प्रमुख चिंता आहे. पण भूतकाळातल्या घटनेबद्दल तिचं मन स्वच्छ आहे. एकापरीने ती त्याबद्दल तटस्थ आहे आणि त्याला काही कारणंही आहेत. ती पुस्तकात योग्य वेळी आणि योग्य प्रकारे उलगडत जातात.

ह्या निमित्ताने लेखाकाने वैवाहिक आयुष्यातल्या शारिरीक संबंधांचा होणारा प्रवास वेगवेगळ्या प्रसंगामधून दाखवला आहे. लग्न झाल्यानंतर सुरुवातीला असलेली एकमेकांची झपाटल्यागत ओढ आणि नंतर ओळखीची शरीरं झाल्यानंतरचं आलेलं माधुर्‍य ह्या प्रवासातले चढ-उतार पुस्तकात संयतपणे टिपले आहेत. अनेकदा नकळत हे शारिरीक व्यवहार काहीतरी सिद्ध करण्यासाठीही वापरले जातात- नवर्‍याला वर्चस्व सिद्ध करण्यासाठी ह्यांचा वापर करणं सोयिस्कर असतं, कधीकधी तर त्याला हाच एक मार्गही ठाऊक असतो, कधीकधी गैरसमज दूर करण्यासाठी, कधी केवळ प्रेमापोटी तर कधी सवय म्हणून.. आधी केवळ शारीर पातळीवर असलेला हा व्यवहार, हळूहळू मनांचीही गुंतवणूक करतो. एक वाचक म्हणून भास्कर-नंदिनीचा हा प्रवास आपल्याला अंतर्मुख करून जातो.

हादरलेल्या भास्करच्या सर्व प्रतिक्रिया एक वाचक म्हणून आपल्याला योग्य वाटतात. त्याच्याबरोबर आपणही मनाच्या विविध अवस्थेतून जातो. माणसाचं मन ही फार विचित्र गोष्ट आहे. मन कणखर असलं, उत्साही असलं की समोर काहीही आलं तरी झेलू शकतं. व्यवसायातले चढ-उतार लीलया पचवलेला भास्कर अशा प्रकारच्या धक्क्याला सामोरा जायला सक्षमच नाहीये. साहजिकच ती घटना त्याच्या मनावर आघात करते, तो हेलपाटतो. समुद्राच्या साक्षीने विचारांच्या आवर्तनात एक संपूर्ण दिवस आणि रात्र घालवतो. समुद्राच्या लाटांसोबतचा त्याचा प्रवास, हळूहळू निवत गेलेलं त्याचं मन आणि त्याचे सुसंगत विचार, दृष्टीकोनात हळूहळू घडलेला बदल हे खूपच सुरेख टिपलंय. ’मन’ ह्या अदृश्य शक्तीचं आपल्या शरीरावर असलेलं निर्विवाद आधिपत्य एकदा मान्य केलं की अनेक घटना, त्यांच्यामागची सत्यता, आपल्या प्रेमाच्या माणसाला समजून घेणं किती सुकर होतं. विषण्ण मन:स्थितीत असलेला भास्कर त्या संध्याकाळी त्याच्या शरीराला सवयीचा असलेला व्यायामही करू शकत नाही.. संपूर्ण शरीर त्याच्यासाठी एक ओझं बनतं. मात्र मनातल्या शंकांचं मळभ दूर झाल्यानंतर काही तासांनंतरच तो पहिल्याच जोमानं व्यायाम करू शकतो- मनाच्या सामर्थ्याचं वर्णन करणारी ही अगदी छोटीशी गोष्ट आहे, पण अचूक पकडली आहे.

भास्करची व्यक्तीरेखा जरी जास्त स्पष्ट असली तरी मनस्वी नंदिनी चांगलीच लक्षात राहते. काहीशी पॅसिव्ह, फक्त प्रतिक्रियांमधून व्यक्त होणारी नंदिनी सुरेख रंगवली आहे. तिचे विचार, तिचं भास्करवर असलेलं प्रेम अगदी स्वच्छ आहे. त्यात कोणताही अभिनिवेश नाही. एक पाऊल मागे राहणे, पण ज्यात सहभाग घेऊ, त्यात पूर्णपणे समरस होणे ही तिची वृत्ती आहे. भास्करवर ती पूर्ण अवलंबून आहे, आणि हे ती त्याला अनेकदा बोलून, कृतीतून दाखवतेही. तिच्या आयुष्यातल्या घडलेल्या घटनेबद्दल तिच्या मनात कोणतांही अपराधीपणा नाही. भास्करला हे सगळंच पचवायला जरासं अवघडच जातं, पण त्याला इतक्या वर्षाची ओळखीची बायको ह्या तीन दिवसात अगदी नव्याने कळत जाते. तिच्या चेहर्‍यापासून तिच्या स्वभावाचे अनेक कंगोरे ह्या सगळ्यांकडेच तो एका नव्या दृष्टीने बघू लागतो. हा प्रवास खूप रोचक आहे. पुस्तक ज्या प्रसंगाने सुरू होतं, त्याच प्रसंगाने संपतं. पण दोन्हीतला फरक इतका ठळक आणि लोभसवाणा आहे, की आपण नकळत लेखकाला दाद देऊन टाकतो. आपल्याला वाटत असतं की आपल्या जीवनसाथीला आपण चांगलंच ओळखतो, मात्र त्याच्या अंतरंगापर्यंत पोचणं हे समुद्रात डुबकी घेण्यासारखं आहे- आत काय दडलेलं आहे, ते खूपच वेगळं आणि आश्चर्यचकित करणारं असू शकतं. त्यातून जे हाती लागतं ते अतिशय सुंदर असं काहीतरी असतं- आपल्या मनात आपणच निर्माण केलेल्या प्रतिमेला एखादा सुखद धक्का देणारं!

मिलिंद बोकीलांची ही तिसरी प्रकाशित कादंबरी. ’समुद्र’च्या आधी त्याच्या ’शाळा’ आणि ’एकम’ ह्या कादंबर्‍या आल्या आहेत. ’शाळा’शी आपण सगळेच परिचित आहोत. शालेय विद्यार्थ्यांची, त्यातूनही वयात येणार्‍या विध्यार्थ्यांची अचूक नस त्यांनी त्या कादंबरीत पकडली होती. व्यक्तीरेखा उभ्या करणे, त्या रंगवणे, त्यांच्या आजूबाजूचे प्रसंग वाचकाला आपलेसेच वाटतील असे लिहिणे, आणि खूप काही लिहूनही शेवटी वाचकाला विचार करायला प्रवृत्त करणे ही ह्या लेखकाची वैशिष्ट्य. ही वैशिष्ट्य पुरेपूर जपत बोकीलांनी ’समुद्र’ लिहिली आहे. नव्वद पानांचीच असलेली ही छोटीशी कादंबरी आशयात कुठेही कमी नाही. मानवी मन आणि समुद्र, संसार आणि डोंगरकडा हे दृष्टांत कादंबरीला एक सुरेख उंची देतात. मानवी मनाइतके गुंतागुंतीचे काहीच नसेल. त्याच्या एका कंगोर्‍याचा कानोसा आपण ही कादंबरी वाचता वाचता घेऊ शकतो, हे नक्की.
---

त.टी: 'मायबोली.कॉम'वर 'कृषिवल रसग्रहण स्पर्धा' चालू आहे, त्या निमित्ताने हे रसग्रहण लिहिले गेले. इतर रसग्रहणं http://www.maayboli.com/node/27732 इथे वाचता येतील.

6 comments:

साधक said...

एवढी झकास सखोल ओळख करुन दिल्याबद्दल आभार. मिळाली की लगेच वाचेन.

सिद्धार्थ said...

पोस्ट आवडली. मिलिंद बोकीलांचे केवळ "शाळा" हे एकच पुस्तक वाचून झाले आहे. त्या एकाच पुस्तकामुळे मी त्यांचा चाहता झालो आहे. "समुद्र"चे परीक्षण छान लिहिले आहे. नक्की वाचायला हवे हे पुस्तक.

poonam said...

धन्यवाद साधक, सिद्धार्थ. पुस्तक वाचल्यावर, तुमचा अभिप्रायही कळवा.

BinaryBandya™ said...

छान ओळख करून दिली आहे .
बोकीलांचे "शाळा" वाचले आहे आता "समुद्र "

Prof. Sumedha said...

या रसग्रहणामुळे 'समुद्र' वाचण्याची उत्सुकता वाढली आहे . धन्यवाद .

Anonymous said...

वाचनेकोच मंगताय अबी!