February 24, 2009

सलाम!

' Give them chance, not charity' 'त्यांना नको आहे दया, हवी आहे एक संधी'




'आनंदवन' हे नाव आपल्या सर्वांनाच परिचयाचं. वंदनीय बाबा आमटेंनी अतिशय धाडसाने आणि कल्पनातीत परिश्रमाने समाजातल्या वाळीत टाकलेल्या माणसांना खरोखर जीवदान दिलं. पण हे कार्य नुसतं सुरू करून ते थांबले नाहीत. कुष्ठरोगी, अपंग, अंध, आणि आता एड्जबाधित रुग्ण या सगळ्यांना त्यांनी आपलसं केलं. ही सगळी सर्वप्रथम 'माणसं' आहेत आणि माणूस म्हणून जगण्याचा त्यांना हक्क आहे हे त्यांनी जाणलं आणि उभं राहिलं 'आनंदवन'. ज्या लोकांना जगाने त्यांच्या अपंगत्वाकडे, रोगाकडे पाहून बहिष्कृत केलं, त्यांना आनंदवनाने आपलसं केलं. आनंदवन हे एक गाव आहे. इथला प्रत्येक माणूस हा त्याच्या कुवतीप्रमाणे, त्याच्या अपंगत्वावर मात करून काही ना काही उद्योग करतो, आपलं आयुष्य आपल्या हिंमतीवर जगतो, आपलं योगदान देऊन जगतो. त्या लोकांना खरंच नको असते दया, हवा असतो फक्त थोडा विश्वास आणि एक संधी.. आपलं कौशल्य दाखवण्याची.



या संकल्पनेतूनच जन्म झाला 'स्वरानंदवन'चा! आनंदवना जन्मलेली, किंवा तिथे आलेली अनाथ, अपंग, अंध, मूकबधीर मुलं, तरूण मिळून एकमेवाद्वितीय असा हा दृकश्राव्य कार्यक्रम करतात- 'स्वरानंदवन'. या कार्यक्रमातली १००हून जास्त सहभागी मुलं ही लौकिकदृष्ट्या अपंग आहेत. पोलियो, अस्थिव्यंग, अंधत्व, अपंगत्वाने गांजलेली आहेत. पण एका धाग्याने बांधलेली आहेत- तो म्हणजे संगीत! संगीत म्हणजे सूर, लय, ताल- अशी लय, असा ताल जो आपणा सर्वांमध्ये लपलेला असतो. संगीत म्हणजे केवळ गाणं नव्हे, तर तालाची, लयीची जाणीव.. देवदयेने ही जाणीव या सर्व मुलांना अगदी उत्तम आहे.. किमान संगीत तरी माणसाचं शरीर बघून रुजत नाही, ही देवाची कृपाच! 'स्वरानंदवन' या कार्यक्रमामध्ये या मुलांची गाणी, नृत्य, नकला आपल्याला बघायला, ऐकायला मिळतात. लौकिकदृष्ट्या ही मुलं 'सूराला चिकटून' गात नसतील, पण आज प्रचंड जनसमूहासमोर ते आत्मविश्वासाने उभं राहू शकतात. त्यांच्यासमोर न बिचकता आपली कला दाखवू शकतात. एक वेळ त्यांच्या जीवनात अशी आली होती की त्यांच्या सख्ख्या लोकांनीही त्यांना दूर लोटले आहे, किंवा काहींना तर 'आपली माणसं' म्हणजे काय हेच ठाऊक नाही! अश्या दुर्लक्षित, उपेक्षित मुलांना कुठून मिळतं इतकं धैर्य? कुठून संचारतं त्यांच्यात इतकं बळ? तर, स्वत:च्या वैगुण्याची जाणीव असूनही त्यांना त्याची लाज वाटत नाही, आणि आपल्या वैगुण्यावर मात करायची प्रबळ इच्छा त्यांना आहे, त्यामुळेच ते आपल्यासमोर निर्भयपणे उभे राहू शकतात! 'ठीक आहे, नाही दिसत आम्हाला तुमचं जग, पण आम्हाला आमच्या कल्पनेच्या जगात मुक्त विहरायला काहीच आडकाठी नाही, ना?' 'मी धावू शकत नाही, पण मला जमेल तसं, माझ्या पायावर चालू तर शकतो ना?' 'माझ्या तबल्याचे बोल ऐकता ऐकता, तुम्ही माझ्या दृष्टीहीनतेला विसरता ना?' असे प्रश्न जणू ते आपल्याला विचारत आहेत असा भास होतो. केवळ दिसायला अपंग, पण मनानी अभंग!


स्वरानंदवनातले हे स्वर आपल्याला आंतरबाह्य भिजवून टाकतात. त्यांचा आत्मविश्वास पाहून आपण थक्क होतो. आणि हा आत्मविश्वास, ही जिद्द त्यांना त्यांच्या हिंमतीवर जगण्याचं एक साधनही मिळवून देते. ही मुलं हौसेखतर, हसतखेळत हा कार्यक्रम करत नाहीत, तर आपला पूर्ण वेळ, आपली पूर्ण शक्ती पणाला लावून प्रत्येक सादरीकरण अगदी 'प्रोफेशनली' करतात. अंध मुलं गातात, हे एकवेळ सोपं, पण नाचतात? तेही सुरातालावर? आणि तेही एका जागी उभे राहून वगैरे नाही, तर व्यवस्थित सामुहिक नृत्य करतात! वेगवेगळे फॉर्मेशन्स घेऊन!! कसे शिकले असतील ते? कसा अंदाज घेतला असेल हालचालींचा? त्यांच्या शिक्षकांचं खरं कौतुक की त्यांनी या मुलांमध्ये ही जिद्द निर्माण केली. चुका झाल्या असतीलच, कदाचित नैराश्यही आलं असेल, पण त्याच्यापलिकडे ही मुलं पोचली हे किती स्पृहणीय!


खरे विस्मयचकित तर आपण पुढे होतो.. संपूर्णत: कर्ण आणि त्यामुळे मूकबधीर असलेली मुलं जेव्हा पॉप गाण्यावर थिरकतात तेव्हा! या मुलांना गाणं ऐकायला येत नाही, शंका आल्यास विचारता येत नाही, तरी इतक्या लयबद्ध हालचाली कश्या करतात? जे गाणं ऐकायलाच येत नाही, त्यावर नाच कसा करू शकतात? तेही त्या गाण्यांच्या बीट्सवर? कसं शक्य आहे? तर, ते गाणं जेव्हा आपल्यासारख्या सामान्यजनांच्या कानावर पडत असतं, तेव्हा ती मुलं फक्त त्यांच्या शिक्षकांकडे नजर ठेवून असतात. शिक्षकांच्या खुणेबरहुकुम ते शिकवलेल्या हालचाली करतात. आपल्याला एक क्षणही शंका येत नाही, की ही मुलं ऐकू-बोलू शकत नाहीत!


हे असे अनुभव, आपण स्वत: एक माणूस म्हणून किती अपंग आहोत हेच शिकवून जातात जणू. कोण ठरवतं अपंगत्व? केवळ दोन हात, पाय, डोळे आहेत म्हणून आपण निर्व्यंग? छोट्या छोट्या गोष्टीत होणारे आपले मानापमान, रुसवेफुगवे, अहमहमिका, स्पर्धा, मी-मी पणा, तक्रारी- या मानसिक व्यंगांचं काय? खुट्ट झालं की आपला मूड जातो, तब्येत बिघडते, कसंनुसं होतं, जीव गुदमरतो..! पण आपल्याला कल्पनाही येणार नाही अश्या ठिकाणी, अश्या अवस्थेत आज लोक रहात आहेत. आणि नुसतेच रहात नाहीयेत, तर त्यातून मार्ग काढत आहेत, जिद्दीने कार्यरत रहात आहेत. त्यांना बघितलं की अपंग शब्द उच्चारायचीही लाज वाटते. त्यांच्याही आयुष्यात नक्कीच अशी वेळ आली असेल, की तेही खचले असतील, देवाला दोष दिला असेल की 'मीच का सापडलो तुला?' पण कार्यक्रमाचा निवेदक जे म्हणाला ते ऐकून डोळ्यात पाणी येतं.. तो म्हणाला, 'उलट आम्ही देवाचे आभार मानतो की त्याने आमच्यात काही ना काही उणीव ठेवली, कारण त्यामुळेच आम्ही 'आनंदवनात' आलो, विकासभाऊंनी (डॉ. विकास आमटे) आम्हाला आयुष्य दिलं, आयुष्य जगायला कारण दिलं, एक दिशा दिली, एक प्रेरणा, एक ध्येय दिलं.' इतकं मोठं मन! अपंगत्वाचा उल्लेखही नाही, आहे तो स्वीकार. आणि देवावरची तरीही अतूट असलेली श्रद्धा! ना कुठली कटूता, ना खेद ना राग.


आपल्यासारखे तथाकथित निर्व्यंग, सशक्त लोक एकच करू शकतो- त्यांना सलाम!

(फोटो सौजन्य: डॉ. शीतल आमटे)

4 comments:

Dhananjay said...

Thought-provoking! Hope we just don't stop by doing salam to them and contribute in whichever way possible to us. I am not using word donation, i m using the word - contribution.

Anonymous said...

hey khup chhan ahe blog............

Jackie of all ... Master of none said...

amazing aahe ho ha upkram
maaze haat pay dhad aahet tari mala kantala yeto kityek goshtincha
but these people are just beyond this world....great

मुर्खानंद said...

बाबा आमटे आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या कार्या बद्दल बोलायची माझी पात्रता नाही.... पण "आमटे कुटुंबीय म्हणजे देवमाणसचं" हे त्यांचं अफाट, निस्वार्थी कार्य बघितल्यावर जाणवतं...