January 21, 2009

स्वयंशिस्त!

मी ट्रॅफिकचे नियम पाळते!’ हे लवकरच एक विनोदी वाक्य होईल असं वाटायला लागलंय, कारण रोजच सरळसरळ ट्रॅफिकच्या नियमांचं उल्लंघन करून गाड्या हाकणारे अनेक वीर मला घडोघडी दिसतात. ’लाल दिव्याला थांबायचं असतं’ हे शाळेत पहिल्या इयत्तेत शिकलेलं बहुधा अख्ख्या रस्त्यावर मला एकटीलाच आठवत असतं, कारण अक्षरश: एखाद्या सिग्नलला लाल दिवा पाहून मी एकटीच थांबलेली असते.. माझ्या पुढचे, मागचे सगळे निघून जातात! त्यांचं काही बिघडत नाही, मग एकटी मीच ट्रॅफिकचे नियम पाळून विनोदीपणा नाही का करत?

धावपळ कोणाला चुकली आहे? ऑफिसमधले पंचिंग मशिन मला एकटीलाच काय, तर तमाम नोकरदारांना सकाळी उठल्यापासूनच दिसत असतं. पण ते काहीही करून गाठण्यासाठी लोक पाच मिनिटं लवकर आवरून निघण्याऐवजी ट्रॅफिक नियम का तोडतात? अर्थात, काही महाभाग केवळ उद्दामपणा करून दिवसाच्या कोणत्याही प्रहरी नियमबियम पाळायच्या भानगडीत कधीच पडत नाहीत. रस्ता जेव्हा आपण एक जबाबदार नागरिक म्हणून वापरतो, तेव्हा तो योग्यपणे वापरणे ही आपली जबाबदारी नाही का? फक्त वाहतूकीसंबंधात पाहिलं, तर सिग्नल न पाळणे हा खूनाइतकाच गंभीर गुन्हा नाही का? सध्या वाहनचालकांचा बेदरकारपणा इतका वाढला आहे की मागून जोरजोरात हॉर्न वाजवणे, ओरडाआरडा करणे, प्रसंगी शिव्याही देणे हे सर्रास घडू लागलंय- आणि कोणाला? तर, लाल सिग्नल आहे म्हणून एखाद्या थांबलेल्यालाच! नंतर असे कटाक्ष मिळतात की जणू लाल दिव्याला थांबणं म्हणजे अडाणीपणाचं लक्षण! ’थांबलाय का? जा आणि मुख्य म्हणजे आम्हाला जाऊद्या!’ ही परिस्थिती ओळखून प्रशासनाने ट्रॅफिक वॉर्डन नेमले, तर लोकांनी चक्क त्यांच्याच अंगावर गाड्या घालून त्यांना जखमी केले!! म्हणजे, खरोखर आता खूनच पडायचे बाकी राहिलेत? कश्यापायी? तर साधे वाहतूकीचे नियम पाळावेत ’सभ्य’ जनतेने म्हणून?

कहर म्हणजे एरवी या सिग्नलना न जुमानणारे लोक मोबाईलची रिंग वाजली, एखादा ओळखीचा चेहरा दिसला की कच्चकन ब्रेक दाबून भर रस्त्यामध्ये वाट्टेल तिथे थांबतात. चौकामधला मोठा लाल दिवा यांना दिसत नाही, पण भर गर्दीतले मित्र, मैत्रिणी मात्र लग्गेच दिसतात. मग आपण कुठे आहोत, किती लोक आपल्या आसपास आहेत याचा काहीही विचार न करता जागच्याजागी थांबलेच! रस्त्यामधे येणार्‍या तमाम देवळांपाशी थांबून नमस्कार टेकवला नाही, तर केवढं पाप वाढेल, त्यामुळे तिथेही थांबणं आलंच. आता देवळंच रस्त्यांच्यामधे बांधली आहेत, त्याला हे भक्त तरी काय करणार? भर रस्त्यामधे असलं तरी हरकत नाही, पण बाकी लोकांची गैरसोय करून नमस्कार हा केलाच पाहिजे. ज्या लोकांना याचा त्रास होतो, तेच पापी, घोर अज्ञानी!

पीएमपीएल बसेसबद्दल म्या पामराने काय बोलावे? ’मला अभिमान आहे मी वाहतूकीचे नियम पाळतो’ इतकं छापिल खोटं केवळ तेच बोलू शकतात. पुढे असलेल्या दुचाकीस्वाराला मागून दाबणे, सिग्नल तोडणे, बीआरटीसारख्या मार्गावरही सुसाट गाडी हाकणे, बस ही स्टॉपवर न थांबवता त्याच्या आसपास कुठेही थांबवणे हे तर रोजचेच! साधे झेब्रा क्रॉसिंगवर गाडी न थांबवणे हे पथ्य पळत नाहीत म्हणून बसचालक दंड भरतात, पण गाडी पुढेच थांबवणार! हे बरे असे सहा आसनी रिक्षा चालक. दिसलं ग्राहक की थांब! रिक्षा भरणं महत्त्वाचं, मग कुठेही, कसंही थांबून ती भरली तरी चालेल. यासर्वामधे वाहतूकीचे नियम कुठे येतात? या पायी किती वाहनस्वार रोज बळी पडतात याची पर्वा कोणाला आहे? तरूण, तरूणी आपले जीव गमावत आहेत, याची खन्त आणि जाणीव परिवहन खात्याला का होत नाहीये?

..कारण इतक्या वाईट परिस्थितीला ’मामा फॅक्टर’ तितकाच कारणीभूत आहे. फार काळापासून चिरीमिरी घेऊन त्यांनी अनेक नियमांचं उल्लंघन डोळ्याआड केलं, वाहनचालकांना डोक्यावर बसवलं, कितीतरी गोष्टींकडे काणाडोळा केला.. आणि आता शहरातली एकूणच वाहनसंख्या हाताबाहेर गेल्यानंतर यांना थोडी जाग आली आहे. पण परिस्थिती कधीच हाताबाहेर गेली आहे. रस्ते नुसतेच मोठे करून, किंवा बससाठी वेगळे मार्ग करून, किंवा फ्लायओव्हर बांधून काय साधणार आहे? मुळात जी वाहतूक शिस्त आहे ती नागरिकांमध्ये बाणवण्यासाठी परिवहन खात्याने काय केले आहे? साधा परवानाही ते कोणतीही परिक्षा न घेता, पैसे दिले की देतात.. आता चौकाचौकात ट्रॅफिक वॉर्डन, हवालदार वगैरे उभे असतात, पण लोक त्यांनाही जुमानत नाहीयेत, कारण त्यांना माहीत आहे, की जरी पकडले गेलो, तरी प्रकरण मिटवता येतयंच. त्यातूनही हवालदार आहे म्हणून लाल दिव्याला थांबणारे, त्याची पाठ फिरली की पुन्हा कुत्र्याच्या शेपटाप्रमाणे वाकडे होतातच.

सध्या सगळ्यांनाच आपापल्या जबाबदारीची जाणीव होणे महत्त्वाचे आहे असे मला वाटते. मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर सगळीकडेच नागरीकांच्या भावनांचा कडेलोट झाला. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी काय केले पाहिजे हे सल्ले चौकाचौकात चर्चिले गेले. पण एक जबाबदार नागरीक म्हणून आपले काय कर्तव्य आहे याचा विचार किती जणांनी केला? सार्वजनिक ठिकाणी योग्य असे वर्तन आपले आहे का याचा विचार किती जण करतात? सर्वच जागी स्वयंशिस्तीची आवश्यकता असताना पोकळ गप्पा मारणारेच जास्त का दिसतात? साधे वाहतूकीचे, सार्वजनिक स्वच्छतेचे नियम आपण पाळत नाही. पण देशाची प्रगति ’आमच्याकडे हे असलंच’ असं म्हणत होत नाही. नुसती हळहळ काय कामाची? यासाठी प्रत्येकाचं योगदान महत्त्वाचं आहे. सुरूवात तरी शिस्तीने, कायद्याच्या कडक अंमलबजावणीने करावी लागेल. सरकारी कारभार कडक झाला की हळूहळू नागरीकांमध्येही चांगल्या सवयी भिनतात. हे अवघड आहे, पण होण्यासारखे आहे. घडोघडी अमेरिकेची उदाहरणं आपल्यासमोर आहेत. ट्रॅफिकची शिस्त का घेत नाही आपण त्यांच्याकडून?

आपण सर्वांनीच थोडा वेळ स्वत:शीच विचार केला, आणि तसे आचरणही केले, तर बरेच काही साध्य होण्यासारखे आहे! देशातले सर्व नाही, तरी किमान सुशिक्षित नागरिक जेव्हा सुधारतील तो दिवस खरा सोनियाचा होईल.

3 comments:

Dk said...

हाय पूनम! खर आहे हे शब्दशः

अगं पण आमच्या मुंबईत नाही बर का आम्ही (वाह न चालक) वाहतुकीचे नियम तोडत!!! :)

हाहा कारण २० कि. मी. प्रती तास ह्याच (सुसाट) वेगान इथं गाडी हाकता येते. (इथं कि. मी. मराठीत काय म्हणायच? ;) )

Unknown said...

aagadi patal .. vahatukiche niyam modun janare lok roj aaplya aaju bajula distat .. ani aapan te palalyvar aapalyala vede thravnare sudha ..
aavadla lekh..
mala tujhya navin likhanachi suchana milat nahi aahe .. jara sangnar ka ??
Shraddha

Kamini Phadnis Kembhavi said...

hmmm, waachalaa ga lekha aaNi akkhayaa lekhaalaa anumodan asalaa vaitaag aalaay ithalee shista(?) baghUn.