January 3, 2009

शुभेच्छा!

वीन वर्षाचे आपण नुकतेच स्वागत केले.. (नवीन इंग्रजी वर्षाचे, असे म्हणूया :)) त्यानिमित्ताने आपल्या सर्वांचे मोबाईलचे इनबॉक्स, ईमेलचे इनबॉक्स, अगदी ऑरकूटवरचे स्क्रॅपबूकही शुभेच्छांनी भरून, वाहून गेले असेल.. हा एक नवीन ट्रेन्ड झालाय हल्ली. इन्टरनेट आणि मोबाईलने आपल्या जीवनात अनेक बदल आणले. त्यातलाच हाही.. लोकांचा संपर्कात अगदी सहज राहता येतं, एकाच वेळी अनेक लोकांशी संपर्क साधता येतो. ईमेल तसे नवीन होते, तेव्हा आठवा ’फॉरवर्ड मेल’ यांची संख्या! वेड लागल्यासारखे असे मेल्स आपल्याला यायचे, आणि आपणही लोकांना अश्या मेल्स पुढे पाठवायचो. कालांतरानी याचा ओघ कमी झाला, पण त्याची जागा आता फॉरवर्ड एसएमएसने घेतली, इतकंच! इकडे चलनातले दहा पैसे कधीचेच नामशेष झाले, पण मोबाईल कंपन्या चक्क दहा, चाळीस वगैरे पैश्यात एकमेकांच्या संपर्कात रहाण्याची सोय देत आहेत, आणि त्याचा फायदा त्यांच्या ’टार्गेट कस्टमर’, अर्थातच तरूण वर्गाने घेतला नाही, तरच नवल! अर्थातच मोबाईल कंपन्यांच्या जाहिराती आकर्षक असतातच. ’फ्रेंड्ज ग्रूप कॉल्स फक्त १० पैश्यात’, ’रात्री ११ ते सकाळी ६ फुकट एसएमएस’, ’रोमिंगचे दर ३०%ने घटले’, इत्यादि. मोठमोठ्या कंपन्यांमधे कर्मचार्‍यांच्या सुविधेसाठीही मोबाईल कंपन्या मुद्दाम स्पेशल ’टॅरिफ प्लॅन्स’ देतात, त्यायोगे कर्मचारी एकमेकांमध्ये जवळपास फुकट बोलू शकतात.

या सगळ्याचाच परिपाक म्हणजे एकमेकांना एसएमएस करणं- वेळ जात नसला की, कारण आहे म्हणून, कारण नाही म्हणून, ठावठिकाणा कुठे आहे हे समजावं म्हणून, आणि सध्याचं कारण म्हणजे ’कोणतातरी सण आहे किंवा महत्त्वाचा दिवस आहे, म्हणून त्याच्या शुभेच्छा देण्यासाठी’! भारतात तर काय, सणांची रेलचेलच! दर महिन्यात काही ना काही आहेच, नसेल तर पाश्चिमात्य देशाकडून आयात केलेला कोणतातरी ’डे’ आहेच. फेब्रुवारीत सण नाही, पण व्हॅलेंटाईन डे सारखा प्रेमीजनांचा जागतिक महत्त्व असलेला अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो, त्या दिवशी प्रिय व्यक्तिला समोरासमोर काही बोलण्यापेक्षा, एसएमएस करणं सोयीच, नाही का? मे महिन्यात अजून काहीच नाही, तर ’मदर्स डे’! एरवी आईला कामाशिवाय हाक न मारणारे आपण, त्या दिवशी मात्र ’मातेची थोरवी’ सांगणारा एसएमएस तिलाच करायला कसे विसरू? हे पुरत नसतील, तर फादर्स डे, बॉस डे, फ्रेंडशिप डे, नवीन वर्षाचा पहिला दिवस, वर्षाचा शेवटचा दिवस, नोकरीतला पहिला/ शेवटचा दिवस, लग्नाचा वाढदिवस, नुसता स्वत:चा, आणि शेकडो मित्रमैत्रिणींचे वाढदिवस हेही वर्षभरात हजर आहेतच. बघा, कित्ती कारणं आहेत एकमेकांना एसएमएस करण्याची! या दिवशी तुम्ही तुमच्या ऍड्रेसबूक मधल्या लोकांना एक तरी एसएमएस करत नसाल, तर उपयोग काय तुमच्या मोबाईलचा? (फक्त इनकमिंग कॉल्स घेता वाटतं? लब्बाड!)

तर या संधीचा सगळेच फायदा घेत आहेत असं मोबाईल सर्व्हिस देणार्‍या कंपन्यांच्या लक्षात आले. लोक ’एसएमएस’ या सुविधेचे अगदी गुलाम जरी झाले नाहीत, तरी तो प्रकार त्यांना आवडू लागला. ’स्वस्तात संपर्क’ ही कल्पना तशी मोहक आहेच. मग या कंपन्यांनी हळूच काय केलं? लोक एसएमएस केल्याशिवाय राहू शकणार नाहीत, अशी खात्री पटल्यावर त्यांनी वर्ष्भरातले हे ’स्पेशल दिवस’ कोणते याची यादी केली. या दिवशी हमखास एसएमएस यांचा ओघ प्रचंड वाढतो असे हे दिवस होते. त्यांनी बारीक अक्षरात हळूच मग या दिवशी एसएमएसचे शुल्क वाढवले. जर एरवी फुकट असतील, तर त्या दिवशी एक रुपया, जर एरवी एक रुपया असेल, तर त्या दिवशी दोन रुपये असे. पण आपण रुपया दोन रुपयांच्या कितीतरी पुढे आलो असल्याने, एसएमएसच्या संख्येत फारसा फरक पडला नाही! एक तर सर्व ग्राहकांना असं बिलिंग होतंय हे समजायलाच एक महिना जावा लागला. पण तोपर्यंत दुसरा ’स्पेशल दिवस’ येऊन उभा ठाकला होता ना! आधीच्या सर्व स्पेशल दिवसांना आपले एसएमएस जाणार आणि आता एक रुपया घेतात म्हणल्यावर एसएमएस करायचे नाहीत होय! इभ्रत, इज्जतका सवाल होता है भाई! लोकांनी अर्धा डोळा एसएमएस बिलवर ठेवून दीड डोळ्याने एसएमएस केलेच, फारतर ५-१० लोक गाळले असतील यादीतून! पण लोकांपर्यंत आपला एसएमएस जाणं महत्त्वाचं! त्यामुळे स्पेशल दिवसांना ढीगभर एसएमएस येणं चालू राहिलंच, किंबहुना वाढलंच!

मेलमधल्या शुभेच्छांचं एक बरं असतं, त्याचा आपल्याला ’ऍलर्ट’तरी मिळत नाही. आपण जेव्हा मेलबॉक्स उघडू, तेव्हा मेल्सचा पाऊस पडेल. हे एकवेळ चालतं, पण एसएमएसचा ऍलर्ट टोन मात्र वेळीअवेळी वाजतो! आता यावर उपाय म्हणून मोबाईल ऑफ ठेवणे, किंवा सायलेंट ठेवणे हा सोपा आहेच, पण अश्या वेळी नेमका महत्त्वाचा, खरोखरच्या कामाचा एखादा एसएमएस किंवा कॉल येतोच! आणि तो आला आहे, असं आपल्याला जेव्हा वाटतं, तेव्हा नेमका असा ’शुभेच्छुक एसएमएस’ असतो, हो की नाही? शुभेच्छा द्याव्यातच, छान वाटतं, हे मीही कबूल करते. पण असे वीसेक मेसेजेस आले, की शुभेच्छांमधली गंमत थोडी कमी होते, असं मला वाटतं. नंतर नंतर तर चक्क अश्या मेसेजेसकडे ’असेल कोणाचातरी एसएमएस, बघू नंतर’ असं म्हणत बघण्याचाही कंटाळा केला जातो असा माझा अनुभव आहे. कधीकधी एसएमएसच्या प्रचंड ट्रॅफिकमुळे दुसर्‍या दिवसापर्यंत ते मेसेजेस येत रहातात, तोवर तर ती शुभेच्छा द्यायची वेळही निघून गेलेली असते!

अर्थात, अश्या ’स्पेशल दिवशी’ मला एकही एसएमएस किंवा इमेल आली नाही, तर मला वाईट वाटेल असंही मी कबूल करते. तेव्हा, हे लिखाण फार मनावर घेऊन कोणी शुभेच्छांचे एसएमएस किंवा मेल करणं सोडू नका, फक्त थोडे तारतम्य बाळगा असं सांगायचं होतं. शुभेच्छांकडे कोणाचं दुर्लक्ष होऊ नये, इतकीच छोटीशी ’शुभ-इच्छा’. हे वर्ष आपल्या सर्वांनाच शांततामय जावो!

5 comments:

Anonymous said...

छान लिहिलंय!
अजुन काही दिवसांनी माणसं शेजारच्या खोलीतून एखाद्याला बोलावण्यासाठी सुद्धा एसेमेसचा वापर करण्याची दाट शक्यता आहे! :-)

केदार जोशी said...
This comment has been removed by the author.
केदार जोशी said...

LOL. Happy new year mag :)

संदीप चित्रे said...

yogya lekh lihilaa aahes Poonam :)
mee nukataach puNyaalaa aalo hoto tevhaa mee paahile kee SMS che veD khoopach waaDhale aahe :)

Sarang said...

Punha ekada chan lekh! Majhyamate he internet suru jhalyavar mhana ki mobile suru jhalyavar mhana...barach kahi gondhal jhalay ayushyat....