December 2, 2008

जबाबदार वार्तांकन!

जबाबदार वार्तांकन म्हणजे काय? जी घटना झाली आहे तिचा सर्व कोनांमधून सांगोपांग आढावा घेऊन तो लोकांसमोर आणणे. हे मुळात कशासाठी? तर, अनेक गोष्टी या सामान्य जनतपासून लपवल्या जातात, किंवा लपतात. तर आपल्या आसपास काय चालले आहे हे सर्वांना समजावे, अन्याय असेल तर त्याला योग्य ती वाचा फोडली जावी, काही चांगले असेल तर ते सर्वदूर पोहोचावे हा उद्देश्य. परंतु, हे आज साध्य झाले आहे का?

फार पूर्वी, जेव्हा दूरदर्शन हे एकच माध्यम होतं, तेव्हा सरकारी बातम्या जे खाद्य देतील ते आणि तेवढंच आम जनतेला चघळायला मिळायचं. पण, टीव्ही चॅनल खुले झाले, खासगी झाले आणि हे दृष्य बघताबघता बदलले. काही काही टीव्ही चॅनलनी फक्त बातम्या प्रक्षेपित करायला सुरुवात केली. सुरुवातीला हे खूपच ’एक्सायटींग’ वगैरे होते. २४ तास बातम्या! कधीही पहा- दिवसरात्र देश-विदेशच्या बातम्या. पण २४ तास सारखे दाखवायचे तरी काय?- असा प्रश्न भेडसावू लागला! त्यामुळे, एका छोट्या घटनेचीही बातमी व्हायला लागली, बातमी नसेल तर ती खूबीने बातमी करता येऊ लागली. मग अगदी ’गावात कुत्री फार झाली आहेत’ पासून ’अमूक मंत्री सकाळच्या नाश्त्याला सफरचंदाचाच रस पीतात’ पर्यंत कशाचीही बातमी ’ब्रेकिंग न्यूज’ या नावाखाली चालू लागली. हे सर्व खपून गेले, लोकांनी याकडे बातमी कमी आणि करममणूक जास्ती या नजरेने पाहून सवय करून घेतली. अनेक मोठ्मोठ्या समूहांच्या, वृत्तपत्रांच्या, कॉर्पोरेट हाऊसेसच्या वृत्तवाहिन्या एकापाठोपाठ एक सुरू झाल्या आणि ’आम्ही वेगळे आहोत’ असे म्हणत सगळे एकमेकांचाच कित्ता गिरवायला लागले.

पण हे कुठपर्यंत? ’चॅनल चालू राहणं महत्त्वाचं, मग कशाचीही बातमी केली तरी चालेल’ असं म्हणत या वाहिन्यांच्या चालक-मालकांनी अक्षरश: स्वत:ची सदसदविवेकबुद्धी विकली. मुंबईचा दहशतवादी हल्ला हा तर सगळ्याचाच कळस होता. पहिली गोष्ट म्हणजे हा हल्ला इतका धक्कादायक होता, की पहिले काही तास या बातमीवर विश्वासच बसला नाही. परंतु वृत्तवाहिन्यांच्या कृपेने सगळेच ’लाईव्ह’ दिसत असल्याने रक्ताचे सडे, बंदोबस्तासाठी ठिकठिकाणी उभे असलेले पोलिस, त्यांच्याकडे असलेली शस्त्रे, कोणते अधिकारी कुठे निघाले आहेत आणि ’आता या क्षणी तुम्हाला काय वाटत आहे?’ असे संतापजनक प्रश्न- हे सगळे सगळे दिसले. जसे तुम्हा आम्हाला दिसले, तसेच दहशतवाद्यांच्या खबर्‍यांना आणि त्यांना मदत करणार्‍यांनाही दिसले. जे लोक सॅटेलाईट फोन वापरत होते, त्यांच्याशी संपर्क साधण्यात काय अडचण असणार होती? कोणते फोर्सेस मदतीला येत आहेत, कधी येत आहेत, कुठे आहेत- सर्व लाईव्ह खबरी द्यायला न्यूज चॅनल होतेच ना तत्पर! तरी पण यांना आपण देशहिताविरुद्ध चुकून काहीतरी करत आहोत याचा संशयही आला नाही! ’वार्तांकनात मीच कसा पुढे, माझाच चॅनल कसा सगळ्या बातम्या देतो, ’कोणाला काय वाटतंय’ हे कसं मलाच माहिती....’ या दर्पोक्त्यांमुळे आपण किती संवेदनशील बातम्या दहशतवाद्यांना बसल्या बसल्या पुरवतोय हे यांच्या ध्यानातही आले नाही! बरं, यांच्या नाही, तर किमान सरकारच्या तरी आले. म्हणून यांना ’लाईव्ह’ प्रक्षेपण करायला बंदी घातली, तरी यांना त्यातले गांभीर्य कळू नये???? यांनी या बंदीचीही बातमीच केली!!! ’आम्ही सगळेच नाही दाखवू शकत आत्ता, कारण देशहिताचा प्रश्न आहे, पण आमचे लोक इथेच आहेत, इथून असा गोळीबार होतोय, तिकडून अशी आग लागलीये’... करत पुन्हा सुरूच! कहर म्हणजे एक मिनिट उशीराचे प्रक्षेपण करून यांनी ’लाईव्ह’ कव्हरेजवरही पळवाट काढली!

कोणाचे किती नुकसान झाले, याला हे न्यूज चॅनल स्वत: साक्षीदार आहेत. अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मृत्यूला हेच जबाबदार आहेत असं म्हणलं जातं. हे विधान जरा अतिरंजित वाटले, तरी झटकन नाकारावे असेही नाही! परंतु, दुसर्‍या दिवशी चर्चगेटला गोळीबाराची अफवा पसरवण्यात मात्र केवळ न्यूज चॅनलचाच हात होता! इतके एकेकाळचे निर्भिड आणि डॅशिंग पत्रकार आता या वाहिन्यांवर काम करतात, एकालाही मनातूनसुद्धा स्वत:च्या या उलट्या कर्तृत्त्वाची शरम वाटली नसेल का? खातरजमा न करता बातम्या द्यायच्या आणि मग माफी मागायची? पोलिसांना, यंत्रणेला, सामान्य माणसाला वेठीला धरायचे तरी किती?
आता ही मागणी पुन्हा एकदा पुढे येत आहे की वृत्तवाहिन्यांना आचारसंहिता असावी. कोणत्या बातम्या लाईव्ह दाखवायच्या आणि कोणत्या नाही हे सरकारने ठरवावे. हाच मुळात खटकणारा मुद्दा आहे. या वृत्तवाहिन्यांमधे एकसे एक विद्वान, ’परदेशात’ शिकलेले, खडतर जागी जाऊन, राहून वार्तांकन केलेले असे अतिरथी महारथी आहेत, तर यांना स्वत:च्या जबाबदारीवर एक साधी आचारसंहिता नाही करता येत? तीही यांना कोणीतरी करून द्यावी लागते? कशासाठी? तर त्यातल्या पळवाटा शोधून काढण्यासाठी? यांच्या वृत्तवाहिनीचा मूळ उद्देश्याशी जरी ते प्रामाणिक राहिले तरी कितीतरी सकारात्मक बदल होतील. आज आसपास कितीतरी बातम्या आहेत, त्यांच्यावर काम करा ना. आज सामान्य माणूस कित्येक चिंतांखाली दडपून गेला आहे, त्याला वाचा फोडा. सरकारी यंत्रणेचा हस्तक्षेप नको असेल, तर त्यांच्याशी सहकार्य करा. लोकशाहीचा चौथा स्तंभ स्वत:ला म्हणवून घ्यायला आपण लायक आहोत का हा प्रश्न या माध्यामाशी निगडीत असलेल्या प्रत्येकानी स्वत:च्या मनालाच विचारला तरी बरेच काही साध्य होईल.

5 comments:

Deepak said...

या वृत्तवाहिन्यांमधे एकसे एक विद्वान, ’परदेशात’ शिकलेले, खडतर जागी जाऊन, राहून वार्तांकन केलेले असे अतिरथी महारथी आहेत, तर यांना स्वत:च्या जबाबदारीवर एक साधी आचारसंहिता नाही करता येत?
.... त्या रथी-महारथींची मती सध्या तरी माती चरत आहे .... परदेशात शिकले असतील - मात्र - परदेशातील कोणतीही वाहिनी - असे - लाईव्ह प्रक्षेपण दाखवल्याचे मी तर पाहिले नाही...!
टी.आर.पी. रेटींग्ज साठी बनवलेल्या "ब्रेकिंग न्युज" .... "आपको उस वक्त कैसा लग रहा था... कैसे महसुस कर रहे थे..." या सारखे प्रश्न ... " ^&*&*($%£$%"£$ .... कीव येते या लोकांची.... कुणाशी कंपेअर नाही करायचे, पण, पोटासाठी चामडी विकणा-यांपेक्षाही गये-गुजरे लोक आहेत हे... प्रेतांच्या टाळुवरचे लोणी खाणारे ¬`¬*#~@~~¬!

Anonymous said...

छान लिहिले आहे. दुर्दैवाने अशा अनेक गोष्टी कळत असल्या तरी माध्यमांमधील अनेकांना वळत नाही. एका वाहिनीने काही केलं, की लगेच बाकीचे मेंढरासारखे त्याच्या मागे लागतात. ताजमधून वाचलेल्या अनेक परदेशी पर्यटकांनी नंतर वाहिन्यांच्या पत्रकारांवर तोंडसुख घेतले ते यासाठीच.

a Sane man said...

सरकारच्या कायद्याचा एकमताने विरोध करून या च्यानेलवाल्यांनी स्वतःची आचारसंहिता ठरवली. पण ती पाळायची कुणी? जनतेच्या जीवावर सत्ता उपभोणार्‍यांना बोलायला मागे पुढे न पाहणारे हे लोक, आपले भाषणस्वातंत्र्यसुद्धा त्याच जनतेसाठी म्हणून आहे हे विसरले आहेत. स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार असा घेतला की हे असं होतं. ज्या लोकशाहीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर हे लोक गळे काढतात, ते लोकांसाठी म्हणून आहे, तुमच्यासाठी नाही ह्याची त्यांना जाणीव करून द्यायची वेळ आली आहे. कशी? हाच प्रश्न आहे.

pixelkeeda said...

hello...

आम्ही काही मित्रानि सर्व मराठी छायाचित्रकार एक्त्र आणण्या करता एक प्रयायस म्हणून flickr group बनवला आहे!!
http://www.flickr.com/groups/marathi/


We want it to be a resource to bring along marathi writers, artists, historians etc together.
So that we can all interact with each other. Share & do collabrative creative projects together.
Just on top of my mind would be photographers doing some photos for specific poems written by poets, Or photographers coolaberating with writers to shoot photographs to go with their writings.
Digital designer using beautiful layout & fonts to fuse together artworks.

If things start to work out fine we could eventually start something of an free download digital magazine, that is published every 3 months.

Plus it will be an exciting venture to take.

Since you are more aware with the writers world of marathi, please pass on this message to everyone who visits your blog & your friends who blog & write as well.

Also please join the flickr group. And you can publish the very same things you publish on your blog in a thread on the group.

All it takes is just using your yahoo mail id.

Please write to me on my email if you need more info Or have any more ideas to contribute.

I will also be very grateful to you if you put this up in marathi (अगदी शुध)on your blog as a post & every marathi forum you are member of.

Regards
Rushi
mailxrush@yahoo.com

संदीप चित्रे said...

maajhyaa manaatalaa lekh lihiaayas Poonam !!!