September 8, 2008

आवडत्या कविता

संवेदनी सुरु केलेला आवडत्या कवितांचा खो माझ्याकडे गायत्री (http://manmaitra.blogspot.com/) कडून आला. आभार गायत्री.

कविता हा एक अत्यंत सुंदर साहित्यिक आविष्कार. कित्येक भावना, कित्येक छटा मोजक्या शब्दात बांधून त्याला लयही देणे हे एक हाडाचा कविच करू जाणो. या भावनांच्या हिंदोळ्यात आपण आनंदानी हरवून जायचे फक्त.

पहिली कविता महाराष्ट्राचे काव्यदैवत- 'ग. दि. मा' यांची! अत्यंत सोपे शब्द, गहन आशय, पर्फेक्ट जुळणारी यमकं, एकाही शब्दाशी तडजोड न करता मांडलेली कल्पना... यांच्या काव्याबद्दल काय नि किती लिहायचं! त्यांचीच एक कविता ’दोन श्वान’! अगदी सोपी कविता, तसं म्हटलं तर उपदेशपरच आहे. पण असा सहजी उपदेश कोणी करत असेल तर नक्कीच ऐकायला आवडेल बुवा!

दोन श्वान

एका वटवृक्षाखाली बसूनीया दोन श्वान
एकमेकांना सांगती अनुभव आणि ज्ञान

एक वये वाढलेले, एक पिल्लू चिमुकले
वृद्ध-बालकात काही होते भाषण चालले

"कुणाठाई आढळले तुला जीवनात सुख?
"वृद्ध बालकास विचारी, त्याचे चाटूनीया मुख

"मला वाटते आजोबा, सुख माझ्या शेपटात
सदाचाच झटतो मी त्यात धराया मुखात

माझ्या जवळी असून नाही मज गवसत
उगाचच राहतो मी माझ्या भोवती फिरत"

अजाण त्या बालकाची सौख्य कल्पना ऐकून
क्षणभरी वृद्ध श्वान बसे लोचन मिटून

"कुणाठाई सापडले तुम्हा जीवनात सुख
तुम्ही वयाने वडील, श्वान संघाचे नायक"

नातवाच्या या प्रश्नाला देई जाणता उत्तर
"तुझे बोलणे बालका बिनचूक बरोबर

परी शहाण्या श्वानाने लागू नये सुखापाठी
आत्मप्रदक्षिणा येते त्याच्या कपाळी शेवटी

घास तुकडा शोधावा वास घेत जागोजाग
पुढे पुढे चालताना पुच्छ येते मागोमाग!"
-----------------------------

दुसरा नंबर संदीप खरेचा. कवितेचं नाव आहे ’करार’. ही कविता वाचता वाचताच घश्यात आवंढा दाटून येतो, संदीपचा आवाज आपोआप कानात ऐकू येतो- एक दु:खी कविता, तिच्या आर्ततेसकट डोळ्यासमोर येते..

करार...

चल आता बोलून घेऊ! बोलून घेऊ थोडे!
सुकण्याआधी माती आणि जाण्याआधी तडे!
संपत आलाय पाऊसकाळ! विरत चाललेत मेघ!
विजेचीही आता सतत उठत नाही रेघ!
मृद्गंधाने आवरून घेतलाय धुंदावण्याचा खेळ!
मोरपंखी पिसार्‍यांची ही मिटण्याची वेळ!
सावळ्या सावळ्या हवेत थोडं मिसळत चाललंय उन्हं!
खळखळणारी नदी आता वाहते जपून जपून!

चल आता बोलून घेऊ! बोलून घेऊ थोडे!
लक्षात ठेव अर्थांपेक्षा शब्दच असतात वेडे!
मनामधला कोपरा चाचपून घे नीट!
लपले असतील अजून कोठे चुकार शब्द धीट!
नजरा, आठवण, शपथा.. सार्‍यांस उन्हं द्यायला हवे!
जाण्याआधी ओले मन वाळायला तर हवे!

हळवी बिळवी होऊन पाहू नकोस माझ्याकडे
माझ्यापेक्षा लक्ष दे माझ्या बोलण्याकडे
भेटण्याआधी निश्चित असते जेव्हा वेळ जायची!
समजूतदार मुलांसारखी खेळणी आवरून घ्यायची!
एकदम कर पाठ आणि मन कोरे!
भेटलो ते ही बरे झाले! चाललो ते ही बरे!
मी हे घेतो आवरून सारे! तू ही सावरून जा!
तळहातीच्या रेशांमधल्या वळणावरून जा!
खुदा-बिदा असलाच तर मग त्यालाच सोबत घे!
’करार पूर्ण झाला’ अशी सही तेवढी दे!
--------------------------

आणि मोह आवरत नाही, म्हणून तिसरी कविता- नवोदित कवि- वैभव जोशीची. नवोदित असला तरी वैभव अत्यंत प्रतिभावान आहे, सोप्या शब्दात मोठा आशय मांडणे ही त्याची खासियत आहे. त्याची ही कविता प्रत्येकाला काही काळ अंतर्मुख करते, आणि दर वेळी वाचली की एक नवीन अर्थ उलगडून दाखवते. (या कवितेला ’स्टार माझा’ या चॅनलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या काव्यस्पर्धेत प्रथम पारितोषिकही मिळाले आहे.) ही कविता- ’डोह’

डोह

प्रत्येक डोहाचा तळ गाठायलाच हवा असं नाही
एखादा डोह असू द्यावा अथांग..

कुठल्याही क्षणी हक्कानं जावं
आपलं प्रतिबिंबही पडणार नाही
अश्या अंतरावर बसून बघत रहावं..
आपण डोहाकडे
डोहानी आपल्याकडे..

ना आपलया चेहर्‍यावर तृष्णा
ना त्याच्या पाण्यावर तरंग
मुळात अपेक्षाच नसतील तर कसला अपेक्षाभंग?

डोळ्यांनीच विचारावं त्याला
हा स्थायी स्वभाव कुठून मिळाला..?
हलकेच एखादं पान आपल्याकडे सरकवत
त्याने दाखवून द्यावं..
बरीच आंतरिक उर्मी आहे
पण तळाला..

अश्या वेळी ते पान परत पाण्यात सोडून द्यावं
हाती आलेला प्रत्येक पुरावा वापरायलाच हवा असं नाही
प्रत्येक डोहाचा तळ गाठायलाच हवा असं नाही

प्रत्येक डोहाचा तळ गाठायलाच हवा असं नाही
------------------------------------------

माझा खो संदीप ( http://atakmatak.blogspot.com/) आणि मीनु (http://meenuz.blogspot.com/) ला

2 comments:

Gayatri said...

Poonam,
aga aabhar kasale, maza number chukun lagla hota madhyech :)
Vaibhav Joshi nchi kavita kharach khup sundar ahe ga..
Tujhya katha ani lalit lekhan me nehemi wachate, mala awadta.
ya chan kavita share kelyas tyabaddal tuzech abhar :)

Meenakshi Hardikar said...

dona shwan mastaya ga.