May 29, 2008

मार्ग

रश्यासमोर उभ राहून अनया गुणगुणत होती.. दहा मिनिटांत तयार होऊन तिला निघायलाच हवं होतं, नाहीतर तिकडे शोभा वाट पहात बसली असती.. आज बरेच दिवसांनी अचानक खरेदीचा प्लॅन बनला होता. शनिवार आणि रविवारला जोडून शुक्रवारीही सुट्टी मिळाल्यानंतर 'काय करायचं?' असा अनयाला प्रश्नच पडला होता खरंतर. त्यातली आजची संध्याकाळ तरी मनासारख्या खरेदीत जाईल या विचारानी तिचा मूड एकदम मस्त झाला होता.. आपल्याला काय काय घ्यायचं आहे याची यादी तिने मनातल्यामनात केली, तर भली मोठी झाली होती. ’अरेच्च्या! बर्‍याच गोष्टी ’नंतर आणू’ म्हणत राहिल्याच आहेत की..’ अश्या विचारात ती होती, एवढ्यात बेल वाजली!’आता कोण’? कोणीही असेल तरी पटकन कटवायचं आणि बाहेरच पडायचं आता या विचारानी ती पर्स घेऊनच बाहेर आली आणि तिने जराश्या त्रासिक चेहर्‍यानीच दार उघडले..

दारात मनिष!
पायाशी ठेवलेल्या दोन बॅग्ज, प्रवासानी जरासे चुरगाळलेले कपडे पण चेहर्‍यावर तेच ते आत्मविश्वासानी ओतप्रोत भरलेलं हास्य!अनया पूर्ण चकित झाली! दारातच त्याला म्हणाली,
"अरे तू? आत्ता? काही कळवलंही नाहीस.."
"अगं, मला घरात तरी घेशील की नाही? का इथेच मिठी मारू तुला?"
ती लाजली.." ए, काय हे! जपून हं, मधे मला ब्रम्हे काकू विचारत होत्या, तुमचे मिस्टर सारखेच बाहेरगावी असतात, नाही?"
"हो? आयला! असतात म्हणावं, आणि म्हणूनच आले की मला सोडत नाहीत अजिबात..हे असे.." धसमुसळेपणानी तिला ओढत तो म्हणाला. "हाक मारू का काकूंना दाखवायला?" मिस्किलपणे हे वर!
"मनिष!" अनयानी स्वत:ची सुटका करून घेतली आणि ते आत आले.

तिच्याकडे पहात तो म्हणाला, "कुठे बाहेर निघाली होतीस?"
पटकन अनया म्हणाली, "अरे हो, बघ ५ मिनिटं उशीरा आला असतास तर चुकामुक झाली असती आपली.. शॉपिंगला चालले होते रे ऑफिसमधल्या मैत्रिणीबरोबर. 'येणार' असा फोन का नाही केलास?"
"फोन काय करायचाय? तू कुठे जाणार? घरीच असशील असं वाटलं मला. बर, सांग आता तुझ्या मैत्रिणीला 'प्लॅन कॅन्सल' म्हणून.." सोफ्यावर बसत तो सहजपणे म्हणाला..
"हो, करते ना.." मनातून अनया जरा हिरमुसलीच.. शॉपिंगला जायचा मस्त मूड झाला होता, शॉपिंग करायच्या वस्तूही होत्या.. आणि नेमका...!
शोभाला काहीबाही थापा मारून तिने मनिषकडे लक्ष वळवले..

मनिष सोफ्यावर मान ठेवून निवांतपणे डोळे मिटून बसला होता.. त्याच्या शेजारी जाऊन तीही बसली. त्याच्याकडे नुसतं पाहूनच गेल्या तीन आठवड्यातले मनातले सर्व विचार भुर्रकन उडून गेले, मनाशी घेतलेला निर्णय डळमळीत व्हायला लागला. प्रेमानी त्याच्या चेहर्‍यावरून हात फिरवत तिने विचारलं,"दमलास?"
"अं? हो गं.. काय टूरींग केलंय गेले दहा दिवस.. उदयपूर, जयपूर, आग्रा.. कंटाळा आला.. आज एक दिवस लवकर संपवलं आणि चक्क पळून आलोय तुझ्याकडे.." हसत हसत तो म्हणाला.. तिच्या मांडीवर डोकं ठेवून म्हणाला, "खूप खूप दमलोय अनु.. हे दोन दिवस खूप रीलॅक्स करायचंय मला.. आणि तूही उगाच तुझी काही कामं काढायची नाहीस आणि उगाच किचनमधेही वेळ घालवायचा नाहीस, ओके? अंऽऽऽऽ फक्त तुझ्या हातचे दडपे पोहे, सोड्याची आमटी, फिश फ्राय आणि सोलकढी आणि भजी कर.. झालंच तर, म्हणजे बघ हं, वेळ मिळाला तर त्या सायीच्या वड्या पण कर ना.. कसल्या विरघळतात त्या जीभेवर.."
अनयाला ऐकता ऐकता हसूच आलं, "हंऽऽ चालेल.. कालच द्रौपदीची थाळी घेऊन आले आहे. त्यावर पदार्थाचं नाव लिहिलं की पदार्थ समोर हजर.. अजिबात स्वयंपाकघरात वेळ जात नाही, कसलं मस्त ना?"
"अं?" आपल्या बोलण्यातला विरोधाभास आणि तिचा शेरा समजून मनिषही हसला..

पुष्कळश्या साचलेल्या गप्पा ती स्वयंपाक करताना आणि जेवताना झाल्या, तरी पण अनयाचं मन शांत नव्हतं. मनिष नसताना सर्व बाजूंचा विचार करून घेतलेला निर्णय तो समोर आला की चुकीचा वाटत होता.. किती अवलंबून होते ते एकमेकांवर.. मनाची जी तडफड चालू असायची ती त्याला भेटलं की कुठल्याकुठे पळून जायची.. पण त्यासाठी तो निवांतपणे भेटायला हवा असायचा आणि तेच तर अवघड होतं.. तिला पहिजे तेव्हा तो नसायचाच.. त्याला वेळ होईल तेव्हाच ते एकत्र.. या नात्यात तिला कितीसा ’से’ होता? वर्षापूर्वी अपेंडीक्सचं ऑपेरेशन अचानक उद्भवलं.. वेदनांनी कासावीस झाली होती ती.. तेव्हा तो मुंबईत असूनही येऊ शकला नव्हता.. नंतर कितीही मनापासून शुश्रुशा त्याने केली असली, तरी ’त्या’ वेळी ती एकटीच होती ना? हे आणि असे अनेक प्रसंग.. विसरणं अवघड व्हायचं..

आणि मनिष जणू एका दुसर्‍या बेटावरच होता. अनयाच्या मनातल्या उलथापालथीची कल्पनाही त्याला नव्हती. तीन आठवड्यानंतर अनया भेटत होती आणि तो त्यातच खुश होता. अधीरपणे त्याने तिला जवळ ओढलं.. अनयाला खरंतर त्याच्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं, पण मनिष त्या मूडमधे नव्हता.. "अनया! आय हॅव मिस्ड यू अ लॉट.. आत्ता काही बोलू नकोस प्लीज.."
त्याच्याबरोबर तीही सुखात नाहून गेली, पण मनातले प्रश्न तसेच मनात घिरट्या घालत होते..नंतर अनयाला झोपच आली नाही..

तिला तिचा आत्तापर्यंतचा प्रवास आठवला.. अनुसूया पाटीलची अनया कामथे.. कुमारिका ते सौभाग्यवती ते विधवा.. सारा काही सहा महिन्याचा खेळ! आठ माणसांच्या कुटुंबातली होती ती एकेकाळी, अविनाशच्या अपघाती मृत्यूनंतर एका क्षणात अगदी एकटी पडली.. माहेर आणि सासर- सगळ्यांनीच जबाबदारी झटकली- आईवडीलांनी गरिबी म्हणून आणि सासू-सासर्‍यांनी ’पांढर्‍या पायाची म्हणून’! साध्या टॅली ओपेरेटर पासून एका चांगल्या फायनॅन्शीयल कंपनीच्या ओरॅकल सपोर्टची प्रमुख झाली होती ती केवळ सहा वर्षात- तिच्या जिद्दी स्वभावामुळे, नशीबाच्या साथीमुळे आणि योग्य वेळी योग्य मार्गदर्शक भेटल्यामुळे! अनयाला अचानक तिचं ते गावाकडचं, मुंबईला घाबरलेलं बुजलेलं रूप आठवलं.. आत्ता स्वत:च्याच आधुनिक रूपाकडे बघताना तिला दोन्हीतली तफावत जाणवली आणि एकदम हसूच आलं! काय काय अनुभव आले नाहीत या सहा-सात वर्षात.. नाती अशी हा हा म्हणता बदलताना पाहिली.. पुरुषांचे तर एकएक अनुभव आठवले तरी किळस वाटे.. ’खरंच, मनिष आयुष्यात आला नसता तर किती रखरखीत आयुष्यं झालं असतं आपलं!’ तिने प्रेमभरानी मनिषकडे पाहिलं- तो अजूनही गाढ झोपेतच होता..

मनिषचं व्यक्तिमत्त्व खूपच आकर्षक होतं. एच.आर मधे अगदी शोभायचा तो. उंच, गोरा मनीष आपल्या भारदस्त व्यक्तिमत्त्वानी आणि वक्तृत्वानी समोरच्याला जिंकून घ्यायचा. ती आणि तो प्रथम त्यांच्या कंपनीच्या पगाराचं पॅकेज आणि ओरॅकल सिस्टीम या संदर्भात चर्चा करायला भेटले.. आणि मग एकमेकांची कशी भुरळ पडली, समजलंच नाही! ती आणि मनिष आता जवळपास साडेतीन-चार वर्ष तरी रहात होते की एकत्र..

’एकत्र?’ अनयाच्याच मनानी प्रश्न विचारला..
’हो, एकत्रच की.. त्याला वेळच नसतो, त्याला काय करणार? वेळ मिळाला की येतोच तो इकडे..’ मनाची समजूत घालणं पुन्हा सुरू झालं आणि पुन्हा अनयासमोर एकामागोमाग एक प्रश्न उभे रहायला लागले.. त्याला एकच उत्तर दिसत होतं तिला, कुठेतरी ते पटतही होतं, पण ते मनिषसमोर ते सगळंच कसं मांडायचं हे समजत नव्हतं..

तिने एक सुस्कारा टाकला आणि मनिषच्या अंगावर हात टाकून पुन्हा झोपी गेली.

"आज उठायचा बेत आहे की नाही?"मनिषचा आवाज येत होता.. अनया ताडकन उठून बसली.. साडेआठ वाजले तरी तिला जाग आली नव्हती.. हे असं कधीच व्हायचं नाही खरंतर..
ती लगबगीनी उठायला लागली,"बापरे, काय उशीर.. काल बराच वेळ जागी होते.. आणि नंतर जी झोप लागली..
"मनिष प्रेमानी म्हणाला, "असूदे गं, चालतं एखाददिवस.. ये, मी मस्तपैकी चहा केलाय.."
चहा बरोबर सँडविचही तयार होतं! अनया एकदम खुश झाली, मनिष खूपच फ्रेश दिसत होता.
"ह्म्म.. आज काय प्लॅन? ए, सिनेमा बघूया?"
"सिनेमा?" मनिषचा सावध प्रश्न आला, आणि अनया गप्प झाली.ते पाहून मनिष म्हणाला, "चेहरा ठीक कर अनु.. तुला माहित आहेत ना आपले constraints... सिनेमा अवघड पडतो गं, हॉटेलिंग म्हणलीस तर चालेल, .."
"हो ना? मग जाऊया चौपाटीवर भेळ खायला? आणि बग्गीत बसायला?" अनयानी उपहासानी विचारलं.
मनिषच्या चेहर्‍यावर हताश भाव आले.."why are you being so difficult? मागच्यावेळी चौधरीनी काय तमाशा केला तुला माहित आहे.. ते निस्तरता निस्तरता नाकी नऊ आले माझ्या.. आणि चौपाटी म्हणजे हॉटेलिंग का? मस्त फाईव्ह स्टार मधे जाऊ, किंवा नवीन नवीन चकाचक पब्ज आहेत.. ते सोडून चौपाटी कसली?"
गंभीर होत अनया म्हणाली, "त्यातही एक सुख असतं रे.. पण जाऊदे, ते सुख तुझ्या आणि माझ्यासाठी नाही.. सॉरी, मी उगाच बोलले.." पटकन सावरून घेत ती म्हणाली, "सीडी आण ना कोणतीतरी, नाटकाच्या पण मिळतात हल्ली..जेवायला काय करू? उद्या मासे करीन, आज काहीतरी साधंच करते, चालेल ना?" तिने गाडी मूळ पदावर आणायचा प्रयत्न केला, पण मूड थोडा बिघडलाच.. काल मनात गाडलेल्या असंख्य गोष्टी पुन्हा मान वर करायला लागल्या.

त्यांची आवराआवर, थोड्या गप्पा चालूच होतं, इतक्यात मनिषचा मोबाईल वाजला.. तसा तो नेहेमीच वाजत असे म्हणून अनयानी विषेश लक्ष दिले नाही. पण नंबर पाहिल्यावर मनिष एकदम सावध झाला..
"हां बोल.. काय? कधी?"
अनयाला एकच बाजू ऐकायला येत होती, त्यामुळे तिला कळलं नाही, नक्की कोण बोलतंय, पण मनिष गंभीर झाला, थोडा घाबरल्यासारखाही वाटला. ती हातातलं काम सोडून त्याच्याजवळ आली.
"हो, मी येतोय, निघतोय लगेच.." म्हणत त्याने कॉल संपवला.. तो प्रचंड अस्वस्थ दिसत होता.
"काय रे? कोणाचा फोन?"
"ज्योतीचा फोन होता.. सोनियाला हॉस्पिटलमधे ऍडमिट केलंय.. काल पडलीये बागेत खेळताना, पायाला फ्रॅक्चर आहे, मुका मारही बराच आहे.. श्या! इतकी धडपडी आहे ना.. अजून कुठे कुठे लागलं असेल.. ज्योती नीट सांगत एक नाही.. आता तिला बघितल्याशिवाय मला चैन पडणार नाही.. काय करू? मी जाऊ का लगेच? जातोच.. तासात पोचीन मी.." मनिषची तगमग होत होती..
अनया पटकन म्हणून गेली, "नाही, मनिष, तुला लगेच नाही निघता येणार.. तू अजून जयपूरमधेच आहेस लौकिक अर्थी.. "
मनिषनी तिच्याकडे नुसतं बघितलं आणि एक सुस्कारा टाकला.. त्याने हातामधे डोकं खुपसलं आणि खुर्चीत धप्पकन बसला. अनया त्याच्या शेजारी बसली, "काळजी करू नकोस जास्त. वाटेल तिला बरं.."
"अगं, पण साधं फ्रॅक्चर असेल तर ऍडमिट नाही करून घेत, नक्कीच काहीतरी जास्त असणार.. काल संध्याकाळी झालंय हे आणि हिने मला आत्ता कळवलं.. काल हे सगळं झाल्या झाल्याच कळवलं असतं तर मी सरळ घरीच गेलो असतो ना? इथे कशाला आलो असतो? जस्ट इमॅजिन.. काल मी इथे तुझ्या मिठीत होतो तेव्हा तिकडे माझी लेक बिचारी कळवळत होती.." काळजी, अस्वस्थता, चिडचिड, राग.. सगळं काही मनिषच्या बोलण्यातून जाणवत होतं..

अनयाला ऐकून धक्का बसला! बाकी सगळं ती समजू शकत होती.. पण गिल्ट? इथे आल्याचा पश्चात्ताप तर होत नव्हता मनिषला? अनवधानानी मनातलं तर बोलून गेला नव्हता ना तो? आता तिच्या मनाचा निश्चय झाला.. अनायसे विषयाला वाचा फुटली होती..
"मग तू पुन्हा फोन कर ना ज्योतीला.. नीट विचारून घे सगळं, म्हणजे तुला थोडं बरं वाटेल.." स्वत:वर ताबा मिळवत शांतपणे ती त्याला म्हणाली.
"ह्या! ती व्यवस्थित काही सांगत नाही गं, स्वत:च जाम गोंधळलेली असते.."
"अरे, मग अश्यावेळी तूच तिला समजावयला नको का? धीर द्यायला नको का? बोल तिच्याशी, बरं वाटेल तिलाही आणि तुलाही.." त्याला समजावत ती आत गेली.. तिच्या स्वत:च्या मनाला समजावायला..

बाहेरून मनिषच्या बोलण्याचे आवाज येत होते, आणि अनया स्वत:च्याच विचारात गढली होती.. इतक्यात मनिषही आत आला.. त्याच्या चेहर्‍यावरचा ताण बराच हलका झाला होता..
"you were right! काल संध्याकाळी सोनियाला घेऊन डॉक्टरकडे ज्योती गेली तेव्हा मुख्य डॉक्टर नव्हते, त्यांच्या ज्युनिअरनी प्लास्टर घातलं.. म्हणून ते बघेपर्यंत ठेवून घेतलंय.. nothing serious, thank God! आज संध्याकाळी सोडणारेत.. मी गेलो की.." त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवले, "thanks! अनया. नेहेमीप्रमाणे घरचा इश्यू झाला की मी पॅनिक होतो आणि तू मला बरोब्बर सावरतेस. आता मनावरचं ओझं थोडं कमी झालं. thanks so much!" तिला जवळ ओढत तो म्हणाला.

स्वत:ला त्याच्या मिठीतून सोडवून घेत ती म्हणाली, "जरा आपण बसून बोलूया.. तुला मला काहीतरी सांगायचंय.."

तिचा गंभीर आवाज ऐकून तो थबकला. पण काही न बोलता तिच्या मागोमाग बाहेर गेला..
"मनिष, गेले अनेक दिवस मी विचार करत आहे याबद्दल. तुझ्याशी कसं बोलावं हेच समजत नव्हतं, पण आत्ता जे काही झालं, त्यानंतर म्हणलं बोलूनच टाकावं.."
"काय, कशाबद्दल म्हणत्येस?" मनिष गोंधळला, त्याला काहीच समजेना.
मोठ्ठा श्वास भरून घेत अनया म्हणाली, "मला असं वाटतं की आपण या आपल्या नात्याला पूर्णविराम द्यावा आता."
मनिषवर बाँम्बच पडला. त्याने अनयाचा हात घट्ट पकडला, "काय? का?"
मनाचा हिय्या करून अनया म्हणाली, "हो. पूर्ण विचाराअंती बोलतीये मी हे. आपण थांबूया आता. "
"अगं पण का? आणि ही अशी अचानक सगळं संपवण्याचीच भाषा? काय झालंय तरी काय?"
"हे मला सांगायला फार काही आनंद होत नाहीये मनिष. तुला माहीत नाही, या निर्णयापर्यंत यायला मला कशाकशातून जावं लागलंय ते. मी पूर्णपणे एकटी होते जेव्हा आपण भेटलो.. नुकती कुठे स्थिरावत होते. अवि गेल्यानंतर मला अक्षरश: वार्‍यावर टाकलं सगळ्यांनी. तेव्हा सतत तेच डोक्यात असायचं- स्वत:च्या पायावर उभं रहायचंय, स्वतंत्र व्हायचंय, कोणावरही कशासाठीही आपण अवलंबून असता कामा नये.. आणि मी तशी होतही होते.. त्या भरात एककल्ली, माणूसघाणीही.. मीही एक स्त्री आहे, मलाही प्रेमाची, आधाराची गरज आहे हे तर विसरलेच होते. आजूबाजूच्या पुरुषांच्या नजरा, त्यांचे किळसवाणे हेतूच दिसायचे फक्त.. आणि देवानी अक्षरश: तुला पाठवले माझ्याकडे.. मनिष, माझ्यातल्या स्त्रीला तू जागृत केलंस, प्रेम करणं, करवून घेणं यातलं सुख तू मला दाखवलंस.. तू माझं आयुष्य किती समृद्ध केलंयेस, याची तुला कल्पनाच नाहीये.." बोलता बोलता अनयाला भरून आलं.

मनिषनी तिला जवळ घेतलं, "हे मला माहीत नाहीये का? तूही माझा आधार आहेस अनु. ज्योती, सोनिया असल्या तरी मला तुझी त्यांच्यापेक्षाही जास्त गरज आहे.. तुला माहीत्ये ना? मग का हे सगळं आत्ताच बोलत आहेस?"

ज्योतीचा उल्लेख आल्यानंतर अनया भानावर आली. नाही, असं भावनावश होऊन चालणार नव्हतं. तिने डोळे पुसले.

"पण हे किती दिवस चालणार आहे? तुला एक संसार आहे, तुझ्यावर, तुझ्या वेळेवर त्यांचा हक्क आहे मनिष. आणि त्याचवेळी मलाही तुझी गरज आहे, हे ही तितकंच सत्य आहे. पण माझा तुझ्यावर काय हक्क आहे? काहीच नाही! मी तुला मोकळेपणी कधीही फोन नाही करू शकत, आपण उघडपणे हिंडू-फिरू शकत नाही कुठेही.. फाईव्ह स्टार होटेल्स आपल्यासाठी आहेत, कारण तिथे कोणी बघितलंच तर तू सांगू शकतोस की क्लायंट बरोबर होतो.. पण रस्त्यावरचं शॉपिंग, चौपाटीवरचे गोलगप्पे आपल्यासाठी नाहीत- कारण तू एक्स्प्लेन कसं करू शकशील? कोण होती ही बाई? तेच सिनेमाबद्दल.. माझा वाढदिवस आपण पहिल्यांदा कसा साजरा केला आठवतंय? माझ्या वाढदिवसाचं कौतुक कोणीच कधीच केलं नाही, पण त्या वर्षी तू मला जवळजवळ स्वर्ग दोन बोटं उरतील असं कोडकौतुक केलंस.. मनाला आशा लागून रहाते रे! त्यानंतर सलग तीन वर्ष पुन्हा अंधारच! तू उघडपणे नाही येऊ शकलास. बरं, माझा सोड.. पण तुझा वाढदिवस तरी मी माझ्या मनाप्रमाणे एकदाही साजरा नाही करू शकले.. कारण तो दिवस तुझ्या कुटुंबाचा!! या फार क्षुल्लक गोष्टी आहेत, पण मनाला लागून राहतात रे.. बाईचं मन फार विचित्र असतं.. मला तू मिळाला आहेस, पण मला तुला मिरवायचंही आहे.. मला जगाला दाखवायचं आहे की हा मनिष आहे, याच्यावर मी प्रेम करते, हाही माझ्यावर करतो निस्सीम प्रेम. पण! आपल्या नात्यात हे कधीच शक्य होणार नाही. या अश्या लुटूपुटूच्या थोडक्या भेटी, सावध वागणं हे नाही मला सहन होत.. आणि तुझीही फार ओढाताण होते हे दिसतंय मला.. तू पूर्णपणे माझा कधी नव्हतासच, पण तू त्यांनाही त्यांच्या हक्काचा वेळ देऊ शकत नाहीयेस माझ्यामुळे.. " अनयाला पुन्हा रडू यायला लागलं.

मनिष काहीच बोलू शकला नाही यावर. ती बोलत होती ती प्रत्येक गोष्ट खरी होती. तो हे नातं उघड करू शकत नव्हता. त्याच्यात इतके गट्स नव्हते की ज्योतीसमोर अनयाला तो ऍक्सेप्ट करू शकेल. फक्त ज्योतीच नाही, तर सोनिया होती, त्याचे-तिचे आईवडील, नातेवाईक होते, आज त्याची कॉर्पोरेट जगातही एक छाप होती.. अनयाबरोबरचं नातं उघड करणं म्हणजे या सगळ्यालाच सुरुंग लावणं, आणि ते करण्याचं धैर्य त्याच्याकडे नव्हतं. पण अनयामधे तो इतका गुंतला होता की हे सगळं माहीत असूनही तिच्यापसून लांब रहाणं शक्य होत नव्हतं. अनयाच्या बुद्धिमत्तेचं त्याला कौतुक होतं, तिच्या जिद्दीपुढे तो नतमस्तक होता.. ती अक्षरश: ’सेल्फ-मेड’ होती.. कोणावरही अवलंबून नसलेली, स्वत:ची जागा केवळ स्वत:च्या हिंमतीवर मिळवलेली, आणि त्याचबरोबर प्रचंड हळवी, त्याचा भक्कम आधार असलेली, त्याच्यासाठी काहीही करायला तयार असणारी! तिच्यासाठी काय करू आणि काय नको असं व्हायचं त्याला..

पण!

शेवटी सत्य हेच होतं की त्यांचं नातं चोरटं होतं. ते उघड करायची गरज त्याला वाटत नव्हती, हिंमत आणि इच्छा तर मुळीच नव्हती. पण जे चालू होतं ते व्यवस्थित होतं की! कशाला अनया यावर बोलत होती आत्ता? तो पुन्हा चुळबुळायला लागला.

"म्हणूनच म्हणते की ही ओढाताण संपवूया आता." अनया पुढे म्हणाली.
"म्हणजे? म्हणजे काय? मी तुझ्याकडे आता येऊ नको का? कधीच नको? का गं? कसलं माझं ओझं होतंय तुला? कधीतरी एक वीकेंड मी मागतो तुझा.."
"हा एखादाच वीकेंड तर नकोय ना मला मनिष! तुला समजत नाहीये का? मला तुला रोज भेटायचंय, मला तुझ्याबरोबर रहायचंय, मला तुझ्याबरोबर एकत्र रहायचंय. बोल? जमेल आपल्याला?"

मनिष गप्प झाला.

"नाही ना जमणार? घरून एक फोन आला की तू अस्वस्थ होतोस, सारासार विचार करायची ताकद गमावतोस.. इतका टची आहेस तू त्यांच्याबाबतीत. मग काय अर्थ आहे आपल्या या भेटण्याला? या नात्याला? इतके वर्ष मला हे समजत नव्हतं असं नाही, पण मला ते सुख हवं होतं रे तेव्हा. पण आता नाही. मला माझ्या वाट्याचं सुख मिळालं आहे, खूप खूप दिलं आहेस तू मला. आता पुरे. मला तुला हेच सांगायचं होतं. ना धड तू माझा आहेस ना ज्योतीचा आणि सोनियाचा. तुला कोणा एकाची निवड करावी लागेल. but I don't want to make things difficult for you either. तुला धर्मसंकटात नाही घालत मी. मी माझ्या मनाला समजावीन. मी रहायला शिकेन पुन्हा एकटी.. अरे सवयीचा भाग असतो, होईल मला पुन्हा सवय." ती खेदानी त्याला आणि पुष्कळसं स्वत:लाच समजावत म्हणाली. तिने एक मोठ्ठा श्वास घेतला. "ही आपली शेवटची भेट आहे. दोन आठवड्यांनी मी बंगलोरला जात आहे, खरंतर मीच मागून घेतलीये ही ट्रान्स्फर. नवीन सेट अप आहे तिकडे. सिस्टीम्स सेट होतील आणि मीही. कुमार आहे तिकडे इन-चार्ज.. मागच्या वर्षी तो इकडे होता काही महिने तेव्हा माझा चांगला मित्र झालाय तो. He will take care that I will be comfortable in office. काही मैत्रिणीही आहेत, त्यांच्याकडे रहाण्याची सोय होईल.. खरंतर मी तिकडचा फार विचार नाही केलेला. होईल सगळं आपोआप. केलं की होतं सगळं, माहित आहे मला. मी आता इथून जाणारे हे मात्र नक्की."

"म्हणजे सगळं संपलंच अनया?" हरलेल्या आवाजात मनीषनी विचारलं.

"हो,आपल्याकडे मार्गच नाहीये दुसरा. हा ताण नाही होत आता सहन. मी फार अपुरी आहे मनिष तुझ्याशिवाय. पण हे अर्धंमुर्धं अपुरेपण तरी पूर्णपणे अनुभवू दे मला. मी इथे नसेनच तर आपल्या भेटीही संपतील. हे नातंही अर्धवट रहाणार नाही, संपेलच. संपवूच आपण." अनया डोळे पुसत निर्णायक स्वरात म्हणाली.

या वेळी नशीबानी नाही, तर तिनी स्वत:साठी एक नवीन मार्ग निवडला होता. त्याच्यावर चालायची तिला तयारी करायची होती..

6 comments:

HAREKRISHNAJI said...

that's great story.

Vidya Bhutkar said...

'I want a Fairy Tale' :-) Pretty Woman madhla he vakya athaval. :-D Sometimes tough decisions have to be made in one go, it may hurt but just for a while.

Good one.
-Vidya.

कोहम said...

Good one....manishla jara jastach varacha darja dilay asa vaTla. he wanted to have good of both worlds, which doesnt happen normally. It appeared as if, he was OK with the split or maybe he was expecting it. Opportunist asava to, paN kathet vaTala nahi.

कोहम said...

Good one....manishla jara jastach varacha darja dilay asa vaTla. he wanted to have good of both worlds, which doesnt happen normally. It appeared as if, he was OK with the split or maybe he was expecting it. Opportunist asava to, paN kathet vaTala nahi.

Anonymous said...

good one !!!

Anonymous said...
This comment has been removed by a blog administrator.