October 15, 2007

जे जे उत्तम

"पुस्तक वाचतांना अनेकदा काही परिच्छेद आवडतात. संपूर्ण पुस्तकाचा विचार केला तर कदाचित ते तितके महत्त्वाचे नसतीलही; पण त्या त्या वेळेला ते आवडून जातात. असेच काही आवडलेले उतारे, कुठल्याही भाष्याशिवाय देण्याचा हा एक उपक्रम. अर्थात मागचा-पुढचा संदर्भ जरी नसला, तरी तो तितका उतारा वाचनीय वाटावा इतपत उद्धृत करायचा प्रयत्न करेन. आपल्या प्रतिक्रियेचे स्वागत आहे."

-----------------------------------------------------------------------
डॉ. नरेंद्र जाधव यांचं अत्यंत गाजलेलं पुस्तक ’आमचा बाप आन आम्ही’ यातला हा उतारा..

"'तुम्ही भारतातून बाहेर पडू शकता, पण भारत काही तुमच्या मनातून बाहेर पडू शकत नाही' असे म्हणतात ते सर्वार्थानी खरे आहे. प्रत्येक परदेशस्थ भारतीयाच्या मनात विरंगुळ्याच्या क्षणी असतो तो आपला देश. अनिवासी भारतीय एकत्र आल्यानंतर, कित्येकदा, आपल्या देशाला दूषणे देताना दिसतात. मात्र त्यामागे, आपण आपल्या देशात नाही याचे त्यांना वाटणारे वैषम्य किंवा वैफल्य असल्याचे जाणवल्याशिवाय राहत नाही. आपल्या परदेशी रहाण्याचे स्वत:शी समर्थन करणे किंवा स्वत:ची समजूत काढणे ही भूमिका बहुतांशी त्यामागे दडलेली असते.

जी गोष्ट देशाची, तीच आपल्या मनात वसलेल्या वस्तीची. प्रत्येकाच्या मनात लहानपणापासून एक वस्ती घर करून असते. या वस्तीतल्या घटना जिवंत असतात- एखाद्या चित्रपटाप्रमाणे सलग तुम्ही त्या पाहू शकता. त्या वस्तीतल्या लोकांचे वय वाढत नाही- त्यांना तुमच्या मनानी चिरतारूण्य बहाल केलेले असते. तुम्ही आज सकाळी काय खाले हे चटकन आठवणार नाही. मात्र ’त्या’ वस्तीतले प्रसंग, व्यक्ती, त्यांचे संभाषण किंवा कोणाबरोबर तुम्ही कुठे-काय खाल्ले याचा तुम्हाला विसर पडू शकत नाही. या वस्तीबद्दल इतरांना काही अप्रूप वाटो अथवा न वाटो, त्याचा विचार करण्याची तुम्हाला गरज भासत नाही. वर्तमानात जगत असताना ’भव्य हिमालय तुमचा अमुचा, केवळ माझा सह्यकडा’ अशी अतीव आपुलकीची भावना आपल्या मनातल्या वस्तीबद्दल असते. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात साध्या आमटीसाठी अन्नसत्याग्रह पुकारला तो काही एका य:कश्चित खाद्यपदार्थासाठी नव्हता, तर तो होता त्यांच्या मनातल्या वस्तीसाठी! न्यूयॉर्कमधे ७७व्या मजल्यावरच्या एका उपहारगृहात उत्कृष्ट कॉफी मिळते म्हणून एखाद्या जुन्या मित्राला घेऊन जावे तर तो रुईया कॉलेजजवळच्या ’मणी’मध्ये जी कॉफी मिळते तशी झकास कॉफी जगात कुठेही मिळत नाही हे छातीठोकपणे तुम्हाला सांगू शकतो. दोष त्याचा नाही. भूतकाळापासून मनात दडलेली वस्ती, कळत-नकळत, वर्तमानात डोकावत असते, बोलकी होत असते हेच खरे!"

-------------------------------------------------------------------

डॉ. जाधव आणि त्यांची भावंडे आज अथक परिश्रम आणि अभ्यासामुळे उच्च पदावर पोचली आहेत. त्यांच्या वडीलांच्या प्रोत्साहनाचा फार मोठा भाग आहे यात. ते म्हणतात की ’वडाळ्याच्या त्या वस्तीत कितीतरी मुलं होती, आज ती का वर नाही येऊ शकली? किंवा, आम्ही भावंडं वर का येऊ शकलो?- कारण आमच्याकडे ’आमचा बाप’ होता!’ वास्तविक ते ज्या परिस्थितीतून वर आले, त्यात काहीच अभिमानास्पद नाही.. सर्व भावंडांचं बालपण जिथे गेलं ती होती अगदी साधी वडाळ्याची दलित वस्ती. मात्र, डॉ. जाधव कधीही हे लपवायचा प्रयत्न करत नाहीत, हे मला खूपच भावले. आणि त्याहीपेक्षा, या उतार्‍यातले अक्षर अन अक्षर पटलेय मला.. बालपणीची वस्ती.. कधीही तो विचार केला की नॉस्टाल्जिक व्हायला होतेच.. (यावर एक वेगळा ब्लॉग होऊ शकेल, पण ते नंतर कधीतरी!!)

या स्तुत्य उपक्रमाचा जनक ’नंदन’ याचे विशेष आभार. आणि मला यात सामावून घेतल्याबद्दल ’स्वाती’, ’पराग’ आणि ’अनु’ चे स्पेशल धन्यवाद! हा उपक्रम पुढे नेण्याची जबाबदारी मी आता यांच्याकडे देते:

मिलिंद (http://milindchhatre.blogspot.com)
देवीदास (http://akbrahms.blogspot.com)
मीनु (http://meenuz.blogspot.com)
संदीप (http://atakmatak.blogspot.com)
हरेकृष्णाजी(http://harekrishnaji.blogspot.com)

7 comments:

Devidas Deshpande said...

डॉ. जाधव जे म्हणतात ते बरोबर आहे. सध्याच्या जमान्यात लोकांचे स्थलांतर जेवढे वाढले आहे, तेवढेच स्वतःच्या मूळस्थानाशी जोडलेल्या नाळेचे भानही वाढत चालले आहे. एक स्थ्लांतरीत म्हणून मी हे स्वतःच्या अनुभवाने सांगू शकतो.
तुमच्या या उपक्रमात मला सहभागी करून घेतल्याबद्द्ल खरंच आभारी आहे. मला जरा वेळ लागेल, मात्र मी नक्कीच काहीतरी contribute करू शकेन.

HAREKRISHNAJI said...

Thanks for including me.
Pl give me day or two,I will write on the said topic, Father and son.

स्वाती आंबोळे said...

छान उतारा निवडलास पूनम. टॅग फॉलो केल्याबद्दल धन्यवाद. :)

संदीप चित्रे said...

Hi Poonam,
That's really nice :) I also have the book with me. Did you know that Ust. Bismillah Khan was the one who said those words when he was asked to migrate to USA? Per my understanding, he also said you can set up 'second banaaras' city for me there but you can not bring my 'gangaa' there :)
I will try to join the tagging upakram as soon as possible. 'Tulip' (http://tulipsintwilight.blogspot.com) also asked me to join tagging but am not able to do so yet !!

Parag said...

mast lihilays Poonam.. :)

priyadarshan said...

कथेतला उतारा माझ्या बॉगवर लिहीला आहे.

Dhananjay said...

Chhan utara ahe! tuzya bakichya katha pan avadlya!

Dhananjay