October 8, 2007

परतफेड

भिरामचे नाव पुकारले गेले आणि केतकी भानावर आली. गेला काही वेळ ती तिच्याच विश्वात हरवली होती. वास्तवात येताच पटकन तिने स्वत:चा चेहरा ठीक केला. अभिरामचा अवॉर्ड घेतानाचा फोटो काढला. हे अवॉर्ड म्हणजे अभिरामच्या कष्टांचं जाहीर कौतुक होतं. कंपनीच्या ६००० लोकांमधे फ़क्त २० जण असे होते, आणि त्यात अभि एक होता. त्याच्या सार्थ अभिमान वाटला तिला.

नंतरच्या डिनरला पुन्हा एकदा केतन तिच्या समोर आला, पण तिने त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. खरं तर त्याला तिने इथे कार्यक्रम सुरु होण्यापुर्वी पाहिले तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसला होता. त्यांची औपचारिक ओळख अभिरामच्याच एका कॉमन मित्राने करून दिली होती. त्याला तिथे असं समोरच पाहून आधी तिचा विश्वासच बसला नव्हता, पण निरखून पाहिल्यावर तिची खात्री पटली. हो, केतन गोखलेच होता तो. त्याच्या नावाबरोबरच त्या कटू आठवणीही उफाळून वर आल्या होत्या आणि तिच्या मनाची ती जखम पुन्हा एकदा भळभळून वाहू लागली होती.

केतकी बुद्धीनी जितकी हुशार होती, तितकीच रूपानी सामान्य होती. तिला दिसण्यावरून अगदी लहानपणापासून टोमणे ऐकायला लागत असत. ’लग्नाच्या बाजारात हुशारीला काय किंमत? तिथे रूपवान मुलींनाच मागणी’.. असे ती कायम ऐकत आली होती. तारुण्यसुलभ भावनेनी आपल्यालाही एक जीवाभावाचं माणूस मिळावं असं तिलाही वाटायचं.. पण परिस्थितीची जाणीव झाल्यानंतर आपल्याशी कोणी लग्न करायला तयार होईल याच्या आशा जवळजवळ मावळल्या होत्या तिच्या. ईंजिनीयर होऊन ती एमटेकच्या पूर्वपरीक्षेची तयारी करायला लागेपर्यंत तिनी जगाचा पुष्कळ अनुभव घेतला. तिचे आई-वडील स्थळं बघत होते, आणि तीही यांत्रिकपणे ’दाखवून’ घेत होती, पण गाडी त्यापुढे जात नव्हती. अश्यातच केतन गोखलेचे स्थळ तिला आले होते.

केतन त्याच्या आईवडीलांबरोबर त्यांच्याकडे ’चहा-पोहे’ साठी आला होता. बघताक्षणीच केतनची छाप पडली होती सगळ्यांवर. केतनची personality impressive होती. उंच, देखणा, बडबड्या केतन तिला आवडला एकदम, पण ती त्याला, त्याच्या घरच्यांना आवडणं कसं शक्य होतं? खाणेपीणे, हवापाण्याच्या गप्पा झाल्यावर ती मंडळी गेली. मनातून सगळे त्यांचा ’नकार’ धरूनच चालले होते. आणि अचानक केतनचा फोन आला होता- तिच्याशी बोलायला.. सगळे चकितच झाले होते. एक ’बघायला’ आलेला मुलगा लगेचच फोन करतो म्हणजे आपण त्याला ’पसंत’ आहोत असे केतकीला वाटणे सहाजिक होते. त्याच्याशी बोलताना केतकी आपसूक खुलली होती. केतन तिला म्हणाला होता ’तुझा आवाज फार गोड आहे, ऐकत रहावासा वाटतो.’ हे असलं बोलणं तिने ऐकलच नव्हतं कधी. ती सातव्या आसमानात होती. तेव्हाच केतननी पुन्हा भेटूया का असे विचारले, नव्हे जवळजवळ ठरवूनच टाकले. यावेळी ते बाहेर भेटले. त्याने तिची पुस्तकांची आवड मुद्दाम लक्षात ठेवली होती आणि तिच्यासाठी एक पुस्तक आणले होते. खूप बोलत होता तो.. नंतरही रोज फोन करून तो त्याच्याविषयी सांगायचा, आणि तिच्याविषयी जाणून घेत होता.. केतकी खूपच खुश होती. तिने तिला आणि केतनला कल्पून त्यांच्या पुढील आयुष्याची अगणित स्वप्न रंगवली..

पण तिचे आई-बाबा मात्र अस्वस्थ झाले होते. मुलं भेटत होती, बोलत होती, पण गोखल्यांकडून पुढच्या हालचाली होईनात. शेवटी त्यांनीच गोखल्यांकडे फोन केला आणि ’मुलांची पसंती आहे, आता पुढच्या गोष्टी कधी ठरवायला येऊ’ असेच विचारले. गोखल्यांनी २ दिवस मुदत मागितली. यानंतर मात्र केतनचे फोन एकदम बंद झाले. दोनाचे चार दिवस झाले, तिकडून कसलाच निरोप आला नाही. आणि आली ती गोखल्यांची चिठ्ठी! ’आपला योग दिसत नाही, क्षमस्व!’ इतकंच!!!

एव्हाना केतकीच्या आई-बाबांना कल्पना आली होती की असेच काहीसे असणार, पण केतकीला फार मोठा धक्का बसला. नक्की कुठे काय बिनसलं तिला अंदाजच येईना. केतन आणि ती किती खुश होते, तास चे तास कसे सरायचे कळायचं नाही ते बोलत असताना. आणि त्यालाही ती आवडली असणारच ना? त्याशिवाय का तो इतका बोलायचा तिच्याशी? मग हे ’योग नाही’ काय? रुढार्थानी त्याने तिची फसवणूक केली नव्हती, पण तिच्या मनाशी खेळला होता तो. arranged marriage मधे एका मुलीशी सतत बोलणं म्हणजे तिच्या अपेक्षा उंचावणं होतंच. तिला सहजपणे ’नकार’ देताना त्यालाही काहीच वाटले नव्हते? त्याला ती थोडीशीही आवडली नव्हती? इतकं व्यावहारिक होतं हे सगळं?

केतकीचं या सगळ्यावरचं मनंच उडालं.. तिने आई-बाबांना निक्षून सांगितले की आता यापुढे ’चहापोहे’ बंद. आई-बाबांनाही मुलीच्या मनाची कल्पना आली. त्यांनी थोडे दिवसतरी हे कार्यक्रम स्थगित करायचे ठरवले.

यानंतर केतकीचा स्वत:च्या दिसण्याबद्दलचा न्यूनगंड अजूनच वाढला. लग्न आपल्यासाठी नाही असे तिने मनाला समजावले आणि तिने स्वत:ला अभ्यासाला जुंपले. अश्याताच तिला एका मोठ्या कंपनीत नोकरीची ऑफ़र आली. लग्नाची शाश्वती नाही, किमान स्वत:च्या पायावर तरी उभं रहायला हवे असा विचार करून तिने ती घेतली.

आणि तिथे तिला अभिराम भेटला. अभिराम तिला बराच सीनीयर होता. अतिशय हुशार, मितभाषी, कामाला वाहून घेतलेला आणि मदतीस तत्पर अशी अभिरामची ख्यातीच होती. त्याच्या हाताखाली काम करायला मिळावं म्हणून बाकी लोक धडपडायचे. मात्र ती त्याच्याशीच काय, तर इतर टीममेट्सशीही कामापुरतच बोलायची. अभिरामनेही तिच्यात कामाव्यतिरिक्त काहीही interest दाखवला नाही. प्रोजेक्ट मोठं होतं. आधी शिकावू म्हणून रुजू झालेली ती, हळुहळू महत्त्वाची कामंही करायला लागली. अभिरामनी तिची हुशारी जोखली आणि तिला अजून जबाबदारीची कामं देत गेला.

दोन वर्षांनी अभिरामला दुसर्‍या अजून मोठ्या कंपनीची ऑफ़र आली आणि तो तिकडे गेला. अभिराम गेल्यानंतर केतकीला जरा चुकचुकल्यासारखे झाले, त्याच्याबद्दल मनात आदर होता तिला. अतिशय संयमी वागणं, मृदू पण ठाम बोलणं.. एक ’आयडीयल’ माणूस होता तो. आणि त्यानंतर अचानक त्याची मेल आली होती.. लग्नाचं विचारलं होतं त्यानी.. अगदी थेट. केतकीला आधी गोंधळायलाच झालं आणि मग चक्क मनातल्यामनात हसू आलं. अभिरामचा स्वभावच असा होता. प्रामाणिक, सरळ. लपावाछपवी नाही, आतबाहेर नाही. अभिराम दिसायला अगदी साधा होता.. किरकोळ शरीरयष्टी, चष्मा आणि साधी रहाणी. सच्चेपणा तर जाणवायचाच. पण त्याला असं का बरं वाटलं होतं तिच्याबद्दल? ती दिसायला सामान्य, थोडी हुशार, कष्टाळू.. थोडक्यात सांगायचं तर अभिरामसारखीच होती की ती खूपशी!

अभिराम तिच्या गुणांकडे पाहू शकला होता. त्याला केतकीचा चांगुलपणा आणि innocence जाणवला होता. त्याची खात्री होती की ते एकमेकांना उत्तमपणे समजू शकले असते. आणि गेली २ वर्षं आनंदानी संसार चालू होता त्यांचा. केतकीचा shy स्वभाव अभिरामच्या संगतीत फ़ुलला होता. तिच्यातला न्यूनगंड कमी होऊन तिला थोडा आत्मविश्वास आला होता. अभिराम आणि ती एक ideal match होते. professionally केतकीचं बस्तान तिच्या कंपनीत बसलं होतं आणि अभिरामची तर उत्तरोत्तर प्रगति होत होतीच.

आणि आज अचानक केतन तिच्या समोर आला होता! त्याने तिला नाकारण्याचे कारण तिला आज ’दिसले’ होते. त्याची बायको दिसायला अगदी देखणी होती, हजारात उठून दिसेल अशी.. तिचे मन विषादानी भरले.

डिनर चालू असताना अभिरामला सतत कोणीतरी भेटत होते, त्यामुळे ती एकटीच जेवत होती. काहीतरी घ्यायला ती बूफ़ेटेबलपाशी गेली आणि संधी साधून केतन तिच्याशी बोलायला आला. ती जरा नर्व्हस झाली. तिला नक्की कसे react व्हावे कळेना पटकन.. आज इतक्या वर्षानी त्याला समोर पाहिल्यावर त्याच्याबद्दल घृणाच वाटली तिला खूप..
"हाय. कशी आहेस?"
"मजेत."
"Abhiram is brilliant. आम्ही वेगवेगळ्या locationsला आहोत त्यामुळे आधी भेट नाही झाली. But I have heard a lot about him."

केतन अगदी सहजपणे बोलत होता. जशी काही त्यांची खूप जुनी ओळख होती.. केतकीला जरासा रागच आला. अचानक केतन म्हणाला,
"Actually, I am sorry about that whole incident."

आता मात्र केतकीच्या तो डोक्यात गेला.. आज, इतक्या वर्षांनी त्याला माफ़ी अशी casually मागावीशी वाटत होती? ते सुद्धा ती समोर आली म्हणून.. तोंडदेखली.. त्याला खरंच ’त्याचं काही चुकलं’ असं वाटत असतं तर त्याने तेव्हाच, त्या प्रसंगानंतरच तिला हे सांगितलं नसतं? कशासाठी करत होता तो इतका नाटकीपणा? आपल्या सारख्या ’सामान्य’ मुलीला अभिरामसारखा brilliant नवरा मिळाला म्हणून त्याला आश्चर्य वाटत होतं की काय? शक्य तितकं तोडून टाकत ती म्हणाली,

"Sorry? नक्की कशाकशाबद्दल sorry म्हणणार आहेस? राहूदे. On the contrary, please accept my thanks!"

केतन चक्रावला! त्याच्या चेहर्‍यावरचे प्रश्नचिन्ह पाहून केतकीला हसू आलं. ती थेट त्याच्याकडे पहात म्हणाली..
"हो, खरंच.. कारण त्याशिवाय मला अभिराम भेटला नसता!!"

केतनला काही समजायच्या आतच केतकीने त्याच्याकडे पाठ फ़िरवली होती आणि ती अभिरामच्या दिशेने जायला लागली होती.

2 comments:

अनु said...

Punam,
Please visit my blog, I have tagged you for 'Avadatya pustakatale utare'.
www.anukulkarni.blogspot.com
-Anu

TheKing said...

Nice post... So true. unlike the filmy stories this is what actually happens in life.